Saturday, October 7, 2023

 एक मधाळ अनुभव


आज कधी नव्हे तो सोसायटीचा हणमंत वाँचमन ड्युटीवर असताना उभा होता. डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताच्या अंगठ्याने तंबाखू चोळत कंपाउंड जवळच्या एका झाडाच्या शेंड्यावर एकटक नजर लावून होता. बाजूला दोन्ही हातानी एक दांडकं उभं पकडून दोन पायांवर परसाला बसल्या सारखा विष्णू शिपाई निवांत बसला होता.

सोसायटीच्या पदाधिकाऱ्याला साजेशा तुसडेपणाने मी डाफरलो, "सुट्टीवर आहात का चेअरमन साहेब?"

सोसायटीच्या वाँचमनला साजेशा बेफिकीरपणे तो उत्तरला, "डिवटीवरच हाये साहेब. ते बघितलं का मधल्या फांदीवर? मोहोळ बसलंय", तंबाखू चोळण्याचे काम न थांबवता नुसत्या नजरेनेच दिशा दाखवीत हणमंतराव म्हणाले.
मी बारीक नजर करत झाडाकडे बघत राहिलो.

मी काही बोलणार एवढ्यात आपल्या सिनियर वाँचमनची प्रत्येक गोष्ट खोडून काढायची सवय असलेला विष्णू शिपाई म्हणाला, "मग असू दे की, तू बी बस की निवांत  डिवटी करत".

"साहेब, मध भरल्याला हाये. गॅरंटी देतो", माझ्याकडे बघत आणि सवयीने विष्णुकडे पूर्ण दुर्लक्ष करत हणमंत म्हणाला.

"मग काय बेंडबाजा आणावा म्हनतोस?", विष्णू आपल्या सिनियर कडे बघत नम्रपणे म्हणाला.

"मध काढाय पायजे", माझ्याकडे बघत हणमंत म्हणाला.

"का? जगायचा कटाळा आला व्हय?", विष्णू शिपाई पुन्हा शांत सुरात म्हणाला.

"चार वाट्या भरून मिळेल", माझ्याकडून प्रतिसादाची अपेक्षा करत हणमंत म्हणाला. पण तशी अपेक्षा विष्णू शिपायाची अजिबात नव्हती. आपल्या सुरात पुरेसा निवांतपणा ठेवत विष्णू म्हणाला, "आणि मध काढून काय करायचा?"

"तुझ्या मढ्यावर वतायचा", आता मात्र हणमंत चिडला.

"आणि माश्या चावल्या म्हणजे?" पुन्हा शांत सुरातला प्रश्न.

या सर्व प्रकारावर काय बोलावे हे मला न समजल्याने मी काहीही न बोलता एकदा हणमंतच्या तोंडाकडे तर एकदा विष्णुच्या तोंडाकडे बघत हा सारा संवाद ऐकत होतो.
वास्तविक, चार वाटी भरून मध मिळणार, हे ऐकून माझ्या अंगात अचानक उत्साह संचारला होता. पण विष्णूचा प्रश्न रास्त होता.
परंतु काही झालं तरी हणमंत ही एक मोठी असामी होती. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यासमोर गेट उघडा ठेवून केबीनमध्ये खुर्चीवर तासंतास बसून निर्विकारपणे तंबाखू चघळण्याइतकं त्याचं व्यक्तिमत्त्व उत्तुंग होतं. हाताखालच्या शिपायाने केलेल्या साध्याशा प्रश्नाने डळमळीत होणाऱ्यापैकी तो नव्हता. 

आपल्या ठाम सुरात तो कडाडला, "आज्याबात चावनार न्हाईत त्या माश्या"

"कोण म्हणतं?"

"मी म्हणतो"

"कशावरनं?"

"नीट बघ, ती निराळी जात आहे, चावत न्हाईत त्या माश्या"

"पण कशावरनं ते सांग की"

"लेका, तुझ्या पेक्षा पाच वर्षांनी शिनेर हाय मी. आत्मइस्वास हाय. पटंत नसंल तर सायबास्नी इचार"

हणमंतरावांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मी सुखावलो.

हणमंत पाच वर्षांनी सिनियर असल्याने मधमाशांची जात निराळी आहे त्यामुळे त्या चावणे शक्य नाही एवढी साधी गोष्ट त्या विक्षिप्त आणि संशयी विष्णूला समजू नये याचा मला फार राग आला.

शेवटी मी त्या उद्धट विष्णुवर डाफरलो, "विष्णू, कळत नसेल तर शांत बसावं आपण ज्युनिअर माणसाने. उगाच मधे मधे तोंड घालू नये. असे घाबरून तर अजिबातच जाऊ नये. सेक्युरिटीला शोभत नाही हे."

विष्णू शिपाई वरमला.

असे पाठबळ मिळाल्याने हणमंतला जोर आला, "सायेब, आज्याबात काळजी करू नका, ते फुडचं काय करायचं ते मी बघून घेतो. तुमचा आशीर्वाद ऱ्हावू द्या झालं."

हणमंतच्या मनात माझ्या बद्दल अपार आदर आहे हे पाहून मला भरून आलं.

एव्हाना आमच्या भोवती सोसायटीतील इतर मंडळी गोळा झाली होती. त्यात जुन्या परंपरांचा पराकोटीचा अभिमान असणारे धोतरेकाका होते. वास्तविक धोतरेकाका हे त्यांचे मूळ नाव नव्हते. पण त्यांच्या धोतर प्रेमाची मनसोक्त टवाळी करणाऱ्या काही आदर्श मुलांनी त्यांचे पुन्हा बारसे केले होते. त्यासोबत कायम हाफ चड्डीत राहणारे कांबळे काका होतेच.

