Saturday, November 27, 2010

कांडेपोहे

रविवारच्या सकाळी जांभई देत उठलो. कामाची सुट्टी, पेपर वाचन, रविवारची पुरवणी, फक्त खाणं आणि तंगड्या पसरून टि. व्ही. पहाणं. काय साला दिवस आहे! नाद करायचा नाय!
आंघोळ उरकून पेपर उघडला आणि आत आवाज दिला,
"चहा आंण गं आणि बरोबर कांदपोहे सुद्धा"
बाहेर फक्त चहाच आला.
"कांदेपोहे कुठे आहेत?"
"मिळणार नाहीत"
मिळणार नाहीत? म्हणजे काय? रविवारच्या सकाळी सकाळी तिरसट उत्तर?
धोका आहे राव. विचार करून पाहीला. काल भांडण वगैरे तर काही झालं नव्हतं. टि. व्ही. वरच्या बर्‍याच कार्यक्रमात दाखवतात, बायकोचा वाढदिवस पती विसरला कि मग बायको रागावते.
च्यामारी कसा काय विसरलो मी? जाऊ दे सरळ सरळ शुभेच्छा देऊन टाकू आणि दुपारी जेवायला बाहेर नेऊ. हाय काय नाय काय.
मी "हॅप्पी बर्थडे, डार्लिंग" असा फिल्मी डायलॉग ठोकून दिला.
"गप्प बसा, तो झाला कधीच" बायको आणखीणच डाफरून म्हणाली.
"अरे हो, आपण मागच्याच महिन्यात साजरा केला तुझा वाढदिवस नाही का? विसरलोच." मी सुद्धा माझी चूक मान्य केली.
"तो माझा नाही आपल्या लग्नाचा वाढदिवस होता. माझा वाढदिवस दोन महिन्यांपुर्वीच झाला आणि तुम्ही तो विसरला होतात. मीच आठवण करून दिली होती"
मी विचार करत राहिलो.
पण मग त्याचा आजच्या कांदेपोह्यांशी काय संबंध? काही नीट आठवत नाही पण कदाचित त्यादिवशी हिने माझ्याशी कचकचीत भांडण केलं असेल. म्हणजे नुकसान भरपाई झालेली आहे.
पण मग आज कांदेपोहे मिळणार नाहीत याला काय अर्थ आहे? विचारून खुलासा केला पाहिजे. पण आपला बाणा कायम ठेऊन. दोन महिन्यांपुर्वी मी तिचा वाढदिवस विसरलो होतो मान्य आहे. पण त्यासाठी आज चिडायचं काय कारण?
"ते जाऊ दे. कांदेपोहे का मिळणार नाहीत ते सांग" मी ही तेवढ्याच तिरसटपणे विचारलं.
"कांदे नाहीत", खुलासा झाला.
हात्तिच्या, एवढंच ना, मग त्यात एवढं फुगण्यासारखं काय आहे. पण मी चिडलो होतो.
"कांदे नाहीत? रविवार म्हणून फिरायला गेलेत का?" मी तिरसटपणा कायम ठेवला.
"गेले चार दिवस ओरडून ओरडून सांगतेय कांदे आणा म्हणून. पार्ट्या करायला वेळ आहे पण घरचं काम करायला नाही."
या बायका म्हणजे म्हणजे फार राजकारणी. जाता जाता टोमणा मारलाच. माझा मित्र कांडेकराची बायको माहेराला गेलीय त्यामुळे वेळ आणि मोकळे घर कालच सत्कारणी लावले.
"मग जा आणि घेऊन ये कांदे त्यात काय विशेष?" मी जरा प्रेमळ आवाजात सुचवलं.
"मी काय काय म्हणून करायचं? नाहीतर रोज ऑफिस मध्ये तंगड्या पसरून झोपाच काढता आणि सुट्टीच्या दिवशी पार्ट्या करता. ऑफिसमधून येता येता काही सामान आणलंत तर काही बिघडतं का?"
मला ऑफिसमध्ये काम कमी असतं हे मान्य आहे पण प्रवासाचा त्रास कमी असतो का? स्वत:ची गाडी असली म्हणून काय झालं?
"मग सांगायचं कांदे आणा म्हणून, आयत्या वेळी तक्रार करायची नाही"
"रोजच तर सांगतेय. तुमच्या मोबाईल वर रिमायंडर सुद्धा लावला होता. पाहीलात का?"
मी आठवून पाहीलं. काल संध्याकाळी साडेसातला "कांदे" असा काहीतरी रिमायन्डर वाजला असल्याचं आठवलं. पण इंग्लीशमध्ये असल्यामुळे मी "कांडे" असा वाचला होता. म्हणून तर मला कांडेकराच्या घरी पार्टीला जायचं लक्षात आलं.
इतर मित्र आपण कसे बायकोला फसवून, ऑफिसातली कामाची कारणं सांगून पार्टीला आलो असल्याचं सांगत होती. मी मात्र माझ्या बायकोने स्वतःच पार्टीला जाण्यासाठी रिमायंडर मोबाईल मध्ये कसा टाकला हे सांगून सगळ्यांना गार करून टाकले होते. किती हेवा वाटला होता त्यांना माझा! घरी आल्यावर बायकोचा एक खोल मुका घेऊन त्याची परतफेड करायचा मी विचार करत होतो आणि ही बया आता म्हणते तो रिमायंडर 'कांडे' असा नसून 'कांदे' असा होता. रिमायंडर सुध्दा काय लिहीला, नुसता 'कांदे'. त्यातून काय अंदाज लावणार? "कांदे आणा" म्हाणून तरी लिहायचा होता. तो काय मी "कांडे आणा" असा वाचून कांडेकराला चहापाण्याला घरी आणणार होतो? कि त्याला 'कांडेपोहे' खायला घालणार होतो? मीच मनातल्या मनात केलेल्या विनोदावर मला बायको समोर फिदी फिदी हसायला आलं आणि बायको आणखीनच चिडली.
दोन किलो कांद्यांसाठी तीन मजले खाली उतरून दुकानापर्यंत चालत जाणे आणि परत ते ओझं घेऊन तीन मजले चढणं! छ्या, जमणार नाही! शिवाय काल पार्टी करून घरी येताना मी एका पायात माझं लाल चप्पल आणी दुसर्‍या पायात कांडेकराचं काळं चप्पल घालून आलो होतो. त्यामुळे सदरा लेंगा आणि त्या खाली ऑफिसध्ये घालायचं बूट घालून किंवा ऑफिसमध्येच घालायचे कपडे घालून जावं लागलं असतं. ते सुद्धा उपाशी पोटी.
वास्तविक मी झोपेतून उठण्या आगोदर ती कांदे घेऊन येऊ शकली असती. तिसर्‍या मजल्यावर तर घर आहे आमचं. आणि फक्त दोन किलो कांदे. पाच दहा मिनिटांचं काम. शिवाय तिची दोन्ही चप्पलं एकाच रंगाची होती. पण आळसच दांडगा तिला. काय बोलणार आपण?
तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि कांडेकरच घरात आला.
"माझं चप्पल दे रे. काय लेका स्वतःचं चप्पल ओळखंना व्हय तुला?", कांडेकर, "येताना मंडईतूनच आलो कांदे बटाटे स्वस्त मिळतात म्हणून चार किलो कांदे आणलेत, उगाच एवढ्या तेवढ्या कामासाठी बायकोची फरपट कशाला?"
च्यायला या कांडेकराच्या मी! गप्प चप्पल घेऊन जायचं तर नको ते बोलून बसला.
आता ही संधी सोडली तर बायको कसली?
"भाऊजी, यांनी सुद्धा काल पोतं भरून कांदे आणलेत मंडईतून माझ्यासाठी. आता महिनाभर तरी काळजी नाही. कांदेपोहे आणू का? थोडे खाऊनच जा." आतून आवाज आला.
नको नको म्हणत तो हुशार कांडेकर सटकला.
त्या टोमण्याची भरपाई मी वरचढ, आणखी तिखट टोमणा मारून केली. पण त्यासाठी दोन दिवस गेले. आणि तोपर्यंत बायको सगळं विसरून गेली आणि मी टोमणा मारल्यानंतर बावळटासारखी काहीच प्रतिक्रिया न देता निघून गेली. असली ही विसरभोळी आणि ही म्हणे माझ्या विसरभोळेपणावर बोलणार.
पण आता हिचं तोंड बंद करायलाच पाहिजे होतं. नाहीतर दिवसभर टोमणे ऐकायला लागले असते.

एक असं उत्तर द्यावं कि बस्स रे बस्स!
"हे बघ मला अशा फुटकळ कामासाठी पाठवणं म्हणजे शिवरायांच्या भवानी तलवारीने कांदे सोलण्यासारखं आहे. शेळीसारख्या क्षुद्र प्राण्याची शिकार करायला सिंह जात नाही. ते काम सिंहीणींनी करावं. सिंह आपला पडून असतो. म्हैस, रेडा, रानगव्यासारख्या भारीभक्कम सावजाची शिकार करायची असेल तरच सिंह शिकारीत सहभाग घेतो".
एक ऐतिहासिक आणी एक जीवशास्त्रीय उदाहरण देऊन मी बायकोचा सपशेल पराभव केला होता. तिला तोंडघशी पाडलं होतं. आता मुकाट्याने कांदे आणायाला जाईल.

पण एका क्षणाचाही विलंब न लावता बायकोही तडक म्हणाली,
"पण जंगलातील सिंह आणि सर्कशीतला सिंह यामध्ये फरक असतो. जंगलातील सिंह जिंवत रेड्यासरख्या मोठ्या जनावराला सहज मारतो. पण सर्कशीतल्या मरतुकड्या सिंहाला मारून टाकलेली कोंबडीसुद्धा स्वतःहून खाता येत नाही. त्याला ती कापून, सोलून, तु़कडे करून दिली तरच तो बिचारा खाऊ शकतो. आणि शिवरायांचं म्हणाल तर त्यांनी सईबाईला 'जा गं दुकानातून दोन किलो गनिमांना घेउन ये मला त्यांना भवानी तलवारीने हरवून स्वराज्य स्थापन करायचं आहे' असं नाही म्हटलं"

मला ती काय बोलली काही कळलं नाही. सगळंच असंबध्द वाटलं. पण 'सर्कशीतला सिंह','मरतुकडा', 'बिचारा' असे दोनचारचं शब्द समजले. पण वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. आता या क्षणीच, तडकाफडकी खमंग उत्तर तिला द्यायला हवं. नाही तर ती उद्यापर्यंत सगळं विसरून जाईल आणि माझ्या विचार करून दिलेल्या टोमण्याकडे ती दुर्लक्ष करण्याची शक्यता होती.

मी मोठ्या आवाजात म्हणालो,
"पण.......शिवाजीमहाराज......आणि....म्हणजे....कांदे........मरतुकडी कोंबडी.........शिवाय तु म्हणालीस ते गनिम........"
माझे शब्द अडखळत होते. काही म्हणा बायकोने तडक दिलेल्या उत्तरामुळे थोडासा गोंधळलो होतो हे मी मोठ्या मनाने मान्य करतो. पण थोडासाच बरं का. म्हणजे दोन किलो कांद्यांना जर कुणी 'पुर्ण गोंधळलेला' म्हणत असेल तर साधारण दोन लहान आकाराच्या कांद्यांएवढाच. म्हणजे शंभर ग्रॅम.
पण बायकोला विचार करायला वेळच न देता मी खेकसलो,
"ते काही असू दे,मला पुर्ण मरतुकडी कोंबडी पाहिजे म्हणजे पाहीजे". दोन लहान आकाराच्या कांद्यांएवढ्या गोंधळामुळे माझ्या तोंडून कांडेकराने आणलेल्या चार किलो कांद्यांएवढे चुकीचे शब्द निघाले होते. पण पुढ्यचाच क्षणी मला माझी चु़क लक्षात आली. पण पुढे काय बोलावं हे न कळल्यामुळे मी बायकोच्या तोंडाकडे टकामका पाहत राहिलो. बहूधा बायकोसुद्धा गोंधळली असावी. तिच्या तोंडून एक मोठ्ठा "काय???" निघाला आणि मग "कठीण आहे" असा काहीसा भाव तोंडावर आणून ती किचनमधे आपल्या कामाला निघून गेली. मी मग किचनच्या दारातूनच पाठमोर्‍या उभ्या असलेल्या बायकोवर ओरडलो,
"कांदेपोहे पाहिजे म्हणजे पाहिजे असं म्हणायचं होतं मला"
"कांदे आणा मग बनवून देईन"