सर्वांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. एखाद्या समारंभाची तयारी सुरू व्हावी तशी लगबग सुरू झाली. एकाने झाडावर चढण्यासाठी कुठून तरी एक शिडी पैदा केली. चार वाट्या मिळणारा मध घेण्यासाठी पाच पंचवीस जण वाट्या घेऊन झाडाखाली तयार होते.
शेवटी मी स्वतः झाडाला शिडी लावून उभा राहिलो आणि सगळ्या जमलेल्या समुदायाचे मनोधैर्य टिकून राहण्यासाठी एक छान भाषण ठोकलं. जीवनात काहितरी मिळवण्यासाठी कष्ट करणे कसे आवश्यक आहे हे सांगितले. हणमंतराव स्वतः झाडावर चढणार असल्याने त्यांचे जाहीर कौतुक केले. न चावणाऱ्या माश्या असल्याची खात्री आधीच हणमंतला असल्याने त्याला अजिबात काळजी नव्हती. त्यामूळे इतरांना ती असण्याचे मुळीच कारण नव्हते.

विष्णू शिपाई सुद्धा आपलं दांडकं घेऊन पवित्र्यात उभा राहून म्हणाला,  "काळजी नगो, माश्या आल्याच तर एकेकाच्या ढुंगणावर अश्या काठ्या हाणतो की बघाच. सगळ्यांच रक्शन करतो मी."

आता विष्णू शिपाई एकेका मधमाशीला धरणार कधी, त्यांचं ढुंगण शोधणार कधी आणि त्यावर काठी हाणणार कधी असे फालतू प्रश्न ना त्याला पडले ना आम्हाला. धुंदीच अशी विलक्षण चढली होती.

शेवटी सगळी तयारी झाली, सगळे वाटी धारक वाट्या सरसावून झाडाखाली उभे राहिले. हणमंत वाँचमन सरसर शिडी वरून झाडावर चढाई करून गेला आणि नशेत असल्याप्रमाणे मोहोळ असलेली फांदी गदागदा हलवून मोकळा झाला.

आणि व्हायचं तेच झालं! भयानक हल्ला!

सगळ्या मधमाश्या हणमंतच्या शिनेरिटीचा अजिबात सन्मान न करता आणि त्या न चावणाऱ्या माश्या असल्याच्या हणमंतच्या मताची अजिबात कदर न करता त्याच्यावर चालून गेल्या. 

झाडाखालाच्या मंडळींचं मधमाश्यांकडे लक्ष जाण्याआधीच मधमाशांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि एक तुकडी या मंडळींवर चाल करून गेली. हातातल्या असंख्य वाट्या जमिनीवर पडल्याचा टणटणाट झाला आणि पुढच्याच क्षणाला असंख्य माणसांचा बेंबीच्या देठापासून एकाच वेळी रडण्याचा आवाज झाला. अचानक दंगा झालेला पाहून जवळची कुत्री भुंकू लागली, झाडावरचे कावळे काव काव करू लागले. झाडाखाली पळापळ सुरू झाली. काही जण रडत रडत पळत होती, उरलेली पळत पळत रडत होती. जे पळताना पडत होते ते पडल्या पडल्या रडत होते.

तरीही झाडावरचा एक माणूस रडण्यामध्ये झाडाखालच्या असंख्य माणसांना मागे टाकत होता.

खिडकीच्या बाहेर डोकं काढून काही जण सुरवातीला मजा बघत हसत होते. ते मधमाश्यांना अजिबात सहन झाले नाही. मधमाश्यानी त्यांना सुद्धा सोडले नाही. शेवटी ती मंडळी सुद्धा खिडक्या बंद करून आपापल्या घरात हुई हुई करत रडत बसली.

धोतरेकाकांची मात्र दयनीय अवस्था झाली. त्यांचं ते पारंपरिक प्रेम त्यांना मुळीच पळू देत नव्हतं. पायात येणारं धोतर त्यांना सारखे पाडत होतं.

कांबळे काकांची समस्या निराळी होती. त्यांच्या हाफ चड्डीमुळे मधमाश्याना चावण्यासाठी विस्तिर्ण प्रदेश उपलब्ध झाला. मधमाश्या सभ्यतेचे सगळे नियम मोडून कांबळे काकांना चारचौघात चावू नये तिथे चावल्या आणि कांबळे काका एकटे असताना सुद्धा रडणार नाहीत तसे चारचौघात रडले.

पण या सगळ्या रडारडीत आवाजात विष्णू शिपायाचा आवाज नव्हता कारण हातातलं दांडकं तिथंच टाकून तो चतुर माणूस सुरवातीलाच पसार झाला होता.

मी मात्र त्या विष्णू सारखा हातातील वस्तू टाकून मुळीच पळालो नाही. त्या ऐवजी हातातली शिडी सोबत घेऊनच  पळालो.

खांद्यावर शिडी घेऊन पळत जाणाऱ्या माझ्या मूर्ती कडे पाहत तो हणमंत नामक दुर्दैवी प्राणी, आता उतरायचं कसं, अशा विवंचनेत हातपाय झाडंत जगातल्या सर्व नृत्य प्रकारात नाचला, जगातल्या सर्व गायन प्रकारात रडला आणि शेवटी सर्व कलांनी समृद्ध झाल्यावर झाडावरून सोसायटीच्या भिंतीवर आणि भिंतीवरून पलीकडच्या प्लॉटवर उडी टाकून या आसमंतात अंतर्धान पावला.

असाच काही वेळ गेला आणि मी खांद्यावर शिडी वागवीत सोसायटीत परत आलो.

हातात दांडूकं घेऊन विष्णू शिपाई दोन पायांवर काही घडलेच नाही असा चेहरा करून आपल्या एका जाड्या मित्रा सोबत बसला होता. खांद्यावरची शिडी त्याच्या समोर टाकून मी ओरडलो,

"नालायक, पळून गेलास? आमचं रक्षण करणार म्हणे"

"माश्या चावू नये म्हणून पळालो सायेब, परत येऊन रक्शन  करनारच होतो."

"चुप्प बैस, एवढी मोठी घटना घडली आणि तू या दोस्ताबरोबर चकाट्या पिटत बसला आहेस? काय बोलावं तुला! आणि तो तुझा दीडशहाणा सिनियर कुठे आहे?"

तो जाड्या गृहस्थच तोंडात सुपारी धरल्यागत आवाज काढून म्हणाला, "मीच हनम्या न्हवं काय हितं बसलोय, सुजल्यामुळं वळखु ईना झालोय. तुम्ही शिडी घेऊन पळून गेला तवा...."

त्याला पुढं बोलू ना देता मी ओरडलो, "शांत बस. एक शब्द बोलू नकोस. न चावणाऱ्या मधमाशा म्हणे! काय पण सिक्युरिटी ठेवली आहे आम्ही. तरी मी म्हणत होतो पोळ्याला हात लावू नकोस. पण ऐकशील तर शपथ. कोणी मेलं बिलं असतं म्हणजे केवढ्याला पडलं असतं? गाढव माणूस."

झाडाखाली काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेण्यासाठी गेलो. 

झाडाखाली भर दुपारी भयाण शांतता होती. आजूबाजूच्या सर्व घरांच्या खिडक्या बंद होत्या. भुंकून भुंकून दमलेली कुत्री निवांत बसली होती. कावळे सुद्धा शांत दांडीवर बसले होते. चार पाच मधमाश्या गुणगुणत होत्या. जमिनीवर होत्या फक्त तुटक्या चपला, असंख्य रिकाम्या वाट्या आणि धोतरे काकांचं सुटलेलं धोतर!

- रमेश जितकर

Sunday, February 7, 2016

घरच्या घरी कचरा व्यवस्थापन Home Composting by Ramesh Jitkar

आजचा विषय "घरच्या घरी कचरा व्यवस्थापन". या विषयावर ढीगभर माहीती जालावर उपलब्ध आहे. पण मराठीतून तशी कमीच. पुस्तकेही बरीच उपलब्ध असतील पण त्यामधे सर्वसाधारण पणे हे असं करा, तसं करू नका अशा स्वरुपाचे लिखाण पहायला मला मिळालं. पण काय करायचं? आम्ही पडलो संशयी! लोकांच्या कपाळावर जसं गंध असतो तसा आमच्या डोक्यावर कायमचं प्रश्नचिन्ह असतं! आम्हाला कायम "का?" हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे सल्ल्यांनी भरलेलं पुस्तक सहसा माझ्या डोक्यात शिरतच नाही. मग स्वतः जालावर काही प्रश्नांची उत्तर शोधून आणि ती साध्या प्रयोगांनी पडताळून पाहीली. आणि मगच मनाचं काही प्रमाणात समाधान झालं. यातून जे काही थोडबहूत ज्ञान मिळालं ते इतरांपर्यंत पोहोचावं म्हणून हा लेख.
      तर घरच्या कचर्‍याचं व्यवस्थापन करायचं म्हणजे काय करायच? तर घरी तयार होणार्‍या जास्तीत जास्त कचर्‍याची घरच्या घरीच विल्हेवाट लावायची. ती कशी तर एक छोटासा खत प्रकल्प तयार करून.
आता प्रकल्प म्हटल्यावर जागा खुप लागणार का? शहरातल्या लोकांसाठी दोन बादल्या राहतील अशी ग्रिल मधील जागा पुरेशी आहे. एखादा टेरेस फ्लॅट असेल तर उत्तमच.
घरात साधारणपणे तयार होणारा कचरा साधारण पणे दोन भागात विभागता येऊ शकतो,
  1. ओला कचरा (पालेभाज्यांची देठं, खराब झालेली पानं, केळ्यांची साल वगैरे)
  2. सुका कचरा (वाळलेला पालापाचोळा, जुनी वर्तमान पत्रे, प्लॅस्टीच्या पिशव्या, बाटल्या, जुन्या इले़क्ट्रॉनिक वस्तू वगैरे)