"एक काम कर. ज्या ज्या गोष्टी हव्यात त्याची यादी कर आणि दे माझ्याकडे नतंर एकेक गोष्टी सांगायच्या नाहीत आधीच सांगून ठेवतो."
"मी वस्तू सांगते तुम्ही बनवा यादी."
अरे म्हणजे हा तर आळशीपणाचा कळस झाला! मी तीन मजले उतरून काही अंतर चालत जाऊन एवढं सगळं सामान आणायला चाललोय आणि हिला फक्त यादी बनवायचा कंटाळा? जाऊ दे कुणी वाद घालावा?
"बोलत रहा"
दोन किलो कांदे, दोन किलो बटाटे, पोहे अर्धा किलो, एक तेलाचा डबा .....
दरवाज्यात उभं राहून मी ओरडलो.
"पिशवी आण गं इकडे"
बायकोने पिशवी अक्षरशः कोंबली माझ्या हातात.
कोण बरं म्हणालं होतं तुला बायको फार गुणी लाभली आहे म्हणून? हां, माझी आत्या म्हणाली होती तसं. ती असायला हवी होती आता इथं मग कळलं असतं. नाहीतर एकदा मोबाईलवर हे सगळं रेकॉर्ड करून दाखवतो आत्याला. मग बघू काय म्हणते?
बरं जाऊ दे माझा मोबाईल कुठे आहे? विसरला वाटतं घरात. बरं झालं आताच आठवलं नाहीतर बायकोला अजून एक संधी मिळाली असती काहीतरी बोलायला.
परत मागे येऊन बेल वाजवली.
तिला कसं कळंलं कोण जाणे पण बायको दारातच माझा मोबाईल घेऊन उभी होती. पुन्हा तिने तो माझ्या हातात कोंबला.
"तुला काय वाटलं मी मोबाईल घ्यायचा विसरणार? " मी पुन्हा दरडावलो.
"बरोबर आहे", बायको हळू आवाजात म्हणाली. बहूधा तिने मघार घेतली असावी.
मी पुन्हा तोर्‍यात पाठ वळवून निघालो.
"अहो" म्हणून पुन्हा हाक ऐकू आली.
"जाताना हे तुमचं पैशाचं पाकीट तेवढं घेऊन जा. दुकानदार सामान देताना पैसे सुद्धा घेतो म्हणे".
"बरं बरं" असं पुन्हा ठसक्यात म्हणून मी पुन्हा पाठ फिरवली.
"अहो" म्हणून पुन्हा हाक आली.
"जाताना ती सामानाची यादी बनवलीत ती सुद्धा घेऊन जा."
मी परत फिरलो.
"अहो" पुन्हा हाक आली.
मी मागे न पाहताच तोर्‍यात पुढेच निघालो.
"जाताना शर्टाची बटणं वरखाली झालीत ती ठीक करा"
मी मागे न पाहताच शर्टाची बटणं व्यवस्थित केली.
"आणि शेवटी एका पायात तुमचं आणि दुसर्‍या पायात माझं चप्पल घातलंत ते ठिक करा"
दोन क्षण शांततेत गेले आणि नंतर ती फिदी फिदी हसायला लागली. मी सुद्धा मग तिच्या हसण्यात सामिल झालो. रविवारची सकाळ भांडण्यातून सुरू झाली आणि हसण्यात संपली.

Tuesday, March 24, 2009

गमतीशीर देवपुजा

मी हल्ली आठवड्यातून एक दिवस तरी घरातल्या देवाची पुजा करतो. रोज करायला अजून तरी जमलेलं नाही. देवपुजा झाल्यावर देवाबरोबर आईच्याही पायाला हात लावतो. वाटेतल्या सगळ्याच नाही पण बर्‍याच देवळासमोरून जाता जाता नमस्कार करतो. कधी कधी लांबच्या देवदर्शनाला सुद्धा जातो. पण आजही देवासमोर उभं असताना तो गमतीदार किस्सा आठवतो...

लहान पणी मी नास्तिक, विज्ञाननिष्ठ वगैरे काही तरी होतो. मी कधी देवळात जात नसे, घरातल्या देवाची पुजा करीत नसे. वडील सुद्धा देवभोळे होते असं नव्हे. पण देव, धर्म याचं कधी स्तोम माजवलं नाही. आई मात्र देवपुजा, इतर प्रथा आवर्जून पाळत असे. गिरणीकामगाराच्या घराला साजेसं असं देवालय आमच्या घरात होतं. एक लाकडी फळी भिंतीवर डोक्याच्या उंचीला आडवी मारलेली. त्यावर लाकडी चौकटीतील देव. टिटवाळ्याचा गणपती, महालक्ष्मी, दत्तगुरू आणि एक गोंडस बालकॄष्ण. बालकॄष्णाचा फोटो म्हणजे चक्क कोणतं तरी भेटकार्ड किंवा लग्नाची पत्रिका की असंच काहीतरी होतं. आईला तो बालकॄष्ण फार आवडला म्हणून तिच्या सांगण्यावरून त्याला फ्रेम बनवून देवाच्या फळीवर बसवलेला. अशा सगळ्याच देवाची रोज पुजा होत असे. ज्याला माझ्या लेखी काही अर्थ नव्हता. याविषयावरून माझे इतरांशी बरेच वादंग होत. माझा विज्ञानवाद, वैज्ञानिक दॄष्टिकोन सगळ्यांच्या डोक्यावरून जात होता. आणि त्यांचं उठसुठ प्रत्येक गोष्टीत घुसवलेला धर्म आणि देव माझ्या डोक्यावरून जात होता. माझं प्रत्येक गोष्टीचं वैज्ञानिक पातळीवरून केलेलं विश्लेषण इतरांना नेहमी अतिशहाणपणाचं वाटे, 'हा एवढाच शहाणा आणि जगातले इतर मुर्ख?' असे इतरांना वाटे. आणि इतरांचं 'चमत्कार होऊ शकतात' या विधानाचं पुरावा म्हणून रामायणातल्या रामाने सोडलेला ब्रम्हास्त्राचा दाखला ऐकून माझं टाळकं फिरत असे आणि या वादाचं पर्यवसान नेहमी भांडणात होत असे. पण हे चार पार वर्षापुर्वीचं सांगतोय. म्हणजे मी आता काही खुप पोक्त आणि अस्तिक झालोय असं नाही. पण काम धंद्याच्या निमित्ताने म्हणा किंवा इतर काही कारणास्तव म्हणा माझा वेगवेगळ्या प्रांतातील, धर्मातील लोकांशी संबध आला. आपलं बोलणं दुसर्‍याला घसा फोडून पटवून सांगण्यापेक्षा त्याचं पुरेसं ऐकून त्याच्या मनस्थितीचा अंदाज घेऊन हळूहळू सुचवून सांगण्यात शहाणपणा आहे हे कधीतरी उमगलं. असे बरेच अनुभव ऐकून घेतल्यानंतर देव, धर्म, अस्तिकपणा, नस्तिकपणा या सगळ्यांच्या माझ्या मनात असलेल्या संकल्पना धडाधड ढासळत गेल्या आणि पुर्णपणे विज्ञाननिष्ठ कसोट्यांवर आधारलेली जिवनशैली जगातला कोणताही समाज स्विकारू शकत नाही या निष्कर्शाप्रत मी कधीतरी आलो.

हा गमतीदार किस्सा माझ्या त्या स्थित्यंतराच्या काळातील आहे.

घराची पुनर्बांधणी झाली आणि त्या लाकडी फळकूटावरचे देव लक्ष्मी, दत्तगुरू, तो आईचा आवडता बालकॄष्ण सगळेच देव खाली उतरवण्यात आले. त्याऐवजी एकच छानसा छोटासा देव्हारा आणि त्या देवार्‍याला साजेशी अशी गणपतीची छोटीशी मुर्ती आणली. आईला नाहीच आवडला तो देव्हारा आणि ती देवाची मुर्ती. पण शेवटी तो देवच ना, असं म्हणून आईने मोठ्या मनाने त्याला स्विकारलं. वीत-दीड वीत उंचीचा देव्हारा आणी दोन तीन इंच उंचीचा गणपती! पहिल्या दिवशी गणरायाला देव्हार्‍यात बसवून आईच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित पुजा केली. सकाळी उठून बघतो तर गणराय उजवी कडे तोंड करून बसलेला. काय चमत्कार झाला काय असं म्हणून पुन्हा त्याला समोर तोंड करून बसवला. दुसर्‍या दिवशी पाहतो तर गणराय डावीकडे तोंड करून बसलेला! तिसर्‍या दिवशी तर गणराय पुर्णपणे पाठ दाखवत देव्हार्‍याच्या एका कोपर्‍यात रूसल्यासारखा बसलेला! नंतर लक्षात आलं शेवटी उंदीर म्हणजे गणरायाचं वाहन. तोच त्या लहान मुर्तीला जाता येता धक्के मारून वाहून नेत होता. बाकी त्या मुर्तीच्या आकाराचा गणपती सहज त्या खर्‍याखुर्‍या उंदरावर बसू शकला असता. शेवटी गणरायाच्या मुर्तिच्या तळाला गोंद लावून त्याला शांत एका जागेवर बसण्याची शिक्षा देण्यात आली!
पहिले काही दिवस व्यवस्थित पुजा झाली. पण परत गणरायाला वाईट दिवस आले. त्यावर धूळ बसू लागली. हार, फुलं सुकू लागली. एके दिवशी आई आमच्यावर चिडली. लगोलग साफसफाई करायला घेतली. देवारा भिंतीवरून उतरवला. देवारा आणि गणराय दोघानांही निरमा डिटर्जंटने चांगली घासून पुसून आंघोळ घातली, लख्ख केले, पंख्याखाली ठेवून वाळवले. देव्हारा पुन्हा भिंतीवर अडकवला. आई चिडलेली असल्याकारणाने ती लक्ष देत नव्हती. तुमचं तुम्ही काय करायचं ते करा म्हणून आई आपल्या कामात मग्न होती. इकडे मी ही मग गंभीरपणे आठवतील तेवढ्या पुजाविधी करत होतो. वर सांगितल्याप्रमाणे माझा स्थित्यंतराचा काळ असल्यामुळे माझं देवपुजेविषयीचं ज्ञान जेमतेमच होतं. आधी गंध लावायचा कि आधी हार घालायचा काही कळत नव्हतं. पणती ठेवायची की उदबत्ती लावायची? का दोन्ही लावायचं? बरं नक्की पणती म्हणायचं कि निरांजन म्हणायची हे अजूनही माहीत नाही. सगळा घोळ झाला होता. कशाचा कशाला पत्ता लागत नव्हता. मुळात काही सामान सापडत नव्हतं. आईला विचारण्याची सोय नव्हती. शेवटी गंध नाहीच सापडला. देव्हार्‍याला हार घातला. मुर्ती लहान असल्याने पुर्ण देव्हार्‍याला हार घालायची पद्धत आमच्या घरात रूढ झाली होती. फुलं देव्हार्‍यात ठेवली. पणती/निरांजन तेवढी आईने तयार करून दिली. ती देव्हार्‍याची ड्रॉव्हरसारखी फळी असते त्यावर ठेवली. सुगंधी अगरबत्ती पेटवून घंटीच्या किणकिणाटात देव्हार्‍यावरून एक-दोनदा फिरवली. हात जोडून नमस्कार केला. 'हे इश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे...' ही प्रार्थना मनातल्या मनात म्हटली. आणि झालं एकदाचं म्हणून टि. व्ही समोर बसलो.

मग माझे बंधूराज देवासमोर नतमस्तक झाले. मान वर करून विचित्र नजरेने देव्हार्‍या कडे पाहू लागले. एकदा माझ्याकडे त्याच विचित्र नजरेनं पाहीलं. मग पुन्हा देव्हार्‍यातील फुलं विस्कटली. खात्री झाल्यावर माझ्याकडे वळून मोठ्याने म्हणाले,
"देव कुठे आहे रे ए?"
मी ही मग फुलं विस्कटली. गणपती कुठं सापडतो का पाहीलं. गंध, घंटी सापडत नाही तो पर्यंत ठीक होतं. पण देवपुजा झाल्यावर देवच हरवणे हे काही झेपत नव्हतं. बंधूराज हसत होते आणि मी डोकं खाजवत कुठे बरं गणपती गेला असेल हा विचार करत होतो.
शेवटी गणपती पंख्यासमोर ठेवलेला सापडला. मघाशी गणपतीला आंघोळ घातल्यानंतर सुकण्यासाठी पंख्यासमोर ठेवला होता. हद्द म्हणजे मी तो तिथेच विसरलो आणि चक्क रिकाम्या देव्हार्‍याची पुजा केली होती !!!!!!!
आईने डोक्यावर हात मारला. बंधूराज खो खो हसू लागले. भलताच खजील झालो मी. पण मलाही मग हसू आवरलं नाही. पुन्हा गणरायाला देव्हार्‍यात बसवून पुजा केली.

मग काही दिवसांनी एक नवीन मोठ्ठा देव्हारा घेतला. त्यावर पुर्वीसारखे चौकटीतले देव बसवले, एक सोडून चांगले तीन देव आणले आणि ते देव्हार्‍या बाहेर निघणार नाही याची आवर्जून व्यवस्था केली. कितीही फुलांचा ढीग ठेवला तरी देव दिसतील याची व्यवस्था केली. देवाला गंध लावल्याशिवाय पुढे जायचं नाही असा अलिखित नियम केला.
आता मात्र माझ्याकडून अशा चुका होत नाहीत. प्रत्येक पुजा बरोबर होणार याची शंभर टक्के ग्यारंटीची खात्रीच.

Friday, January 23, 2009

क्रिकेटचा सामना आणि देवपूजा

गिरणगावातल्या माझ्या घराचा परिसर अगदीच विचित्र. चार पाच घरांची मांडणी एकमेकांकडे तोंडं करून, सर्व घरांना एक सामाईक अंगण, आणि इथं पोहोचण्यासाठी एक चिंचोळी गल्ली. सर्व घरांची दारं सताड उघडीच असत. सगळ्या घरातील चिली-पिली या सामाईक अंगणात खेळत. ज्यांना मोठ्या मैदानात इतर मोठी मुलं खेळायला घेत नाहीत अशा साधारण दोन ते सहा वयोगटातील लहान मुलांचं हे हक्काचं खेळण्याचं ठिकाण होतं. त्यांच्या आयासुद्धा मुलं नजरे पासून फार दूर नको म्हणून तिथेच खेळायची परवानगी देत. दुपारच्या वेळी यांच्या खेळांचा पार दंगा उडायचा. दुपारच्या वेळी तळलेली सुरमई आणि बांगड्याचा रसा खाऊन वामकु़क्षी घेणारे लोक या मुलांना फार डाफरायचे. पण त्यांच्या स्वत:चा कार्टा सुद्धा त्यांच्यात सामील असल्यामुळे फार काही करता यायचं नाही. मी मात्र जाता येता त्यांचे नवनवीन खेळ बघत असे.