आपण बोलणार आहोत ते मुख्यतः ओल्या कचर्‍याच्या व्यवस्थापना बाबत.
      बर्‍याच जणांना ठाउक असेल असा प्रकल्प म्हणजे दुसरं तिसरं काही नसुन कचरा एका भांड्यात साठवून ठेवून तो नैसर्गीक पणे कुजू द्यावा आणी शेवटी तयार होणारं खत घरच्या बागे मध्ये किंवा कुंडीमध्ये वापरावे.
पण कचरा घरात कसा कुजू द्यावा? शेवटी कुजणे म्हणजे घाण, किटक, दुर्गंध आणि जंतू, हे सगळं घरात कसं चालू द्यावं. त्यापेक्षा ते सरळ पालिकेकडे/शासनाकडे सोपवून द्यावं, असा एक सर्वसाधारण विचार असतो.
हा लेख असे प्रश्न पडणार्‍यांसाठी मुख्यतः आहे.
मुळात कुजणार्‍या वस्तू मधून का दुर्गंध येतो हे पाहू.
      एखादी वस्तू कुजते म्हणजे त्यातील क्लिष्ट पदार्थ एका मागोमाग एक अशा जैव रासायनिक विघटन प्रक्रियेतून जाऊन शेवटी रासायनिक दॄष्टीने काहीशा स्थिर असा ह्युमस नावाच्या वस्तू मध्ये परावर्तीत होते.
ही कुजण्याची प्रक्रिया अनेक प्रकारच्या जिवाणू, बुरशी, किटक, गांडूळ आणि इतर जिवांमुळे होते.
विघटनाचे दोन प्रकार आहेत.
  1. एरोबिक - ऑक्सिजनच्या उपस्थितीत होणारे विघटन
  2. अनएरोबिक - ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत होणारे विघटन.
हे विघटन करणार्‍या जिवाणूंनाही एरोबिक आणि अनएरोबिक जिवाणू असंच म्हणतात.
      यामधील अनएरोबिक विघटन होताना त्यातून सल्फर डाय ऑक्साईड सारखे दुर्गंधी असणारे वायू तयार होतात. त्यामुळे तुमच्या खताच्या भांड्यातून जर दुर्गंध येत असेल तर त्यामध्ये अनएरोबिक विघटन सुरु झालं असं समजावं. आणि म्हणुनच घरच्या खत प्रकल्पासाठी आवश्यक असतं ते एरोबिक विघटन, ज्यामधून दुर्गंधी येत नाहि. वास्तविक त्यामधून सुगंध येतो. हो, मी "सुगंध"च म्हणालो. पहिल्या पावसात मातीतून जो सुगंध येतो अगदी तसाच सुगंध एरोबिक विघटनातून येतो.
तर घरच्या कचर्‍याच एरोबिक विघटन कस करायचं ते पाहू.
      आपल्याला माहीत आहे हवेमध्ये ऑक्सिजन असतो. कचर्‍याला पुष्कळ हवा मिळत असेल, तर सहाजिकच त्यामध्ये नैसर्गीक पणे एरोबिक जिवाणूंची वाढ होईल. म्हणूनच जो डबा तुम्ही खत प्रकल्पासाठी वापराल त्याला पुष्कळ छिद्र असतील हे पहा. मी या कामासाठी जाळीदार प्लॅस्टीकचा ट्रे किंवा डबा वापरतो.
      आता आपल्याला कचर्‍यामध्ये जास्तीत जास्त एरोबिक जिवाणू तयार होतील हे पहायचं आहे जेणेकरून कचरा लवकरात लवकर कुजून जाऊ शकेल. जिवाणूंची संख्या वाढवायची म्हणजे त्यांच्या साठी पोषक वातावरण निर्माण करावं लागेल. जिवाणूंच्या वाढी साठी मुख्यतः कार्बन आणि नायट्रोजन या मुलद्रव्यांची आवश्यकता असते. कार्बन हा उर्जेचा स्त्रोत म्हणून वापरला जातो तर नायट्रोजन हा जिवाणूंच्या शरीर बांधणीसाठी आवश्यक असतो. मानवाला नाही का उर्जेसाठी कार्बोदके आणी शरीर बांधणी साठी प्रोटीन हवे असतात अगदी तसेच.
      सर्व प्रकारच्या कचर्‍यामध्ये मुलत: कार्बन आणि नायट्रोजन असतातच पण त्याचं प्रमाण (C:N ratio) हे कचर्‍या नुसार बदल रहातं. उदा. टाकाऊ हिरव्या भाजीपाल्यामध्ये हे प्रमाण १५:१ एवढं, तर वाळलेल्या पानांमध्ये हेच प्रमाण ५०:१ हे असतं. थोडक्यात हिरव्या पदार्थात तुलनेने नायट्रोजन जास्त असतो तर सुक्या पदर्थात कार्बन जास्त असतो. जिवाणूंच्या आदर्श वाढीसाठी हे प्रमाण ३०:१ असावे लागते.
CN Ration Chart
      तुमच्या खत प्रकल्पात जास्त नायट्रोजन असणारे पदार्थ (म्हणजे हिरवा कचरा) असतील तर जिवाणूंसाठी प्रोटीन भरपूर असेल पण त्यांना उर्जेसाठी कार्बनची कमतरता भासेल. अशा वेळेस पुर्ण नायट्रोजन सुद्धा वापरला जाउ शकत नाही कारण जिवाणूंची संख्या पुरेशी नसेल. अशा वेळी जास्तीचा नायट्रोजन अमोनिआच्या स्वरूपात बाहेर टाकला जातो आणि तुमच्या खत प्रकल्पाला आंबट, अमोनिआ सारखा वास येईल. हे टाळायचं असेल ओल्या कचर्‍याबरोबर सुका कचराही वापरणं आवश्यक आहे.
पण किती ओला कचरा आणि किती सुका कचरा वापरायचा जेणे करून एकून कार्बन आणि नायट्रोजनचं प्रमाण आवश्यक एवढं म्हणजे ३०:१ येईल? याचं एक साधं उत्तर शोधूया.
      हे बघा वर म्हटल्याप्रमाणे हिरवा कचरा जास्त झाला तर अमोनिआ निर्माण होइल जे आपल्याला नको आहे. पण जस्त सुका कचरा झाला तर काहीच फरक पडणार नाही. जो पर्यंत हिरवा कचरा उपलब्ध आसेल तो पर्यंत जिवाणूंची संख्या वाढेल आणी त्यासाठी काही प्रमाणात सुका कचरा उर्जेसाठी वापरला जाईल. हिरवा कचरा संपला की सुका कचरा फार तर पडून राहील. सुका कचर्‍याचं सुद्धा विघटन होईल पण त्यामधून दुर्गंध येणार नाही कारण सुक्या कचर्‍यात तुलनेने फार कमी नायट्रोन असतो आणि तो वापरण्यासाठी त्यामध्येच पुरेसा कर्बन सुद्धा असतो.
चला आता प्रत्यक्षात आपण आपला खत प्रकल्प कसा करायचा ते पाहू.
      एक जाळीदार डबा घ्यायचा. बाजारात दिवसभराचा कचरा साठवण्यासाठी जाळीदार स्टीलचे डबे मिळतात ते चालतील. किंवा जाळीदार प्लॅस्टीकचे ट्रे सुद्धा चालतील. अशा डब्याला तळाला सुद्धा छिद्र असतील हे पहावं. कचर्‍याचं विघटन होताना जास्तीचं पाणी निघून जाण्यासाठी याची आवश्यकता असते. डब्याच्या तळाशी तयार शेणखत, गांडूळ खत किंवा कंपोस्ट खताचा बोटभर जाडीचा थर द्यावा. या खतामध्ये आवश्यक जिवाणूंची सुरवातीची बॅच हजर असते. यांच्याच पुढच्या पिढ्या तुमचा खत प्रकल्प चालवतील. ओला किंवा हिरवा कचरा रोज तुमच्या स्वयंपाक घरात तयार होतोच. सुका कचरा म्हणून एखाद्या जवळच्या बागेमधून वाळलेली पान गोळा करून आणावीत. (मी या बाबतीत सुखी आहे. आमच्या नवी मुंबईत पुष़्कळ उद्यानं आहेत. मी अधून मधून आमच्या घरा जवळच्या बागेमधून एक बॅग भरून सुकी पानं आणून तयार ठेवतो)
      आपल्या स्वयंपाक घरात तयार होणारा ओला कचरा म्हणजे, पालेभाज्यांचे देठ, केळ्यांची साले, कोबीचा उरलेला भाग, भेंडीची कापलेली देठे इत्यादि इत्यादी रोजच्या रोज आपल्या खताच्या डब्यात टाकाव्यात. पण त्याच बरोबर साधारण पणे तितक्याच किंवा थोड्या जास्तच आकारमानाएवढी सुकलेली पानं सुद्धा ओल्या कचर्‍यात मिसळून टाकावीत. त्यावर थोडे पाणी शिंपडावे. हो विघटना साठी कार्बन आणि नायट्रोजन बरोबरच पाण्याची सुद्धा आवाश्यकता असते. पण माझ्या अनुभवानुसार ओल्या कचर्‍यात पुरेसं पाणी असते. त्यामुळे अगदी थोडेसेच पाणी पुरेसे असते. पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यास हवेचा पुरवठा रोखला जाउन अनएरोबिक जिवाणूंची वाढ होण्यास सुरवात होईल. हा विघटन होणारा कचरा दर तीन किंवा चार दिवसांनी थोडा हलवावा जेणे करून पुन्हा एकदा हवेचा पुरवठा होऊन एरोबिक जिवाणूंना पुरक हवामान मिळेल. कचरा हलवताना घाण वास आला कि समजावं अन एरोबिक विघटन सुरू झालेलं आहे. याला साध उपाय म्हणजे सुका कचरा वाढवावा नि हवेचा पुरवठा वाढवण्यासाठी कचरा हलवावा.
      कचरा हलवताना मातीचा सुगंध आला कि समजावं तुमचा प्रकल्प योग्य मार्गाने जात आहे. जसा जसा पुर्वी टाकलेल्या कचर्‍याचं विघटन होत जाईल तसा तसा त्याचे आकारमान कमी होऊन तो खाली बसेल. अशा प्रकारच्या एका बादलीचा आकाराचा डबा एका कुटूंबाचा काही महिन्यांच्या किंवा वर्षाचा सुद्धा कचरा सामावून घेऊ शकेल.
      डबा भरत आला असं वाटलं कि तो काही दिवसांसाठी असाच ठेवून द्यावा आणी दुसरा डबा अशाच प्रकारे वापरण्यास सुरवात करावी. पहिल्या डब्यातील अर्धवट तयार झालेल्या खतामध्ये मात्र नियमित पाणी टाकून ओलसर पणा ठेवावा नि हलवावं.
या शेवटच्या टप्प्याला खाताचं क्युरींग प्रकिया असं म्हटलं जातं. ज्यावेळेस डब्यामधील कचर्‍यामध्ये कोणताच ओळखण्याजोगा कचर्‍याचा अंश रहात नाही त्यावेळेस क्युरींग प्रक्रिया पुर्ण झाली असं समजावं. पुर्ण तयार झालेलं खत हे काळसर तपकिरि रंगाचं आणी वासरहीत असते. हे तयार झालेलं कंपोस्ट खत आपल्या बागेमध्ये किंवा कुंड्यांमध्ये वापरावे.
काही लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

  1. तुमच्या खताच्या डब्यात कोणतेही शिजवलेले, प्रक्रिया केलेले पदार्थ, दुधापासून तयार केलेले पदार्थ, मांसाहारी पदार्थ अजीबात टाकु नयेत. अन्यथा अळ्या, उंदीर यांचा उपद्रव होईल.
  2. शक्यतो फळांचे टाकाऊ पदार्थ वापरू नयेत. त्यातील गोड चवीमुळे मुंग्यांचा आणि विशिष्ट प्रकारच्या फ्रूट फ्लाईज यांचा त्रास होऊ शकतो. मला साध्या केळ्यांच्या साली मुळे सुद्धा फ्रूट फ्लाई़़जचा त्रास झाला.
  3. भाजीपाल्यांचा वापर उत्तम.
  4. सगळा कचरा बारीक कापून टाकल्यास फार लवकर कुजतो. नंतर कचरा हलवण्यासाही सोईचे होते.
  5. रोज टाकलेला ओला कचरा नेहमी सुक्या कचर्‍याने झाका. माश्यांचा त्रास होणार नाही.
  6. डबा झाकुनच ठेवा. माश्यांचा त्रास होणार नाही.
  7. सुका कचरा म्हणून काही जण वर्तमान पत्राचा कागद, किंवा पुठ्ठ्यांचे तुकडे वापरायचा सल्ला देतात. पण मी सहसा वापरत नाही कारण अशा कागदा मध्ये इतर अनेक रसायनं असू शकतात. शिवाय अशा कागदांमुळे कुत्र्याच्या छत्र्या खुप उगवतात.
  8. हा उपद्याप करताना "बायको" या प्राण्याचा प्रचंड त्रास होतो हा माझा अनुभव. कारण हा प्राणि ओला कचरा आणि सुका कचरा अजिबात वेगळा ठेवत नाही. तो वेगळा करण्यासाठी आपण स्वयंपाक घरात गेल्यास चिडचिडीचा सामना करावा लागतो. टाकाऊ भाजीपाला बारीक कापण्यासाठी तुम्ही सुरी घेतलीत तर या प्राण्याला त्याची त्याच क्षणी प्रचंड निकड असल्याचं जाणवतं. "या कामाला बरं नेहमी वेळ मिळतो, घरातली इतर कामं करू नका", असे टोमणे वरचेवर ऐकावे लागतात. कार्बन-नायट्रोजन प्रमाण आदर्श ठेवून एरोबिक विघटन करण्यासाठी आटोकाट प्रयत्न जरी केलेत तरी या प्राण्याला नेहमी तुमच्या खत प्रकल्पामधून घाण वास येतो. यावरचा उपाय मला आजून सापडलेला नाही.