या चिमुरड्यांचे खेळ तरी काय असणार? कुणीतरी त्यातल्या त्यात मोठा असणारा मास्तर व्हायचा आणि इतरांना शिकवायचा. या कंपूतली सगळ्यात मोठी व्यक्ती म्हणजे ७ बर्षाची सिद्धी. मास्तरीणबाईंची भूमिका बहूदा ती बजावायची. त्यातल्या काही अतिचिमुरड्यांना तर शाळा, गुरूजी, अभ्यास म्हणजे काय हेच माहीत नसायचं. मग काय तो आपल्या जाग्यावर शांत बसला तरी त्याने विद्यार्थ्याची जबाबदारी पार पाडली म्हणायचं! शिकवणीपेक्षा मास्तरांचं मारणं आणि म्हणून पोरांचं तारस्वरातलं केकाटणंच अधिक व्हायचं. कधी कधी क्रिकेट सुरू व्हायचं. 'क्रिकेट' बोलायला कठीण असल्या कारणानं त्याचे बॅट-बॉल असं उच्चारायला सोपं असं नामकरण व्हायचं. या चमूचं क्रिकेट संबधातलं ज्ञान अगाध होतं. फक्त त्यातल्या काही संज्ञा उच्चारायला भारीच कठीण असल्यामुळे त्याला प्रतिशब्द शोधावे लागायचे. म्हणजे "वाईड बॉल"ला "वाईट बॉल", "एल.बी.डब्ल्यू" ला "एबली डबलू" असं काहीतरी म्हणावं लागायचं. या संज्ञांचे अर्थही अगदी थोर होते. गोलंदाजाने चेंडू बरोबर टाकला नाही तर तो "वाईट बॉल" म्हाणून संबोधला जायचा. बॉल पायाला लागला की तो पाय ज्या माणसाचा आहे तो माणूस त्याच्या पायासकट एबली डबलू झाला असं म्हणायचं, भले तो माणूस एखादा फिल्डर्सपैकी का असेना. पण तो एबली डबलू झाला हे निश्चित. फिल्डरचे एबली डबलू झाल्यावर त्याला खेळातून बाद करायचे का नाही हे निश्चित ठाऊक नसल्याने तो चेंडू पकडणारा, त्याचा पाय आणि तो एबली डबलू सगळ्यांकडेच दुर्लक्ष करणे योग्य असा निष्कर्ष काढला जाई.

पहिलीतल्या आयुषच्या बहीणीची प्लॅस्टिकची बॅट आणि प्लॅस्टिकचा बॉल मिळाला की सामने रंगायचे. आयुष त्याला आणि त्याच्या नुकत्याच चालायला शिकलेल्या बहिणीला, अस्मिताला, खेळायला घ्यायच्या अटीवर आपली चेपलेली अमुल्य बॅट द्यायला तयार व्हायचा. एवढ्या लहान मुलीला बॅट-बॉल खेळता यायचं नाही असं इतर मुलं त्याला समजावुन सांगायची. पण आयुषचा हट्ट कायम असायचा. मग अस्मिताला खेळायला घेताना निर्माण होणाया अडचणींवर बराच खल व्हायचा. अस्मिता नुकतीच चालायला लागली असल्यामुळे बॉल टोलवल्यावर तीला 'रन' काढण्यासाठी पळता येणं शक्य नाही, यावर अस्मिताला फक्त बॅटिंग करायला सांगू, रन काढण्यासाठी मी पळतो असं आयुष सुचवत असे. पण मग अस्मिता आणि बॅट साधारण एकाच उंचीची असल्यारणाने तिला बॆंटींग करता येणं कठीण आहे अशी नवीनच समस्या निर्माण होई. यावर आपण तिला फिल्डींग करायला लावू असा उपाय ठरत असे. यावर कुणीतरी अस्मिताला पळता यायचं नाही या मूळ मुद्याची आठवण करून देई. यावर खात्रीचा उपाय म्हणून अस्मिताच्या खेळाची चाचणी करायचा प्रस्ताव कुणीतरी ठेवत असे. अस्मिता मात्र आपल्या इवल्याश्या हाताने बॅटला मिठीत घेऊन दुसया हाताने चॉकलेट खाण्यात मग्न असे. एवढ्या मोठ्या वादंगाचा विषय आपण आहोत याची सुतराम कल्पना तिला नसायची. चाचणी म्हणून आयुष अस्मिताकडे बॉल टाकत असे. सर्वजण "अस्मिता बॊल पकड", "लवकर पकड", "तो बघ तुझ्या पायाजवळ", "अग असं काय करतेस?" असा एकच गलका करीत. याचा परिणाम एवढाच व्हायचा की अस्मिता चॉकलेट खायचं सोडून आलटून पालटून सगळ्यांच्या तोंडाकडे पहायची. गलका थांबला कि परत चॉकलेट खाणं सुरू व्हायचं. असं दोनतिनदा झाल्यावर कोणीतरी आपल्याकडे बॉल नावाची वस्तू टाकणार आहे आणि आपण ती पकडायची आहे एवढं अस्मिताला समजत असे. अशावेळी चॉकलेट खाणं थांबवण्याऐवजी ते लवकरात लवकर खाऊन संपवणे जास्त सयुक्तिक आहे हे तिला बरोबर समजायचं. चॉकलेट खाऊन चिकट झालेली बोटं आयुषच्या शर्टाला पुसून ती बॉल पकडण्यासाठी दोन्ही हात कमरेवर ठेऊन उभी राहायची! चेंडू टाकण्याची जबाबदारी तीन वर्षाच्या कुणालवर असायची. याचा बराचसा वेळ इलॅस्टिक सैल झालेली चड्डी सावरण्यातच जायचा. चेंडू फेकण्यासाठी पाच-सात पावलं पळायचं असत असं तो कुठेतरी शिकला होता. पण त्यात एक मोठी अडचण होती. पळताना पावलागणिक त्याची चड्डी थोडीथोडी खाली येत असे आणि कधी कधी पाय अडखळून पडत असे. पण त्याची किंवा इतरांची याबाबत काही तक्रार नसे. पण तो अस्मिताकडे चेंडू एवढ्या जोराने फेकत असे की चेंडू फेकून झाला हे तिच्या ध्यानातच येत नसे. ती चेंडूची वाट बघत कुणालच्या तोंडाकडे पाहत राही. अस्मिताचे विरोधक मग घाईघाईने "अस्मिता बॅट-बॉल खेळू शकत नाही" असे जाहीर करून टाकत. आयुष मात्र हार मानायला तयार नसे. मघापासून अस्मिता लहान आहे हे मानायला तयार नसणार आयुष कुणालला दम देत असे,

"अरे ये कुण्या, बॉल हळू टाक. ती लहान आहे दिसत नाही काय? सरपटी बॊल टाक."

मग कुणाल पुढचा बॉल कमरेवर हात ठेवून उभ्या असणाया अस्मिताच्या दिशेने, तोसुद्धा अगदी हळू, सरपटत जाईल अशा बेताने टाकत असे. कमरेवरचा हात उचलून खाली वाकून चेंडू पकडण्याची क्रिया होईपर्यंत चेंडू अस्मिताच्या दोन पायांमधून पलिकडे गेलेला असे आणि अस्मिता कमरेतून वाकून स्वत:च्याच ढेंगेतून चेंडू आणी इतर उलट्या गोष्टी कशा दिसतात पाहण्यात मग्न होऊन जाई! आपल्याच ढेंगेतून खाली डोकं वर पाय असा दिसणारा आपला भाऊ आयुष, त्याच्यामागं रोजच्यापेक्षा वेगळाच दिसणारा आपल्या घराचा दरवाजा आणि रोज दाराखाली दिसणारी चप्पलं दारावरच्या छपरावर चिकटलेली, हे असं सारं अजब पाहून आपण चेंडू पकडायला खाली वाकलेलो आहोत याचा अस्मिता बाईंना विसर पडायचा!

अशा बर्‍याच परिक्षणांनंतर अस्मिता खेळू शकणार नाही हे आयुषच काय स्वत: चेंडू सुद्धा मान्य करत असे. परंतू बॅट अस्मिताची असल्याकारणाने मान म्हणून अंपायरचं स्थान अस्मितालाचा द्यायचं एक मुखाने मान्य होत असे! चेंडू टाकणारा टाकेल, बॅटींग करणारा करेल, फिल्डिंग करणारा करेल. अंपायरचा त्रास होण्याचं काहीच कारण नाही. फक्त फोर गेला की सिक्स गेला, कोण आऊट झाला, नो बॉल कि वाईट बॊल, कोण एबली डबलू हे एवढं समजलं म्हणजे झालं. बॅट अस्मिताची असल्यामूळे ती एवढीतरी हुशार नक्कीच असेल असं मान्य करण्यावाचून पर्याय नव्हता. "अस्मिताचे खेळातील स्थान" ह्या महत्वाच्या चर्चेचा असा निकाल लागला. शिवाय अंपायर कोण होणार हा सुद्धा प्रश्न त्याबरोबरच सुटला. या नंतरचे काम काही कठीण नसायचं.

टीम बनवायचं काम सगळ्यात मोठ्या व्यक्ती कडे म्हणजे कुणालची बहीण सिद्धीकडे असायचं. आपल्या टीम साठी सभासद निवडताना बरंच राजकारण व्हायचं. सगळ्याबाजूने विचार व्हायचा. बरेच मुद्दे विचारात घेतले जायचे. काही वेळापुर्वी कुणाचं कुणाशी भांडण झालं होतं, कुणी कुणाला खाऊ दिला नाही किंवा नाखूषीने दिला, कुणाची उंची किती आहे, दोन्ही बाजूच्या सभासदांची सरासरी उंची काय, पहिल्यांदा बॆंटिंग मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता कोणत्या टीमला आहे, आपला सगळ्यात आवडता मित्र कोणत्या टींममध्ये आहे, कुणाची आई घरात चेंडू गेल्यावर जास्तीत जास्त आरडाओरड करते, आधीच्या खेळात कुणी कुणाला हरवलं, कुणाच्या हातात कुठला खाऊ आहे, विनंती केल्यावर त्यातला थोडासा खाऊ आपल्याला मिळण्याची काय शक्यता आहे अशा अनेक शक्यता विचारात घेऊन टीम बनवल्या जायच्या.

कुणालला गोलंदाजीची भलतीच आवड होती. त्यामुळे सामना सुरू झाल्यानंतर जो पक्ष फलंदाजी घेईल त्याच्या विरुद्धबाजुच्या पक्षात तो खुशाल जात असे. त्याची भरपाई म्हणून त्या बाजूचा एक अत्युच्च फलंदाज पहिल्या पक्षाला जाऊन मिळत असे.

फलंदाजाने टोलवलेला चेंडू कोणत्या तरी घराच्या भिंतीला आपटला की फोर-फोर-फोर आणि चेंडू दोन फूट जरी उंच उडाला की सिक्स-सिक्स-सिक्स असे ओरडत सगळेच जण दोन्ही हात उंचावून नाचू लागत. अगदी चेंडू पकडणारे फिल्डर्स सुद्धा! अचानक असा गोंधळ झाल्यावर कुणाची तरी आई पडल्या पडल्याच "काय वरडायला लागला रे पोरांनो, गप खेळता की बॉल घेऊ तुमचा?" असा दम देई. तेवढ्या पुरते सर्वजण शांत होत. क्रिकेटमध्ये अधून मधून धावा काढाव्या लागतात म्हणून फलंदाज चेंडू टोलवून पळत असे. चेंडू पकडण्यासाठी सगळेच फिल्डर्स चेंडू मागे धावत आणि चेंडू कोण पहिला पकडतो अशी नवीनच स्पर्धा सुरू होई! अशी सगळी पळापळ पाहून खुद्द अंपायर सुद्धा उत्तेजित होऊन अलगद पावलं टाकत पळत असे! पण नक्की कुठे पळायचं हे ठाऊक नसल्यामुळे अंपायरचं पळणं दिशाहीन असे.

खेळताना कुणालातरी बॅट लागायची किंवा चेंडू नेमका डोक्यावर लागायचा त्यामुळे रडारड व्हायची. रडणार्‍याची आई रडण्यावर उपाय म्हणून अजून दोन धपाटे देऊन त्याला ओढत घरात घेऊन जायची. चॉकलेट खाऊन बराच वेळ झाल्यामूळे अंपायरला भूक लागत असे. कुणाला तरी शू-शू लागायची म्हणून तो निघत असे. असे करत करत सामन्यातून एकेक मेंबर गळायचा आणि मॅचचा काही निकाल न लागता संपायची. सर्व शांत झाल्यावर मी सुद्धा कंटाळून एक डुलकी काढण्याचा प्रयत्न करी.
अशा शांत दुपारच्या वेळीमाझा डोळा लगतो न लागतो तोच अचानक पुन्हा गलका होत असे, घंटीची किणकिण आणि ’सुखकर्ता दु:खहर्ता" च्या चालीवर बोबडे बोल ऐकायला येत असत...

सुककलता बुकलता वाल्ता विगनाची...
नुलवी पुलवी प्लेम...

असा उच्चारांचा उद्धार आणि अर्थाचा अनर्थ करीत आरती चाललेली ऐकून मी डोळे चोळत बघायला येत असे...
पाहतो तर बालगोपाळांचा देवपूजा-देवपूजा खेळ चाललेला असे. कुठल्याश्या वितभर लांबीच्या फाटक्या फोटोला भिंतीला नुसताच टेकवून ठेवलेला असे. कुणाच्यातरी देवघरातल्या देवाला घातलेला हार या फोटोला पडलेला असे. मारी बिस्किट साखरेबरोबर कुटून ती पावडर देवासमोर प्रसाद म्हणून ठेवलेली असे, बाजूला तिर्थ म्हणून पाण्याच्या ग्लासात अर्धवट विरघळलेली लेमलेट्ची गोळी असे. मघाच्या गोलंदाजाचा उघडाबंब भटजी झालेला असे. आणि अंपायरची नजर देवापूढे ठेवलेल्या प्रसादावर असे. इतर खेळाडू भक्तीभावे इतरांच्या तोंडाकडे बघत मोडक्या तोडक्या भाषेत आरती म्हणत उभी असत.

कुतुहल म्हणून मी कुठला देव एवढा प्रसन्न झाला आहे हे पाहत असे आणि काही वर्षापुर्वी टि.व्हि.वर सुरू असलेल्या महाभारत या मालिकेतील दुर्योधनाची पूजा गणरायाची आरती गाऊन होत असलेली पाहून धन्य होत असे...

Wednesday, October 29, 2008

सेनापती कापशी

यावर्षीच्या दिवाळीत काही कामानिमित्त कोल्हापूरला जाणं झालं. कोल्हापूर स्थानकावर पुढारी वर्तमानपत्र घेतलं. पहिल्याच पानावर बातमी होती "सेनापती कापशीत अमूक अमूक घडले". बातमीत "सेनापती" या शब्दाचा काही अर्थ लागेना. थोडा विचार केला नि सोडून दिलं. सी.बी.एस. ला गारगोटी बस पकडून गावी आलो.
दिवसभराची कामं उरकून रात्री आनंदा वारके यांच्याकडे गप्पा हाणायला आलो. नात्यानुसार हे माझे मामा. पण मी त्यांना दादा म्हणतो. व्यवसायाने मराठीचे प्रोफेसर. फार गप्पिष्ट माणूस. बंगल्याच्या दारातली लाईट मुद्दाम घालावली. गावरस्त्यावरील विजेच्या दिव्याच्या अंधूक प्रकाशात संगीत, लेझीम याच्या गप्पा रंगल्या. एवढ्यात कोणीतरी आलं. इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि आनंद दादांच्या तोडून एक वाक्य निघालं, "सेनापती कापशीत उद्या आरोग्य शिबीर आहे...". त्या दोघांमधील संभाषण सुरू होतं. मी विचार करत राहीलो. गावाचं नाव कापशी. पण मग त्याला 'सेनापती' का म्हणत असावेत?
दुसर्‍या दिवशी पुन्हा कोल्हापुरात जायला निघालो. यष्टी साठी तासभर थांबण्याची तयारी नव्हती म्हणून वडाप मध्ये बसलो. इतर ठिकाणचं माहीत नाही पण कोल्हापूरात वडाप हे फार मजेशीर प्रकरण असतं. जीप, ओम्नी किंवा तत्सम गाडीत ड्रायव्हर बसलेला असतो. गावं येत जातात आणी प्रवासी वडापमध्ये चढत जातात. प्रत्येक गावात प्रवासी चढला कि आपल्याला वाटतं हा या गाडीत चढू शकणारा शेवटाचा प्रवासी. पण लगेच पुढच्या गावात एक नवीन प्रवासी चढतो आणि कशी कोण जाणे पण त्याला गाडीत बूड टेकायला जागा मिळते. इतर प्रवासी काही तक्रार करीत नाहीत. शेवटी एक वेळ अशी येते की दरवाजाकडे बसलेले प्रवासी एक पाय गाडीबाहेर काढून अर्ध्या ढुंगणावर बसतात. लहान पोरं ठोरं आईबापाच्या मांडीवर बसतात. स्वतःच्या आणी दुसर्‍यांच्या सुद्धा! खुद्द ड्रायव्हर साहेब अर्ध्या ढुंगणावर वाकडा बसलेला असतो. गियर, क्लच, ब्रेक आणि सूकाणू पर्यंत पोहचता यावं एवढीच माफक अपेक्षा असते बिचार्‍याची. असं हे फुल्लं शिटा भरलेलं वडाप कोल्हापूर शहराच्या दिशेनं सुटतं. रस्त्यात कितीही दगड खड्डे असले, वडापने कितीही हेलकावे खल्ले तरी तुम्हाला तुमच्या शिटवर टिकून राहीलं पाहीजे. नाहीतर तुम्ही वडापमधून प्रवास करण्यासाठी सर्वस्वी नालायक आहात हे खूशाल समजावे! गाडीत गप्पा सुरू होतात नाहीतर वडापमध्यल्या रोम्यांटीक गाण्यामधे दंग होऊन जायचं.
माझ्याबरोबर आनंद दादा होते. काल रात्रीची शंका विचारली,
"हे सेनापती कापशी काय आहे?", मी.
"गावाचं नाव".
"पण मग गावाच्या नावाला सेनापती का जोडलं?".
"तुमचं कोण ते संताजी कापशीतलंच न्हवं का", प्रोफेसरांनी बोलण्यामधे ग्रामीण बाज जिवंत ठेवला होता.
"कोण संताजी घोरपडे?"
"व्हय तेच".
मी भलताच खूश झालो. माझा आवडत्या विषयावरची माहीती मिळाली. गावाला गप्पा हाणायला ओळख असण्याची आवश्यकता नाही. आपण शहरी माणसेच प्रत्येकाला संशयाच्या चष्म्यातून पाहतो. बाजूला नाधवड्याचा माणूस बसला होता. त्यानेही गप्पात भाग घेतला.
"कापशीत संताजी घोरपड्याचा वंश राहतोय. पाचवी का सहावी पिढी आसंल".
"त्यांची आताची पिढी सुद्धा सेनापतींसारखे राहतात का?" माझा प्रश्न.
"तर वो. राजंच ते. नेमबाजीत लई हुशार. अजून बी शिवारात कुनी नेम धरून डुकार मारलं तर लोक म्हनत्यात नेम लई अचूक हाय पठ्ठ्याचा जनू याला कापशीकरानं काढलाय". सार्वजनिक जागेत शिवराळ भाषा वापरण्यात त्या गॄहस्थाला काहीच वाटत नव्हतं. ऐकणार्‍यानाही त्याचं काही वाटत नव्हतं. रांगड्या प्रदेशातील रांगड्या माणसांची भाषासुद्धा रांगडीच. सदाशिव पेठी लोकांना कदाचित हे रूचणार नाही. पण आम्हाला मात्र त्या शिव्यांचाही अभिमान!!
मी आनंद दादांना म्हणालो आपण कापशीला जाऊच. आनंद दादा तयार झाले.
वेळात वेळ काढून आनंद दादा, त्यांची दोन लहान मुलं आणि मी असे चार जण मोटारसायकल वरून निघालो.
वाटेत घाटगे घराण्याचे विद्यमान राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या मालकीचा अवाढव्य तलाव पाहिला. त्यांच्या कित्येक एकर शेतीला पाणी पाजण्यासाठी म्हणून घाटगे राजांनी हा तलाव बांधला.


तलावाच्या तीन बाजूंना शेती आणि एका बाजूला एक हिरवीगार टेकडी. टेकडीच्या पायथ्याचा परिसर तर अगदी सिनेमातलं शुटींग करण्याजोगा! पाऊस जाऊन फार दिवस झाले नसल्यामुळे टेकडीच्या पायथ्याची तलावाला भिडलेली जमिन हिरव्यागार गवताने झाकलेली होती.



दुपारचे बारा वाजायला आले असले तरी तलावाच्या गार पाण्याने आसमंतात मंद असा गारवा होता. तलावाचं अप्रतिम सौंदर्य कॅमेर्‍यात साठवलं. कापशी सात-एक किलोमिटर दूर होतं आणि वेळही तसा बराच शिल्लक होता. म्हणून मोटारसायकल हळूहळू चालवित निघालो. इथं रस्त्याच्या एका बाजूला उथळ दरी होती. दरीचा उतार झाडांनी व्यापलेला. एकदम खाली एक धनगर आपल्या काळ्या-पाढंर्‍या शेळ्या चारीत होता. उजव्या बाजूला पठारावर कसलंसं मंदिर दिसलं. गाडी थांबवून दर्शनाला गेलो. उनाच्या कारातून आल्याने देवळातील थंड लादी पायांना सुखावत होती. दोन तास तिथंच ताणून द्यायची इच्छा होती. पण मोह टाळला. मंदिर लक्ष्मीचं. एका बाजूला काळ्या दगडातील विठ्ठल-रखूमाई तर दुसर्‍या बाजूला शंकराची पिंडी. पिंडीवरल्या नागाने लक्ष वेधलं. बहूतेक ठिकाणी पिंडीला वेटोळे घालून वरती फणा उभारलेला पितळी नाग दिसतो. इथला नाग मात्र पिंडीच्या एका बाजुला होता.



ती एक लांबलचक मुळीच असल्यासारखं वाटलं. एकदम एकसंध. कुठेही जोड दिल्याचं दिसलं नाही. समतोल साधण्यासाठी नागाला एक सुरेख बाक दिला होता.



त्याचं सौंदर्य पाहून छायाचित्र घ्यायचा मोह काही आवरला नाही.
इतक्यात कुठूनतरी माणसांचा मोठा घोळका आला. कित्येक बाया, बाप्ये आणि त्यांची मुलं. कुठल्याश्या वेगळ्याच भाषेत बोलू लागली. लहान मुले विठ्ठलाभोवती, पिंडीभोवती गोळा होऊन बोलू लागली. एकच कालवा झाला. देवळातल्या एकानं सगळ्यांना दम देऊन शांत केलं. आम्ही निघालो.
कापशी गावात पोहोचलो. गाव तसं बर्‍यापैकी मोठं. गावात मोबाईल फोनचे दोन टॉवर होते. एका छोट्याश्या हॉटेलात लस्सी पिताना मालकाकडे संताजी घोरपडेंच्या वंशजांची चौकशी केली. उदय घोरपडे आणि राणोजी घोरपडे हे आता संताजी घोरपडेंच्या वाड्यात रहात असल्याचं मालकांनी सांगितलं. हि पिढी आता राजकारणात आहे. राणोजी हे नाव ऐकून मला कुठंतरी वाचलेली माहीती आठवू लागली.
शिवाजी महारांजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांना बर्‍याच जणांनी विरोध केला. फक्त क्षत्रियच राजा होऊ शकतो असा नियम होता त्या काळात. जातियता शिवरायांसारख्या युगपुरूषालाही चुकली नाही हेच आमच दुर्दैव! हा विरोध करताना महाराजांचा पराक्रम ते लोक पार विसरुन गेले. आश्चर्याची बाब म्हणजे या विरोधकांमध्ये राजांच्या राज्यकारभारात मोलाचे कार्य करणारे आण्णाजी दत्तो सुद्धा सामिल होते! महाराजांच्या मॄत्यूनंतर हेच आण्णाजी दत्तो पुढे शंभू राजांचे कट्टर विरोधक बनले. अगदी संभाजी राजांना अटक करण्याचा हुकूम काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली. म्हणजे महाराजांच्या संपर्कातील लोक अशी सर्वसामान्यच होती. त्यांच्यातही क्रोध, मत्सर, तिरस्कार, संधीसाधूपणा असे गुण-अवगुण होते. या अशा लोकांना बरोबर घेऊन शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं यातच त्यांचं संघटन कौशल्य, नेतॄत्वगुण दिसून येतात. राज्याभिषेक सुरळीत पार पाडण्यासाठी भोसले घराण्याचा वंशवॄक्ष तपासण्यात आला. त्यातून महाराजांचे पूर्वज हे रजपूतांच्या सिसोदिया घराण्यातले असल्याचे सिद्ध झाले आणि राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्याकाळच्या एका प्रवाशाने सुद्धा महाराज हे अस्सल रजपूतांसारखे दिसतात असं लिहून ठेवलं आहे. घोरपडे, घाटगे ही राजघराणी म्हणजे याच रजपूत वंशवॄक्षाच्या फांद्या. ही पुर्ण वंशांवळ मला कुठल्यातरी पुस्तकात मिळाली.
राणोजी घोरपडे, विक्रमसिंह घाटगे ही नावं सुद्धा रजपुतांचा अंश अजूनही कुठेतरी असल्याचं दर्शवित होती.
चौकशी करत वाड्याकडे आलो. अपेक्षेप्रमाणे वाड्याची पडझड झाली होती.