Sunday, February 23, 2014

छंदपिसाट

पाचवी सहावीला असताना भुगोलाच्या पुस्तकातील शेवटचा पाठ खगोलशास्त्राचा असे. त्यामध्ये आकाशातील ग्रह तारे यातला फरक कसा ओळखावा, गुरू, शनी यांच्या रंगामध्ये कशा वेग वेगळ्या रंगांची झाक असते, ध्रुव तारा, सप्तर्षी कसा ओळखावा, अशी बरीच माहीती होती. मुंबईच्या सदानकदा फटफटल्या सारख्या दिसणार्या आकाशात मी हे सगळे पाहण्याच्या प्रयत्न करत असे. पण काहीच ओळखता येत नसे. कधी कधी कुठल्याही तार्याला हा गुरू, तो शनी असा गैरसमज करुन घेत असे. एका रात्री तर उंच विजेच्या तारांवर अडकेल्या पंतंगाच्या तुकड्यावर प्रकाश पडला होता त्यालाच गुरू ग्रह समजलो होतो!
एकदा वडिलांनी मला सप्तर्षीची ओळख करून दिली. काय आनंद झाला होता त्यादिवशी !
वडिल सुद्धा तसे छंदिष्टच होते. एकदा त्यांनी दोन बहिर्वक्र भिंगे आणुन त्यांना कार्डपेपराच्या नळीत शिताफीने बसवले. दोन भिंगांतील अंतर कमीजास्त करता येईल अशी व्यवस्था केली आणि तयार झालेल्या दुर्बीण आम्हा भावंडाना दाखवली. त्यातून वस्तू जवळ दिसण्याऐवजी दूर दिसत होती. शिवाय सगळेच उलटे दिसत होते. खाली डोकं वर पाय. भावंडांनी बघीतलं, हसले आणि विसरून गेले. सर्वसामान्य माणसं! बिचारी! पण मी पिसाटलो. एक नवीनच वेड लागलं. दुर्बीणीचं! कशी बरं असते दुर्बीण? त्यातुन दुरचं जवळ कसं बरं दिसत असेल? काय जादु असेल आत मध्ये? त्यातुन आकाशात बघितल्यावर कसं दिसत असेल? चंद्रावरचे खड्डे दिसतील का? शनीची कडी दिसतील का? गुरूचे चंद्र दिसतील का? आणि तो युरेनस, नेपच्यून, प्लुटो ते पण दिसत असतील का? दुरच्या आकाशगंगा दिसतील का?..... असंख्य प्रश्न.
माझ्याकडे अशी एखादी दुर्बीण असेल तर काय मजा येईल! पण कुठून आणावी? पण खूप महाग असेल.
गिरणीत जाणार्या वडिलांकडे कुठून येणार इतके पैसे? पण दुर्बीण तर पाहिजे. त्याशिवाय आकाशातला तो खजिना बघणार कसा? काय करावं? काही सुचत नव्हतं.

एक आयडिया! वडिलांसारखी स्वतःच दुर्बीण बनवली तर?
पण त्यातून तर सगळं दूरच दिसत होतं.
ते आपण दुरुस्त करू.
शिवाय त्यातून सगळं उलटं दिसत होतं.
आपण त्याला सुलटं करू, नाही तर आपणंच उलटे होऊन बघू.
पण त्यासाठी सामान कुठून आणायचं?
कुणाचं तरी मागून आणू.
पण काही तरी सामान आणावंच लागेल ना?
जे जे विकत आणावं लागेल ते सगळं घरी बनवू!!
छ्या हे कसं काय होइंल?
होईल आपूनच.
पण सुरवात कशी करायची?
पुस्तकं वाचून माहीती काढायची.
पहीलं स्टेशन मोठ्या भावंडांची अभ्यासाची पुस्तकं!
दहावीच्या विद्यानाच्या पुस्तकात दुरदर्शकाची माहीती होती. वाचून काढली. त्यातलं ज्ञान बकाबका गिळलं.
पहिली अडचण बहिर्वक्र भिंगं कुठून आणायची?
मोठी माणसं हुशार असतात. त्यांना सगळं माहीत असतं. त्यांना विचारावं.
वडिल दिवसभर गिरणीत असत. ते काही वाट्याला मिळायचे नाहीत.
शेजारच्या ककांना विचारलं.
"भिंगं कुठे मिळतात हो काका?"
"काय?"
"भिंग"
"म्हंजी?"
"ते असतं नाही का? ते गोल गोल, काचेचं "
"ते कशाला पाहिजे तुला?"
"दुरदर्शक बनवायला"
"काय बनवायला?"
"दुरदर्शक"
"दुरदर्शन? म्हणजे टि. व्ही? तुझ्या बानं कधी बनिवला व्हता काय टि. व्ही.?"
"दुरदर्शन नाही दु-र-द-र्श-क"
"त्याचं काय करायचं?"
"त्यातून बघायचं"
"काय? टि. व्ही.?"
"नाही आकाशात बघायचं"
"आकाशात टि. व्ही. बघायचा?"
च्यायला गेलं खड्ड्यात ते भिंग.
"ते जाऊ दे, काका तुम्ही किती शिकलात हो?"
"दुसरी नापास"
हाण तिच्या आयला!