वाड्याभोवती चोहोबाजूंनी दगडी तटबंदी होती. चोहोबाजूंनी वाड्यावर अतिक्रमण झालं होतं. वाड्याभोवतालची तटबंदी तोडून तिथे अनेकांची घर, कचेर्‍या दिसत होत्या. एका मंदिराचा दरवाजा तटबंदी तोडून बनवला होता आणि मंदीर पुर्ण वाड्यात होते.
आम्ही तटबंदीच्या कमानीतून आत गेलो तर वाड्यातली दोन पाळीव कुत्री भुंकू लागली. काही पावलं पुढे टाकली तर अंगावर धावून आली. तेवढ्यात वाड्यातून कोणी मुलगी बाहेर आली. आमचा वाडा पाहण्याचा इरादा तिला सांगितला, तर म्हणाली मुख्य वाडा तोडून आम्ही नवीन वाडा बांधत आहोत. त्यामुळे मुळ वाड्यातले पाहण्यासारखे काही उरले नाही. मी निराश झालो. मध्यभागात जुन्या दगडी वाड्याचे काही भग्न अवशेष दिसत होते. आणि मध्येच सिंमेंट-कॉंक्रीटचं अधर्वट असलेलं बांधकाम आणि पुढ्यात एक आलिशान चार चाकी गाडी.



आनंद दादांनी तिच्याकडे तगादा लावला,
"अहो आसंल तेवढं तरी पाहून जातो".
"अहो पण काही नाहीच आहे तर काय पाहणार?".
"तरी पण जेवढं आसंल तेवढं..." असं म्हणत आनंद दादा खुशाल वाड्याबाहेर ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसले.
इतक्यात उजव्या बाजूच्या खोलीतून राणोजी घोरपडे बाहेर आले. पाठीचा कणा एकदम ताठ. सदरा आणि लेंगा घातलेला. आमच्याकडे फक्त काही क्षणच नजर टाकली. खुर्चीवर बसता बसता शांतपणे म्हणाले,
"काय सांगितलं तिनं ऐकलं? वाडा दाखवत न्हाई म्हनून सांगितलं न्हवं एकदा. का अजून काय येगळं सांगितलं?".
राणोजींच्या आवाजात जरब होती, बेफिकिरी होती. चेहर्‍यावर राजेशाही तेज होतं. आमच्या सारख्या कोण कुठल्या चार माणसांशी बोलण्यात त्यांना काही स्वारस्य वाटत नव्हतं. प्रश्न सुद्धा अगदी शांत स्वरात आमच्या कडे न पाहता भलतीकडेच कुठेतरी बघत विचारलेले.
आनंद दादा तसे कुणाला न ऐकणारे. गोड बोलून बोलून आपल्याला पाहिजे ती गोष्ट पदरात पाडून घेणारे. पण राणोजींचे रोखठोक, स्पष्ट आणि कुणाची मुलाहिजा न बाळगता केलेलं बोलणं ऐकून तेही चक्रावले. काही क्षण फक्त ऐकतच राहिले. मीच मग राणोजींना नम्रपणे विचारलं,
"मग वाड्याचे बाहेरून फोटो काढले तर चालतील का?"
"व्हय काढा की", यावेळी राणोजींचा आवाज जरा खाली आल्यासारखा वाटला.
"मग या बांधाकामांपैकी जुनं बांधकाम कोणतं?"
"हे व्हय दिसतंय ते सगळं जुनंच हाय की", बसल्या जागी हातवारे करीत राणोजी म्हणाले.
राणोजींचा मूड बदलण्याआगोदर मी सर्व जुन्या बांधकामांचे फोटो काढून घेतले!









तो पर्यंत आनंद दादांचं बोलणं परत सुरू झालं.
"ते धनाजी जाधव कुठले? कोल्हापुरचेच का?" ज्यांची उत्तरे माहीत आहेत ते प्रश्न उगाचच पुन्हा पुन्हा विचारण्याची आनंद दादांची खोड आहे.
"ते अमरावतीचे"
"मग पेठ वडगावला काय आहे?", पुन्हा ज्याचं उत्तर माहित आहे असा प्रश्न. कदाचित खात्री करून घेण्यासाठी असेल.
"तिथं त्याला मारलं".
"त्यांचा इथं कुठं वाडा आहे का?"
"एहॅ त्यातलं एवढं काय म्हाईत न्हाई." असं म्हणत राणोजींनी एक मोठ्ठी जांभई दिली. आम्ही काय समजायचं ते समजलो!
आनंद दादा निघण्यासाठी ख्रुर्ची वरून उठले. राजघराण्याची प्रथा म्हणून राणोजींच्या पायाला हात लावण्यसाठी खाली वाकले.
राणोजींनी हात वर करत "र्‍हाऊ दे. त्याची काय गरज न्हाई" म्हटलं.
राणोजींचा मूड यावेळी जरा चांगला वाटला. म्हणून मी एक धाडस केलं.
"साहेब तुमची परवानगी असेल तर तुमचा एक फोटो घेऊ का?"
"या असल्या कपड्यात नको" राणोजी सदर्‍याची छाती धरत म्हणाले.
"तुमची भेट झाली तसं तुमचा एक फोटो मिळाला असता म्हणजे बरं झालं असतं." मी विनंती करत म्हणालो.
"अजिबात नको. या असल्या कपड्यात फोटो काढताय व्हय? काय तरी खुळ्यागत."
आपले फोटो राजेशाही थाटातलेच असावेत असा राणोजींचा आग्रह दिसला. मी शाहू महाराजांचे राजेशाही थाटातले एक छायाचित्र पाहिले होते. राणोजी अशा प्रकारच्या पोषाखात कसे दिसतील त्याचा विचार करू लागलो. कॅमेरा बंद करून व्यवस्थित ठेऊन दिला. माझी निराशा झालेली राणोजींच्या बहूदा लक्षात आली असावी. ते म्हणाले,
"एक काम करा, जाताना गावतलं जुनं हनुमान मंदिर, राममंदिर पाहून जा. तिथं माझा एक फोटो लावला आहे. तो पहा."
"बरं धन्यवाद", म्हणुन आम्ही निघालो.
बराच वेळ चौकशी करत गावातून फिरल्यानंतरही हनूमान मंदिर सापडेना. शेवटी मंदिर सापडलं पण चोहोबाजूने काटेरी तारा लावून बंद केलं होतं. बाहेरुन तरी मंदिर जुनाट दिसत होतं. राम मंदिरही कदाचित असंच बंद असेल म्हणून तो नाद सोडला.
परतीच्या वाटेवर चिखली म्हणून एक ऐतिहासिक गाव असल्याचं आनंद दादांनी सांगितलं. गावात काही तरी जुनी बांधकामं आहेत असं कळलं. गाडी चिखली गावात वळवली. गावाच्या एका बाजूला दोन मजली भव्य वाडा होता. वाड्याच्या चोहोबाजूला पुरूष-दीड पुरूष उंचीची तटबंदी होती. प्रवेश द्वाराची कमान तुटलेली होती. प्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजूला दोन कोठ्या होत्या. गावातली मंडळी त्यांचा उपयोग लघूशंकेसाठी करत होती!



वाडा गावाच्या एका बाजूला असल्याकारणाने वर्दळ कमी होती. एवढ्यात एक गॄहस्थ मोटरसायकलवरून गावाबाहेर पडताना दिसले. त्यांना थांबवून वाड्याबद्दल विचारलं. आम्हाला वाटलं एवढ्या क्षुल्लक कारणासाठी थांबवलं म्हणून हा माणूस बहूदा चिडणार. गाडी बंद करून तो आमच्याजवळ आला आमच्याबद्दल चौकशी करू लागला. मी मुंबईहून आलोय आणि दुसरा माणूस प्रोफेसर आहे म्हटल्यावर त्याला बहूदा आदर वाटला असावा. त्याने माहीती सांगितली, "आमच्या गावात पुर्वी नाणीबाई चिखली नावाची एक महिला होऊन गेली. गावाला चिखली हे नाव तिच्यामुळंच मिळालं. तिच्याकडे बराच जमीन जुमला होता. गावात असणारा वाडा तिचाच. गावात तिला बरंच वजन असावं. पण तिला मूळबाळ नव्हतं. मरताना आपली सर्व जमीन तिने कागलकर घाटगे घराण्याला देऊन टाकली. नंतर बरीच पडझड झाली. मुख्य प्रवेश द्वाराची कमान तर शासनानेच तोडली". इलेक्ट्रीक वायर गावात नेताना कमान आडवी आली. वायरची जागा बदलण्या ऐवजी कमानच तोडली! नाणीबाई थोडीच येणार आहे दाद मागायला? उरल्यासुरल्या दरवाजाची अब्रू गावकरी लघवी करुन घालवतात! ही वरवरची माहीती सोडली तर ती कोणत्या राजघराण्याशी संबधीत होती का? सैन्यात तिने काही पराक्रम केला होता का? हे आणि इतर प्रश्न अनुत्तरीतच राहिले.पण एवढ्या जमिन जुमल्याची आणि वाड्याची मालकीण होण्यासाठी तिने काहीतरी पराक्रम केलाच असावा असं वाटतंय. उशीर झाला होता म्हणून घाई घाईत वाड्याचे फोटो काढले.









रविवार असल्याकारणाने वाड्याची चावी संभाळणारा युवक गावाबाहेर होता. हा वाडासुद्धा आतून पाहता आला नाही. एका दरवाजाच्या चौकटीवर काही देव कोरले होते. त्यातला मोठ्या पोटाचा गणपती ओळखता आला. दुर्दैवाने गणरायाचे मुख तुटले होते. इतर देव काही ओळखता आले नाहीत. देवांचं कोरीव काम फारच आवडलं.



परतताना 'सेनापती' या शब्दाचा उलगडा झाला एवढंच समाधान लाभलं. कोल्हापुरच्या पुढच्या भेटीत नाणीबाईचा वाडा आतून पहायचा आहे, पेठ वडगावची धनाजी जाधवांची समाधी पहायची आहे.

दुसर्‍या दिवशी सकाळी सुरेख धुकं पडलं होतं. सकाळी दारात बसल्या बसल्याच घेतलेला हा फोटो.

Labels:

Monday, September 22, 2008

प्राण्यांची बुद्धिमत्ता

दिनांक गुरू, ०५/१०/२००७ - ०८:५५ रोजी लिहिलेला लेख इथे चिकटवत आहे. प्रतिसादांची वाट पाहत आहे.

भोवती बर्‍याच प्राण्यांना पाहतो. घरातील मांजर, कुत्रा त्याच बरोबर जंगलातील हरणं, वानरं, माकडं,साप, खेकडे, बिबळ्या, पट्टेरी वाघ इत्यादी. मग मनात सहज प्रश्न येतो. या प्राण्यांना सुद्धा मनुष्यासारख्याच भावना असाव्यात काय? प्राणी कदचित आपल्या एवढ्या नसले तरी काही प्रमाणात तरी विचार करत असावेत काय?

यावरील शास्त्रीय लेखन मी वाचलेले नाही. पण प्राणी जीवनावरील मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगुळकर आणि जिम कॉर्बेट यांचं लिखाण भरपूर वाचलं आहे.

डिस्कवरी चॅनल वरील एका कार्यक्रमात एका वन्यजीव शास्त्रज्ञाने सांगितलं होतं कि, वन्यप्राण्यांमधे बुद्धीमत्ता, विचार करण्याची क्षमता वगैरे काही नसते. असते ती त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती. एखादा सिंह एखाद्या हरणामागे लपत छपत जातो. सावज झडपेच्या टप्प्यात येइपर्यंत इंचा इंचाने सरकत राहतो. आणि सावज टप्प्यात येताच त्यावर झडप घालतो. पण हे करण्यामागे त्या सावजाला आपलं अस्तित्व समजू नये हा हेतु नसतो. एखादं मेलेलं जनावर असेल तरी सिंह याच पद्धतीने त्याच्यावर झडप घालतो. प्राण्यांची वागणुक म्हणजे एक यांत्रिक प्रतिक्रियाच असते असं त्या शास्त्रज्ञाचं मत होतं.

आमच्या विभागात एक हौशी गॄहस्थ राहतात. त्यांना कोंबड्याची झुंज लावयचा नाद आहे. त्यासाठी त्यांनं कोंबडे पाळले आहेत. आणि त्यांच्या सोईसाठी कोंबड्यासुद्धा! तर हा कोंबड्यांचा परिवार कॉक कॉक करत हिंडताना मी नेहमी पाहत असे. दोन्ही पायांनी माती मागे सारून उघडे पडणारे किडे चोचीने टिपून खाण्याचा त्यांचा उद्योग कायम सुरू असे. एकदा एक गंमत पाहिली. सुरेश रावांनी कोंबड्यांपुढे ज्वारीचा एक ढीग ठेवला होता सर्व कोंबड्या त्या ढीगावर तुटून पडल्या. पण आश्चर्य म्हणजे त्या ज्वारीच्या ढीगात सुद्धा कोंबड्या मातीत असल्या प्रमाणे पायाने उकरीत दाणे टीपत होत्या! वास्तविक पुर्ण ढिगच खाद्याचा असल्याने त्यामध्ये उकरण्याचं काहीच कारण नव्हतं. म्हणजे आपण का उकरतोय तेच त्या कोंबड्यांना अवगत नव्हते! फक्त टीपताना पायाखालची जमीन उकरायची आणि खाद्य टिपायचं एवढंच त्यांना माहीत होतं. त्यामागे काय कारणे आहेत हे त्यांच्या गावीही नव्हतं!

अशा परिस्थितीत असंच म्हणावं लगेल कि प्राण्यांना बुद्धी नसावी. काही वेळा असंही वाटतं कि, शिकारीतला, आणि मारला जाण्यातला क्रूर पणा कमी करण्यासाठी निर्सगानेही काही व्यवस्था केली असावी. त्यासाठी प्राण्यांमधून प्रेम, वेदना, दुख:, या भावनाच काढून टाकल्या असाव्यात. एकूणच विचार करण्याची क्षमता नाहीशी केल्यावर हे सर्व आपसूकच साधू शकेल.

पण आमचे अनुभव मात्र निराळेच आहेत!

स्वयंपाक घरात कोणीही नसताना एका कोपर्‍यात ठेवलेल्या भांड्यातील नेमक्या दुधावर ताव मारण्याच्या मांजराच्या प्रवृत्तीला विचार न करता केलेली नैसर्गिक प्रवृत्ती कसे म्हणावे?

कोळिणीच्या डोक्यावरील टोपलीतून अलगद मासे उचलून नेणारा कावळा पिंड शिवताना मात्र तासनतास आपल्याला तिष्ठत ठेवतो. याला त्याची नैसर्गिक प्रवृत्ती कसे म्हणावे?

काही पक्षी सुद्धा एखादा कठीण कवचाचा प्राणी खाताना तो उंचावर नेऊन खाली टाकतात जेणेकरुन त्याचं कवच फुटावं आणि आतील प्राण्याला खाता यावं.

असे भरपुर अनुभव प्रत्येकाच्या गाठीला असतील. पण चितमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर आणि कॉर्बेट यांच्या अनुभवावरून तर पुरताच गोंधळ उडतो. हे अनुभव वाचल्यानंतर तर वन्य प्राणी निर्बुद्ध आहेत हा विचार कुठल्या कुठे पळून जातो!

जिम कॉर्बेट हा नावाजलेला खरखुरा शिकारी. नरभक्षक वाघांच्या शिकारी साठी रात्र रात्र जागवणारा. रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबळ्या काही केल्या शिकार्‍यांच्या बंदुकीच्या टप्प्यात येइना. अक्षरशः नऊ वर्षं रुद्रप्रयाग परिसरात त्याने दहशत माजवली. जिमच्या भाषेत सांगायचं तर त्याने संध्याकाळ नंतर संचारबंदीच लागू केली होती. लेकरा बाळांना सहज ओढून नेणार्‍या बिबळ्याचा प्रतिकार सोडाच पण मृतदेहाचा शोधही दुसर्‍या दिवशी सकाळीच इतर गावकर्‍यांबरोबर व्हायचा. दर काही दिवसांनी जवळपासच्या गावात हमखास शिकार करणारा बिबट्या जिमच्या मात्र वाटेला जात नसे. जिमलाही त्याने बरेच झुलवले. शेवटी जिमने गावकर्‍यांच्या वेशात शिकार करण्याचे ठरवले. आता असा प्राणी विचार करत नाही असे म्हणावे काय?

याविषयीचे चितमपल्लींचे अनुभव फारच आश्चर्यकारक आहेत! "वानरांची शेकोटी" या लेखात चितमल्लींच्या एका परिचितांचा अनुभव सांगीतला आहे. या परिचितांनी एकदा रानात वानरांचा एक कळप जंगलात काटक्यांच्या ढिगाभोवती बसलेला पाहीला. त्यांच्या सहाय्यकाने सांगितले की ती वानरांची शेकोटी आहे. दिवस थंडीचे होते. मुळातच वन्यजीव आगीला घाबरतात. शिवाय शेकोटी पेटलेली नसताना वानरांना उब कशी मिळते या प्रश्नांची उत्तरे सहकार्‍याला देता येईनात. पण त्याने सांगितले की या काटक्या आता पुन्हा पेटणार नाहीत. आणि तापासुन पाहता झालेही तसेच! आता वानरांच्या या कृतीमागे काहीतरी विचार असावाच की! यात कसली आली आहे नैसर्गि़क प्रवृत्ती?

हुदाळा (पाणकुत्रा, किंवा ऑटर) हा एक लहानसा दगड पोटावर घेउन पाण्यात पाठीवर तरंगत असतो. त्याच्या खाद्यापैकी ज्या वस्तु फोडाव्या लागतात त्या तो पोटावरील दगडावर आपटून खातो. दगडाचा अवजारासारखाचा उपयोग करणे ही बुद्धिमत्ताच नव्हे काय?

चितमपल्लींच्या अनुभावानुसार शाकाहारी वाटणारी हरणं सुद्धा कधी कधी मांसाहार करतात! एका हरणाने कासवाला खाताना त्यांनी पाहीलं होतं. कवचामध्ये पाय आणि डोकं लपवून बसलेल्या कासवाला बाहेर काढण्यासाठी हरणाने एक युक्ती केली. आपले पुढचे दोन्ही पाय कवचावर ठेऊन दाब दिला. त्याबरोबर आतील कासवाने डोकं बाहेर काढलं आणि हरणाने त्याला बाहेर खेचून खाल्लं.

एकदा तर चितमपल्लींनी काळ्या आणि लाल मुंग्यांची चक्क लढाई पाहीली! या लढाइत व्यवस्थित विचार करून आखलेल्या रणनीतीनुसार लाल मुंग्यांनी काळ्या मुंग्यांवर हल्ला केला. मनुष्य प्राण्याच्या युद्धात रक्ताचा आणि मृतदेहाचा सडा पडावा तसा काळ्या आणि लाल मुंग्यांच्या डोक्यांचा आणि धडांचा सडा पडला. लाल मुंग्या तावडीत सापडलेल्या काळ्या मुंग्याचं डोकं धडावेगळं करुन समाचार घेत होत्या. हे सर्व कशासाठी तर काळ्या मुंग्यांच्या वारुळातील अंड्यांसाठी! या अंड्यातील निघणार्‍या काळ्या मुंग्यांचा वापर लाल मुंग्या गुलाम म्हणुन करत असल्याचं चितमल्लींचं निरीक्षण आहे! आता या मुंग्यांना निर्बुद्ध कसे म्हणावे?

हे आणि इतर अनुभव तर असेच सांगतात की वन्यप्राण्यांकडे मनुष्यापेक्षा एक वेगळी शक्ती असावी!

माझा ट्रेकिंगचा अनुभव

दिनांक ०५/११/२००७ रोजी मी लिहिलेला अनुभव इथे चिकटवत आहे. प्रतिसादांची वाट पाहत आहे.

रोजच्या त्याच त्याच पणाचा कंटाळा आला होता. रोज सकाळी बरोबर सहा वाजता उठणं, ब्रश, आंघोळ, चहा, नश्ता, बस, ट्रेन, काम, बॉस.....च्यायला मनुष्य प्राण्याच्या जन्माला आलो म्हणुन इतका त्रास. अक्षरशः वीट आला होता या सगळ्याचा!

मागच्या फिरण्याला तब्बल पंधरा दिवस झाले होते! बापरे पंधरा दिवस!

नाही, आता बस! हा शनिवार रविवार कुठेतरी जायचच.

अभयला फोन केला.

"येणार का ट्रेकींगला या शनिवारी?", मी.

"ठीक आहे, कुठे जायचं?", अभयचं उत्तर.

"कर्जत ट्रेन पकडू, कुठे जायचं ते ट्रेनमध्ये ठरवू".

"ठीक आहे" असं म्हणुन अभयने फोन ठेउन दिला!

च्यायला, कुठे जायचं निश्चित नसताना हा मनुष्य तयार झाला? पक्का भटक्या आहे माझ्यासारखा!

गिर्यारोहणाच्या छंदाला माझ्या आणि अभयच्या दोघांच्याही घरून पाठिंबा नव्हता. आम्ही दोघं भाऊ, शिवाय मी काहीसा विक्षिप्त अशी घरात प्रतिमा म्हणुन मला फक्त पाठींबा नसायचा. विरोध करण्याचा भानगडीत साहसा कोण पडत नाही. याउलट अभयचं. तो त्यांच्या घरातला एकुलता एक वंशाचा दिवा. शिवाय वडिलांच्या धाकात राहण्याचा अभिनय करणारा. त्यामुळे त्याच्या घरुन गिर्यारोहणाला विरोध. अशा परिस्थितीत घरातून जेवणाचा डबा बांधून मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याच्या एखाद्या गावातून मिळणार्‍या वडापाव किंवा शहरातून बांधुन नेलेल्या स्लइस्ड ब्रेड आणि अमुल लोण्यावर दिवस साजरा व्हायचा!

पण त्या दिवशी ठरवलं. असं उपाशी पोटी नाही भटकायचं. स्वतः जेवण बनवायचं आणि सगळ्यांच्या नाकावर टिच्चून घेऊन जायचं. बसं ठरलं. मेनू ठरला तो म्हणजे साबूदान्याची खिचडी! माझी आई काय छान बनवते! नुसता विचार करुन तोंडाला पाणी सुटलं!

सकाळी लवकर उठायचं म्हणुन रात्री लवकर झोपलो. सकाळी उठल्यावर एक छोटीशी चूक लक्षात आली. साबुदाणे भिजत घालताना पाणी कमी टाकले होते. त्यामुळे साबुदाणे पुर्ण भिजले नव्हते.

पण अरे हॅट, या एवढ्या तेवढ्या चुकीने माघार घेणारा थोडाच आहे मी? दीड तासाने झक्कास खिचडी बनवून झाली! काही छोट्या छोटया चुका सोडल्या तर अगदी फक्कड झाली! चुका म्हणजे अगदी साध्या. साबुदाणे थोडे कच्चे होते, मीठ थोडं कमी होतं, मिरच्या सापडल्या नाहीत म्हणुन टाकायच्या रहुन गेल्या, शेंगदाणे भरडायचे होते, पण मिक्सर मघ्ये त्यांचं पार पीठ झालं, तेल थोडं जास्तच पडलं आणि बल्बच्या प्रकाशावर जेवण केल्यामुळे हळदीच्या पिवळ्या रंगाचा अंदाज आला नाही म्हणुन खिचडी पिवळी धमक झाली. बाकी खिचडी एकदम मस्त झाली! पण यावेळी तोंडाला का पाणी सुटलं नाही कुणास ठाउक?

या गडबडीत आंघोळ करायची राहून गेली! एक दिवस आंघोळ केली म्हणुन काय बिघडत नाही. अशा झक्कास खिचडीसमोर त्या आंघोळीचा काय विचार करायचा?

पाठीवर रकसॅक अडकवून निघालो. दादरला अभय भेटणार होता. उनातून चालणं नको म्हणून सकाळी लवकरच निघालो. नाहीतर दरवेळी आम्ही दहा वाजता निघतो! नेहमीप्रमाणे मला उशीर झाला होता. स्टेशनवरच अभयने माझ्या ऊशीरा येण्याबद्द्ल माझ्यावर तोंडसुख घेतलं.

कुठं जायचं हे अजुन ठरायचं होतं. थोडा विचार केला आणि ठरवलं माथेरानला लागुन असणार्‍या पेब किल्ल्यावर जाऊ. या किल्ल्यावर माझी दुसरी फेरी होती. अभय मात्र पहिल्यांदाच जात होता. साहजिकच त्याचा वाटाड्या मीच.

या किल्ल्यावर इतिहासात काही विषेश घडल्याचं वाचलं नाही. पण सुरेख आहे. पायथ्याला आदिवासींचे पाडे. शेवटचा पाडा सोडला की लहान टेकडीवरुन गडावरची वाट सुरू होते.

दिवस ऊन्हाळ्याचे होते. हा ट्रेकिंगसाठी चांगला ऋतू नव्हता. पण माझ्यातला मराठा काही स्वस्थ बसत नव्हता. मला म्हणत होता, मराठ्यांनी एवढया लढाया लढल्या आणि जिंकल्या त्या काय ऋतू पाहून केल्या काय? आम्ही सुद्धा त्याच मराठ्यांची औलाद आहोत! उन असु दे, पाऊस असु दे नाही तर अजुन काहीतरी असु दे. गड जिंकायचाच.

गडाच्या पायथ्याला पोहचायलाच नऊ वाजले होते. ऊन काही विशेष जाणवत नव्हतं. मस्त मजेत पाठीवरुन ओझं वगवित होतो. उर्जा साठवून ठेवण्यासाठी चालताना शक्यतो बोलणं टाळत होतो. जशी चढण सुरु झाली तसं पाठीवरची पाच किलोच्या रकसॅकचं वजन सहा किलोचं झाल्यासारखं वाटायला लागलं. एक मोठं झाड पाहुन त्याच्या थंडगार सावलीमध्ये थोडावेळ आराम करायचा म्हणून बसलो.

आजुबाजुला चिट्पाखरु नव्हतं, शहरी कानाला बोचणारी शांतता. फक्त पाखारांचा आवा़ज. अशा वेळी काही तरी विषय निघतो आणि अभयच्या गप्पा सुरू होतात. गप्पांच्या ओघात दोन तास कसे निघून गेले काहीच कळालं नाही. आणि मग "थोड वेळ थांब रे, निघू रे, थोडा वेळ बस तर खरं" असं करत करत दुपारचे बारा वाजले! पाखरांचा आवाजही थंड झाला. चांगलं टळटळीत उन झालं. अजुन अर्धी चढणही झाली नव्हती. सगळा कंटाळा झटकून पुन्हा चढण सुरु केली. पुन्हा तोंडं बंद. अर्ध्या तासातच घामानं अंग थबथबलं. पाठीवरच्या बॅगेचं वजन आता सोळा किलो झाल्यासारखं वाटायला लागलं. चढण पूर्ण करायच्या विचारात होतो. पण वाटेत पुन्हा एकदा एक मोठं झाड आलं! झालं! झाडाची थंडगार सावली, शहरी कानाला बोचणारी शांतता, एखादा विषय आणि अभयच्या गप्पा! इथेही चांगला पाऊण एक तास गेला!