दुसरा कोण तरी बघू. शेजारच्या दुसर्या एका काकाला पकडंल.
"काका"
"काय रे बाळ?"
"तुम्ही किती शिकलात हो?"
"दहावी पास"
हां. हा चांगला काका आहे. दहावीच्या पुस्तकात सगळं येऊन गेलंय.
"काका भिंगं कुठे मिळतात हो?"
"काय?"
हा काका बहूदा इ़ंग्लिश मेडियम मध्ये शिकलेला आहे. त्याला इंग्लिश मध्येच विचारावं.
"म्हणजे लेन्स लेन्स"
"चप्पल वाल्याकडे"
चप्पलवाल्याकढे दुर्बीणीचं भिंग? कमाल आहे? हे एवढं सोप्पं आहे? तरी खात्री करून घेतलेली बरी.
"चप्पलवाल्याकडे कसं काय मिळेल काका?"
"बुटाची लेस चप्पलवाल्याकडे मिळणार नाही तर कुठे मिळणार पिठाच्या गिरणीत?"
"लेस नाही काका लेन्स लेन्स"
"आँ? ते काय असतं?"
"त्याचा दुरदर्शक बनवतात. म्हणजे टि. व्ही. नाही. दु-र-द-र्श-क. त्यातुन आकाशात बघायचं आणि त्यातून आकाशात टि. व्ही दिसत नाही, नुसतं आकाशच दिसतं". मी शक्य तेवढं स्पष्टीकरण आधीच दिलं. उगाच नंतर गोंधळ नको.
पण काका एवढ्यानेच गोंधळले.
"ते काय मला माहीत नाही. दुसर्या कोणालातरी विचार"
"काका तुम्ही नक्की दहावी शिकलात ना?"
"मुस्काट फोडीन, चल पळ इथनं"

मग मोठ्या माणसांचा नाद सोडून दिला. काय करावं सुचत नव्हतं.
चश्म्यात सुद्धा भिंगच वापरतात हे कळल्यावर वडिलांचे, आजीचे जुनेपुराणे चश्मे तोडून फोडुन त्याच्या काचा वेगळ्या केल्या!
काचा नुसत्याच हातात धरून, मागे पुढे करून प्रयोग सुरू झाले. आणि एकदाचं तंत्र कळलं. पदार्थिक भिंगाच्या (objective lense) आणि नेत्रिकेच्या (eyepice) नाभिय अंतराचा आणि दुर्बीणीच्या वर्धन क्षमतेमधील संबध कळला.
दुर्बीणीच्या मूळ तत्व हे असं.