माझ्यातला मराठा परत जागा झाला. हात् लेकानो, कसली आमची मराठ्यांची जात? मराठ्यांनी एवढया लढाया लढल्या आणि जिंकल्या त्या काय अशा थंडगार झाडाखाली आराम करुन? आम्ही सुद्धा त्याच मराठ्यांची औलाद आहोत! झाड असु दे, नाही तर अजुन काहीतरी असु दे. गड जिंकायचाच.

परत खांद्यावर रकसॅक अडकवली आणि चालायला सुरवात केली. इथून पुढची पायवाट घनदाट जंगलातुन होती. उन विरळ होतं. समोरच दिसणार्‍या इंग्रजी V आकाराच्या घळीपर्यंत जायचं होतं. ते़थून डाव्या बाजूचा कातळ चढून गेलो की गडावर पोहोचलो म्हणून समजा. झपझप पावलं टा़कत गडमाथा गाठला एकदाचा!

एवढा २२००-२३०० फुटांचा अजस्त्र पर्वत पण त्याच्या माथ्याचा विस्तार फार कमी. उत्तर दक्षिण विस्तार खुप आहे पण पुर्व पश्चिम जवळपास नाहीच. गडाची पायवाट पुर्वे कडुन आहे घळीपासुन पुढे आपण गाडाच्या पश्चिमेकडे जातो. या बाजूला एक गुहा आहे. या गुहेचा पुर्वी कशासाठी उपयोग केला जात असेल काय माहीत नाही पण आता कुण्या एका साधुमहारांजांचं आश्रम या गुहेत आहे. आश्रमाचे ट्रस्टीसुद्धा गडावर आले होते. आम्ही गेलो त्यावेळेस चुलीवर त्यांचं जेवण शिजत होतं. आम्हालाही जेवण्याचा आग्रह केला. आम्ही नम्रपणे नकार दिला. शिवाय आमच्या कडे आमची फक्कड खिचडी होतीच!

अभयकडे पाठ फिरवून बसलो आणि त्याला फक्कड खिचडी खाण्यास सांगितले!

इथे सावली पुष्कळ होती. थंडगार वारा होता. शांतता सुद्धा होती. पण एकांत नव्हता. त्यामुळे अभयच्या गप्पा रंगल्या नाहीत.

इथून पुढे काय? असा प्रश्न पडला. ट्रेक तसा मिळमिळीतच झाला होता. फक्कड खिचडी सोडली तर लक्षात राहण्यासारखं काहीच झालं नव्हतं. मग मला एक कल्पना सुचली. गुहेपासून पुढे जाणारी एक पायवाट सरळ माथेरानच्या पॅनोरमा पॉइंट खाली जाते हे माहीत होतं. पण. तेथून पुढे खाली कसं उतरायचं, किंवा माथेरानकडे कसं जायचं माहीत नव्हतं. गुहेतल्या एका नोकराकडे चौकशी करुन पायवाटे वरुन चालायला सुरवात केली.

दुपारचे तीन वाजले होते. वाट मळलेली नव्हती. पुष्कळ गवत उगवलं होतं. गवत सुकल्यामुळे पाय सरकत होते. आता या वाटेची भिती वाटू लागली होती. थोडं पुढे जाऊ, वाटेचा अंदा़ज घेऊ. काही धोका वाटल्यास आल्यावाटेनं परत माघारी जाऊ असा विचार करुन चालत राहिलो.

ही वाट आम्हाला एका मोकळ्या पठारावर घेऊन आली. अभय माझ्या बराच मागे राहीला होता. त्याची वाट पाहत थांबलो आणि पुढील वाटेचा अंदा़ज घ्यायला लागलो. पायवाट पुढच्या विशाल टेकडीच्या भिंतीला जाऊन भिडत होती. आणी इथून पुढे.... अरे बापरे! बघुन काळजात धस्स झालं! ही वाट अरुंद होत होत त्या टेकडीला समांतर जात होती. एका बाजुला टेकडीची भिंत मध्ये जेमतेम एक मनुष्य उभा राहू शकेल अशी वाट आणि दुसर्‍या बाजूला खोल अशी दरी!

एव्हाना अभय माझ्यापर्यंत येऊन पोहोचला होता. तो सुद्धा त्याच वाटेकडे पाहत होता. ती वाट फिरुन येत असल्यामुळे,आपली वाट तिच आहे हे काही त्याला ओळखता आले नाही.
त्याने अगदी सहज विचारलं, "ती अरूंद वाट पाहीलीस रमेश?, काय भयानक आहे नाही? कुठे बरं जात असेल ती?"

मी सुद्धा तेवढ्याच सहजतेने उत्तर दिले, "ती वाट माथेरान कडे जाते. आपण त्याच वाटेने जाणार आहोत".

"काय वेड बिड लागलं का तुला?, शेवटची ट्रेकींग नाही करायची आहे आपल्याला", अभयची अपेक्षित प्रतिक्रिया.

माझ्यातला मराठा परत तलवार घेऊन ऊठला!. हात् लेकानो, कसली आमची मराठ्यांची जात? मराठ्यांनी एवढया लढाया लढल्या आणि जिंकल्या त्या काय अशा वाटांना भिऊन? आम्ही सुद्धा त्याच मराठ्यांची औलाद आहोत! अरूंद वाट असु दे, नाही तर अजुन काहीतरी असु दे. माथेरान जिंकायचाच.

थोड्या कुरकुरीनंतर अभय सुद्धा तयार झाला.

अरुंद वाटेने तोल सावरत सावरत निघालो. सुर्य आग ओकत होता. तहान लागली होती पण पाणी चपापत्या उन्हामुळे फार गरम झालं होतं. पुढे ही वाट थोडी रुंद झाली होती. या पुढची चढण अगदीच कठीण होती म्हणुन कोण्या सामाजसेवकाने बांबूपासुन बनवलेली एक तकलादू शिडी लावली होती. घाबरत घाबरत ती सुद्धा पार केली! इथे येइपर्यंत दोघेही फार थकलो होतो. थोड्याच अंतरावर माथेरानच्या मिनीट्रेनचे रूळ दिसले. पूर्ण थकलेल्या अवस्थेत पुढचा रस्ता कसा असेल याचा विचार करु लागलो. तेवढ्यात माथेरानची मिनिट्रेन येताना दिसली, या ट्रेनची गती अगदी कमी होती.

अभयने आता आदेश दिला, " रमेश, ट्रेनमध्ये चाढायचं".

"अरे पण आपल्याकडे तिकीट नाही!"

"मरु दे ते तिकीट, ट्रेनमध्ये चाढायचं म्हटल्यावर चढायचं", अभय आता पेटला होता!

इतक्यात ट्रेन जवळ आली आणि गेली सुद्धा!

अभयने पटकन दुसर्‍या डब्यात उडी मारली होती. मला काही ते जमलं नाही.

अभय ट्रेनमधून आवाज देत होता, "अरे रमेश धावत ये आणि मागच्या डब्यात चढ."

मी सुद्धा मग काही विचार न करता ट्रेन मागे पळत सुटलो आणि सर्वात मागच्या डब्यात चढलो! हा डबा होता नेमका ट्रेन मधील गार्ड्चा!!!!

एवढ्या आडवाटेवर थेट गार्डच्या डब्यात एका अनोळखीला घुसताना पाहुन गार्डसुद्धा चपापला.

काही क्षणात तो सावरला. त्याचा पहिलाच प्रश्न, "तिकीट?"

याच बरोबर माझ्यातला मघापासुन माझी पाठ घेणारा मराठा चालत्या ट्रेन मधुन उडी टाकून जंगलात धूम पळुन गेला!!!

असं फैलावर घेतलं त्याने मला काय सांगू?

मुकाट ऐकून घेतलं त्याचं. च्यायला, तिकीट नव्हतं म्हणून, नाहीतर दाखवला असता माझा इंगा!

माझ्यावर यथेच्छ तोंड सुख घेतल्यानंतर ट्रेनमधून उतरवून दिलं. अभय सुद्धा मला पाहून उतरला. तो पर्यंत रानावनातुन सुसाट पळत सुटलेला माझ्यातला मराठा सुद्धा परत आला. आणी आम्ही माथेरान उतरून घरी परत आलो.

Labels:

Saturday, June 9, 2007

करदोरा-एक ग्रामीण कथा

करदोरा

कडाक्याची थंडी पडली होती. म्हातार्‍या माणसांना थंडी जास्तच वाजते, म्हणूनच पर्वती अन् कुंडलिका मुंबईत एका आलिशान बंगल्याच्या बाल्कनीत उन्हाला बसले होते. गळ्यात सोन्याचं डोरलं, हातात पाटल्या अंगावर चांगलं लुगडं नेसून खुर्चीत ती बसली होती. दोघं येणार्‍या-जाणार्‍या मोटार गाड्या पहात होते. सुनबाई सुद्धा मोठ्या गुणाची होती. ती प्रेमानं त्यांची सेवा करीत होती. यशवंता आला. तो आई-वडिलांच्या पाया पडला. 'आई येतो गंs' म्हणून तो कामासाठी बाहेर गेला. त्याच्या पाठमोर्‍या आकॄतीकडं बघत त्यांना आपली तीस वर्षापूर्वीची परिस्थिती आठवायला लागली.... खरंच त्यांची त्यावेळची परिस्थिती पाहिली तर ही प्रगती कुणाला न पटणारीच होती....
"आवं घरात दान्याचा कण नाही, शिजवावं तरी काय?" पारी आपल्या कारभार्‍याला सांगत होती. अंगावरलं कांबरून त्यानं बाजूला सारलं, चूळ भरली.
"आलो काय तरी जमतंय काय बघतो." म्हणून तो बाहेर पडला. मे महिन्याचे दिवस. कोल्हापूर पासून दहा कोसावरलं गाव. काम शोधून मिळत नव्हतं. अशी गावची स्थिती. गेलेला धनी दुपार झाली तरी परत आलेला नव्हता. सकाळपसून पोराच्या पोटात फक्त पाणीच होतं. पोटाला टॉवेल गूडाळून तो कोपर्‍यात बसला होता. त्याच्या पोटात कावळ्यांनी धुमाकूळ घातला होता. पोराची हालत पाहून तीचा जीव तळमळत होता. त्याला काय तरी करून घातलं पाहिजे म्हणून तिच्या जीवाची घालमेल होत होती. सूर्य तर आग ओकत होता. ती पोराजवळ जायची. त्याच्या डोक्यावरनं हात फिरवायची. तिची ती घालमेल यशवंत किलकिलं डोळं करून पाहत होता. गेली वर्षभर पार्वती घरात होती. तिला एका बाजूला लकवा मारलाता. चांगलं चार घास खाऊनपिऊन असलेलं घर हिच्या आजारपणात घाईला आलेलं. दाव्याची जनावरं कधीच विकलीती. आजारपणातून थोडी बरी झालती, पण तोपर्यंत संसाराचा कणाच मोडलाता. मोठ्या हिम्मतीनं तिनं संसार उभा केलता. पण आजारी पडल्यानं वर्षाच्या आतच मोडून पडलाता. डोळ्यातनं टिप गाळण्यापेक्षा ती काही करू शकत नव्हती. दुपारी तीनच्या सुमारास कुंडलिकराव घराकडे येताना दिसलं. कायतरी धनी घेऊन आलं असतील. आता पोराच्या पोटात दोन घास पडतील, या आशेने ती उठली. ते घरात आलतं. दोन कणसांशिवाय त्यांच्या हातात काही नव्हतं. ती कणसं तिनं घेतली. चुलीजवळ गेली. शेणपूट घालून चूल पेटवली. कुंडलिकरावांनी पोराला पाहिलं तसं त्याना रडूच कोसळलं. ते हूंदके देऊन रडाय लागले. पोराला जवळ घेतलं अन् हुंदके देतच,
"हे देवा परमेश्वरा काय हे दिस दाखावलंस? माझा पोटचा गोळा उपाशी ठेवलास. मी काय करू?"
एवढ्यात दारावर धाकलं पाटील आलंत.
"कुंडलूतात्या गार उपसायची हाय, आबांनी तुला बोलावलंया."
त्याला देवच आपल्या मदतीला धावून आलाय असं वाटलं. संध्याकाळच्या जेवणाची सोय झाली म्हणून त्यानं डोळं पुसलं.
"मी आलोच मालक. तुम्ही व्हा पुढं."
माणसं जमाय संध्याकाळ झाली. सहा वाजता गार उपसायला सुरवात झाली. प्रत्येक बुट्टी टाकताना त्याला त्रास होत होता. पोटात आग पडलीती. अंगात त्राण नव्हता, तरीसुद्धा पोराच्या पोटात चार घास पडतील म्हणून जीव ओतून तो गार उपसत होता. पहिली ट्रॉली एका तासात भरली. ट्रॉली शेतात ओतायला गेली. टिपूर चांदणं पडलं होतं. तरीबी ते चांदणं त्याला भकास वाटत होतं. पाटलीनं बाईनं चहा दिला. आज दिवसभरात पाण्याव्यतिरिक्त त्याच्या पोटात चहा चालला होता. त्याच्या पोटातलं कावळं जरा शांत झालं. पुन्हा ट्रॉली भराय सुरवात झाली. घड्याळाचा काटा पुढं सरकतं होता. तसतसं त्याला आपल्या उपाशी बायका पोराचं केविलवाणं चेहरे दिसत होते. कधी एकदा गार उपसून होतीया अन् तांदूळ घरला घेऊन जातोय असं झालंतं. नऊ वाजता गारीचा तळ लागला. त्याला आनंद झाला. हातपाय धुतलं तसं थोरलं मालक म्हणालं,
"कुंडलिका, हतासरशी येताना शेतातली लाकडं टाकून आणा जावा ट्रॉली येताना रिकामी येतीया."
"जी मालक" म्हणून तो ट्रॅक्टरच्या मागं चालू लागला. विचाराचं काहूर डोक्यात माजलंत. यायला वेळ झाला अन् दुकान बंद झालं तर? ट्रॉली मागून चालताना आपल्या डोक्यावरती कुणीतरी दहा मणाचं ओझं दिलंय असं वाटाय लागलं. पैसे मिळणार या आशेने तो वाड्यात शिरला, पण पाटलांना गाढ झोप लागली होती. जड अंतःकरणानं तो घराकडे चालला. त्याला वाटलं पाटलीन बाई कडून भाताचा हेंडा पोराला मागून घावा. पण धाकट्या वैनी साहेबांच्या पुढ्यात मागायचं कसं, त्याला लाज वाटाय लागली. त्याचं पाय पुढे सरकत नव्हतं. आता पोराच्या पोटात काय घालायचं याचा विचार त्याला सतावत होता. पोरगं वाट बघत दारातच बसलं होतं. बाला येताना बघून त्याला आनंद झाला. ते पळत त्याच्याकडं गेलं. पण हातात काहीच नव्हतं. पोराला उचलून घेतलं. त्याचं दोन मुकं घेतलं. त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवताना त्याच्या मनाची घालमेल सुरू झाली. डोळ्यातनं टिप गाळीतच तो आत आला. बायकोच्या गळ्याला जाऊन पडला.तो रडाय लागला. बायको समजावण्याच्या सुरात म्हणाली,
"धनी, नका काळजी करू आजच्या दिस पाणी पिऊनच रात्र काढू."
माठातलं पाणी तिघंबी प्याली अन् अंथरुणावर पडली. यशवंता या कुशीवरून त्या कुशीवर होत होता. त्याला भूक अनावर झालती. सकाळपासून फक्त मक्याचं दाणं पोटात गेलंतं. त्याला आता कोतमिरेनी रानात केलेली कलिंगडं दिसू लागली. ती कलिंगडं काढायला आल्यात हे त्यानं पाहिलं होतं. सकाळी यशवंता उठला आईला सांगितलं,
"आलो जरा इथनं."
तो गेला कलिंगडच्या रानात. कोतमिरे कलिंगड राखणदारीला असायचा. पण तो नव्हता. या संधीचा फायदा त्यानं घेतला. इकडं तिकडं बघितलं, तिथलं एक मोठं कलिंगड तोडलं. लांब झाडीत बसून त्यानं ते दगडानं फोडलं. जसजसं कलिंगड पोटात जाऊ लागलं तसतसं त्याला बरं वाटू लागलं. एवढयात पाठीमागून म्हादबानं त्याच्या पेकटात लाथ घातली. तसं ते 'आईs गं' करतच ओरडलं.
"चल तुला दावतो इंगा, चल चावडीत."
असं म्हणत त्यानं त्याला ओढाय सुरुवात केली. यशवंता हात जोडून म्हाणाला.
"एवढ्या डाव चूक माफ करा. परत अशी चूक आईच्यानं हुणार नाही."
"चूक करतंस नी माफी मागतंस. तुझ्या आईला तुझ्या", असं म्हणत त्यानं ओढायला सुरुवात केली.
शेतातनं गावात आल्यावर म्हादबाला चेव चढला. परत कोणी आपल्यात चोरी करताना दहा वेळ विचार करावा म्हणून त्यानं मारायला सुरुवात केली. यशवंता रडत होता. लोक विचाराय लागली.
"काय झालंरं म्हादबा?"
"कलिंगड चोरूज खाईतं नव गा. गावलंय सरपंचाकडं नेतो." सरपंचाला म्हादबानं वॄत्तांत सांगितला. त्यानी शिपाई पाठवला. तो गेला बोलावाया.
"कुंडलिका सरपंचानी बोलावलंय."
"कारं काय काम हाय?"
"तुझ्या पोरग्यानं प्रताप केलाय."
"काय केलं त्येनं?"
"कलिंगड चोरलं, म्हादबाच्या शेतातलं." हे ऐकताच कुंडलिका मटकन् खालीच बसला. शिपाई त्यातनं म्हणालाच, "असलं पोरगं जन्माला आलं तवाच नरडं का दाबलं नाहीस." कुंडलिकाला माहिती होतं पोरगं असं का वागलं. शिपायाच्या पाठीमागून चालताना तो नशिबाला दोष देऊ लागला. आणखी काय काय बघायला लावतोस देवा? झटकन् त्यानं म्हादबाचं पायच धरलं.
"एवढा डाव माफ करा मालक, बारकं प्वार हाय त्येला काय कळतंया. एवढ्या डाव चूक पोटात घाला मालक."
यात आपल्या पोराची काय चूक नाही हे माहीत असूनही त्यानं जड अंतःकरणानं त्याला मारलं. ते रडत म्हणाय लागलं.
"बाबा परत नाही असं करत, उपाशी पाणी पिऊन राहतो. पण मारू नगंस, बाबा लय लागतंया मारू नगंस."
त्यानं हातच जोडलं तसं कुंडलिकाला कालवल्यासारखं झालं. त्याला आपणच रडावं असं वाटाय लावलं. चाबकाच वाद आपणच मारून घ्यावं असा विचार त्याच्या मनात आला. हात सैल झाल्याचं पाहून यशवंता पळत सुटला. त्याचा गाव आता खूप लांब राहिलाता. पळत-पळत रेल्वे स्टेशनवर आला. भितभितच त्यानं रेल्वेच्या डब्यात प्रवेश केला. कोपर्‍यात जाऊन बसला. थोड्याच वेळात रेल्वे सुरू झाली.
सकाळी त्याला जाग आली तेव्हा रेल्वे थांबलेली होती. तो बाहेर आला. लोकांचा महापूर दिसत होता. सर्वजण गडबडीत होते. भितभितच चड्डी अन् अंगरखा घातलेला यशवंता मुंबईच्या गर्दीत घुसला.
सुरवातीचे दोन दिवस त्यानं भिकच मागितली. संध्याकाळी फुटपाथवर झोपायचा. तिथेच बुट पॉलिश करणारी मुलं झोपायची. ती फार पैसे खर्च करायची. नवीन नवीन पदार्थ खायची ते पाहून त्यालाही वाटू लागलं. आपण बूट पॉलिस करावं. पण साहित्य खरेदीसाठी त्याच्याजवळ पैसे नव्हते. आपण काय करावं अन् पैसे जमा कारावेत? भीक मागावी का? इतक्यात त्याचा हात कमरेला गेला. त्याच्या कमरेला एक चंदीचा करदोरा होता. त्याच्या आईन सोन्याचं डोरलं विकून पितळेचं डोरलं केलं. पण पोराच्या कमरेचा करदोरा विकला नव्हता. यशवंताला हे माहीत होतं. याचं पैसे येतील. त्यानं त्यातल्याच एका पोरग्याला विचारलं.
"मला चांदीचा करदोरा विकून बूट पॉलिस साहित्य घ्यायचं आहे. हा कूठं विकूया?"
ते म्हणालं,
"मीच घेतो. तुझ्याकडं पैसे झालं की परत माझं मला पैसे दे, अन तुझा करदोरा परत घे."
त्यानं करदोर्‍याच्या बदल्यात याला साहित्य घेऊन दिलं. बूट पॉलिशचा धंदा सुरू झाला. पहिल्याच दिवशी त्यानं चांगला तीस रुपयांचा धंदा केला. चौथीची परीक्षा पास झालता. त्या चौथीच्या पुस्तकातलं इतिहासाचं पुस्तक त्याचा जीव की प्राण होतं. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला की त्याला वीरश्री चढायची. म्हणूनच त्यानं पहिल्या कमाईचं इतिहासाचं पुस्तक खरेदी केलं. रोज सकाळी कामावर जाताना त्या पुस्तकातल्या महाराजांच्या फोटोच्या पाया पडायचा अन् जायचा. त्यामुळे त्याच्यात वेगळंच बळ यायचं.
इकडे आईनं अंथरूण घरलं होतं. 'यशवंता यशवंता'चा जप करत होती. कुंडलिका हिचं दु:ख पाहायचा अन् परगावी राहणारी लोकं गावी आली की विचारायचा,
"आमचा यशवंता कुठं दिसला का?"
अशातच यशवंताला एक गाववाला भेटला. त्या गाववाल्यानं सगळी हकीकत यशवंताला सांगितली. त्याच्याकडून त्यानं घराकडे शंभर रूपये पाठवले. त्या शंभर रुपयापेक्षा आपलं पोरगं व्यवस्थित हाय हे ऐकून ती उठून बसली. सगळीकडं सांगत सुटली,
"माझ्या यशवंतानं पैकं पाठवलं पैकं." दोघंबी त्या नोटकडे बघत आनंदाश्रू गाळू लागली.
इकडे पावसाळा सुरू झाला होता. सर्वांनीच बुट पॉलिस बंद करून छत्री दुरुस्तीचा धंदा सुरू केला. वर्षात तसे त्याचे तीन धंदे व्हायचे. बुट पॉलिश, छत्री दुरुस्ती बरोबर तो स्टोव्ह रिपेअरी सुद्धा करायचा. पैसे मिळत होते. इतर मुलांच्या प्रमाणं हा चैनी करत नव्हता. ती पोरं याला सिगारेट ओढायला सांगायची, पण पैसे लागत्यात म्हणूनही तो तिकडे कानाडोळा करायाचा. मित्रांच्या ओळखीनं बँकेत खातं उघडलं. पैसे साठाय लागले. गावकडे पैसे पाठवायचा. त्यानं जीवनात एक ठरवलं व्यसन कुठलं लावून घ्यायचं नाही.अन् काय वाटेल ते झालं तर चालंल पण चोरी करायची नाही. फक्त कष्ट आणि कष्ट करायचं. एखादे संकट आलं की चौथीचं इतिहासाचं पुस्तक काढून शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायचा. पुन्हा त्याच्यात हिमंत यायची, त्याचं बळं वाढायचं.
दिवसामागून दिवस जात होते. आज त्याच्या जीवनातला महत्वाचा टप्पा होता. त्यानं रिक्षा घेतली होती. रिक्षाची चाकं फिरू लागली. पैसे जमाय लागलं. वर्षात तीन धंदा करणारा यशवंत गप्प बसंना. सहा महिन्यातच त्याच्या लक्षात आलं. जुन्या रिक्षा देणे-घेणेचा धंदा आहे. हा कमिशन बेसिसवर चालतो. मग काय त्यानं रिक्षा चालवत चालवत कमिशन बसिसवर रिक्षा देणे-घेणेचा व्यवसाय सुरू केला. ज्या स्टॉपवर रिक्षा थांबायची तिथे ओळखी करून घ्यायचा. कुणाची रिक्षा द्यायची आहे? कुणाला पाहिजे आहे काय? विचारायचा. अशानं ओळखी वाढल्या. विक्री वाढली. रिक्षा विकून त्यानं टॅक्सी घेतली. टॅक्सी देणे-घेणेचा सुद्धा व्यवसाय सुरू केला. कुणाला न फसवता धंदा करायचा. लोकांचा विश्वास वाढल. जो-तो म्हणायचा,
"टॅक्सी पाहिजे, आमचा दोस्ता हाय की यशवंता. जावा त्याच्याकडं."
प्रगतीची एक एक पायरी चढत होता. लग्न झालं मुलगा झाला. एकाच मुलग्यावर ऑपरेशन केलं. आज यशवंता चाळीस वर्षाचा झालता. दादर मध्ये एक घर घेतलं. स्वतःचा कार बाजार सुरू केलता. आजची परिस्थिती पाहून आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळत होते.
यशवंता ज्यावेळी मुंबईत आला, त्यावेळी त्याच्याजवळ फक्त होती चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा अन् करदोरा. तो करदोरा त्यानं जपून ठेवलाय. आजही ज्या ज्या वेळी त्याच्यावर संकट येतात त्यावेळी तो शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतो अन् संकटाला दोन हात करतो.

प्रमोद तौंदकर
कोल्हापूर



--------------------------------------------------------------------------------


कोल्हापुरात असताना 'प्रमोद तौंदकर' स्थानिक तरुण लेखकाशी ओळख झाली. गप्पांच्या ओघात त्याने लिहीलेल्या काही कथांचा विषय निघाला. लेखक स्वत: ग्रामीण भागात रहात असल्या कारणाने त्याच्या लेखात साहजिकच ग्रामीण बाज होता. त्याच्या कथा या 'समाज प्रबोधन' या हेतूने लिहिलेल्या असल्या तरी त्यातील ग्रामीण भाषा मला फार भावली. या कथा इतरांपर्यंत पोहोचव्यात असं मला वाटलं, म्हणून हा उद्योग. यातील पहिली कथा 'निवद-एक ग्रामीण कथा' या शिर्षकाखाली या अनुदिनीवर या आधीच प्रसिद्ध केलेली आहे.

ता.क.: ही कथा इथे प्रसिद्ध करण्यासाठी लेखकाची परवानगी घेतलेली आहे.