याप्रकारच्या दुर्बीणीला अपवर्ती प्रकारची (refracting telescope) दुर्बीण असं म्हणतात. दुर्बीणी मध्ये दोन बहिर्वक्र भिंगांचा वापर केला जातो. पहिले भिंग हे तुलनेने मोठ्या आकाराचे व मोठ्या नभिय अंतराचे असते. याला पदार्थिक भिंग (objective lense) म्हणतात. हे भिंग दुरच्या वस्तुकडून येणारे प्रकाश किरण पलिकडील बाजूस एकत्र करते. याठिकाणी त्या वस्तुची एक आभासी (virtual image) प्रतिमा तयार होते. ही प्रतिमा मग दुसर्या लहान आकाराच्या बहिर्वक्र भिंगातून पाहीली जाते. या भिंगाला नेत्रिका (eyepice) म्हणतात. पर्दाथिक भिंगाचे नाभिय अंतर (focal length) जेवढे जास्त तेवढे त्यापासुन निर्माण होणारी आभासी प्रतिमा तुलनेने मोठी असते. त्यामुळे दुर्बीणीतून वस्तुही फार जवळ आल्यासारख्या दिसतात. म्हणजेच दुर्बीणीची वर्धन क्षमता (magnifying power) जास्त होते.
पण यापेक्षा जास्त प्रगती होईना. मग पुन्हा शोध सुरू केला.
पुन्हा एकदा खात्रीचा आधार म्हणजे पुस्तकं.
एकदा आमच्या शिरोडकर शाळेतील ग्रंथालयात जाऊन विचारले. तर तो शिपाई खेकसला. आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तक देत नाही म्हणाला. मग काय चाटायचंय ते ग्रंथालय! आमच्या सरांनीच मागितलंय पुस्तक अशी थाप ठोकून काम होतं का पाहिलं. तर म्हणाला त्या मास्तरांची चिठ्ठी घेऊन ये. कुठल्या तरी मास्तराची चिठ्ठी घेऊन खगोलशास्त्रावरची तीन पुस्तके मिळाली. जमेल तेवढी माहीती पदरात पाडून घेतल्यानंतर मोर्चा वळवला तो दादरच्या मुंबई मराठी ग्रंथालयाकडे. इकडे विज्ञान या विषयावरील पुस्तकं फक्त रद्दीत पडल्याप्रमाणे होती. एकाही पुस्तकाची फाईलमधे नोंद नाही. ज्यांची नोंद आहे ती पुस्तकं नाहीतच किंवा त्यांची जागा बदलेली. त्यामुळे काऊंटरवरच्या बायकांना विज्ञान शाखेची पुस्तकं आणा म्हणायचं आणि त्यांनी चार पाच पुस्तकं आणुन द्यायची. त्यातलं पसंत पडलेलं पुस्तक घेऊन जायचं. हे असं चाललं होतं. पण एवढ्या सगळ्यातून एक फायदा झाला. "दुर्बीणींचं विश्व" नावाचं एक पुस्तक हाती पडलं.
पुस्तक वाचलं, झपाटल्यासारखं वाचलं, पुन्हा पुन्हा वाचलं. त्यात युरेनस ग्रहाचा शोध लावणार्या विल्यम हर्षल बद्दल माहिती होती. त्याने दुर्बीण कशी बनवली? त्यासाठी लागणार्या सामानाची व्यवस्था कशी केली? याची पुष्कळ माहीती मिळाली. पण हा लेख सगळा विज्ञानेतिहास होता. दुर्बीण कशी बनवावी याची तांत्रिक माहीती मात्र कुठेच मिळाली नाही. पण दुर्बीण बनवण्याची एक भयंकर ओढ निर्माण झालं. अरे तो हर्षलांचा विल्यम जर बनवू शकतो तर मी का नाही?
पण मार्ग काही सापडत नव्हता.
एक वर्ष गेलं, दोन गेली, तीन गेली. दहावीला पोहोचलो. आणि धागा हाती लागला. नेहरू विज्ञान केंद्रात मे महिन्याच्या सुट्टीत मुलांनसाठी दुर्बीणी बनविन्याचे छंद वर्ग चाललात अशी माहीती मिळाली. कोण आनंद झाला!
आईवडिलांकडे तगादा लावला, जाणार, जाणार, जाणार, जाणार...,
घरच्यांची फिलॉसॉफी वेगळी होती. पुर्ण व्यवहारी. हे पालथे धंदे करून काय फायदा, त्यापेक्षा ज्याने पोट भरेल असं काही तरी कर, असे सल्ले मिळायला लागले. नाही तर गावाला तरी चल. काय गावाला मजा करायची ती कर. पण ह्या असल्या उद्योगाबद्द्ल बोलायचं नाही. घोर निराशा झाल्यासारखं वाटलं. गावी मन लागेना. जस जसा छंदवर्ग सुरू होण्याची तारीख जवळ यायला लागली तशी माझी तगमग वाढू लागली आणी एकदिवस बंडखोर वृत्ती उफाळून आली.
ठरवून टाकलं. काय व्हायचं ते होऊ दे! पण छंदवर्गाला जायचंच. आई कडून हट्ट करून पैसे घेतले आणि कोल्हापूरहून एकटाच मुंबईला आलो! एवढ्या मोठा प्रवास एकट्याने पहिल्यांदाच करत होतो, लाल डब्याच्या यश्टीत बसायला जागा नव्हती. १२ तासाचा प्रवास उभा राहूनच केला! मुंबईला पोहोचलो तेव्हा पाय सुजले होते. आत्तेभावाकडे खानावळ लावली आणि नेहरू विज्ञान केंद्रात दिडशे रुपये भरून छंदवर्गात गेलो.
तिथे माझ्यासारखी काही छंदपिसाट मुले होती, तर काही उगाचच आली होती.
वर्ग एकूण १५ दिवसांचा होता. म्हणून नेहरू विज्ञान केंद्राचा पंधरा दिवसाचा पास पण मिळाला होता. मग काय ते अख्खं नेहरू विज्ञान केंद्र माझ्याच बापाची मालमत्ता असल्यासारखा मी वर्ग सुरू होण्याआधी एकदिड तास आधीच पोहोचत असे. त्या विविध वैज्ञानिक वस्तूंमधून उगचंच भटकायचं. काय दिवस होते ते!
दुर्बीण बनवण्याबरोबरच इतर बरेच वर्ग होते. कॉंप्युटर वर्गात विशेष गर्दी होती. कारण त्याच्या सर्टीफिकेटचा कदाचित उपयोग होईल असं एक विद्यार्थी म्हणाला होता. मी दुर्बीण बनवण्याचा वर्गात आहे म्हटल्याबरोबर त्याचा काय फायदा म्हणून त्याने मलाच विचारले आणि माझी निवड चुकली म्हणून मला हसला देखील. मी काय बोलणार? माझी चूक मान्य केली झालं!
इतर प्रत्येक छंदवर्गांसाठी ३०, ४० विद्यार्थी होते. दुर्बीणी बनवण्यासाठी होते फक्त सहा विद्यार्थी!
पहिल्या दिवशी थोडी निराशा झाली. पहिल्या दिवशी प्रस्तावनेसाठी सर्व वर्गातील मुलांना एकाच मोठ्या हॉल मध्ये बसवून शिक्षकांची, केंद्राच्या कामाची ओळख करून देण्यात आली, पण ती इंग्लिशमधे! इथं कुणाच्या बापाला समजतंय इंग्लीश? मला धड शुद्ध मराठी देखील समजत नव्हतं! तिकडे भाषण सुरू होतं नि मी नुसतं इतर मुलांच्या तोंडाकड बघत राहीलो.

पण प्रत्यक्षात मला वाटलं होतं त्यापेक्षा छंदवर्ग खूपच माहीती पुर्ण होता. मला वाटलं होतं दुर्बीणी बनवण्याचा वर्ग म्हणजे तयार भिंगं आणून एखाद्या नळीला जोडायची आणि झाली दुर्बीण तयार. पण इथे तर दुर्बीणीत लागणारे आरसे कसे बनवयाचे याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. आता इथं नक्की काय चालतं ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा दुर्बीणीच्या तांत्रिक माहीतीकडे वळू.

वर सांगितल्याप्रमाणे दुर्बीणीमध्ये दुरच्या वस्तू कडून येणारे प्रकाश किरण बहिर्वक्र भिंगाच्या (convex lense) सहाय्याने एकत्रित करायचे. याठिकाणी त्यावस्तूची एक आभासी प्रतिमा तयार होते. ही प्रतिमा मग एका लहान भिंगातुन (eyepiece) पाहिली जाते. हि आभासी प्रतिमा जितकी स्पष्ट तितकीच दुर्बीण अधिक कार्यक्षम. पदार्थिक भिंगाचा व्यास जेवढा मोठा तेवढे तिचे क्षेत्रफळ अधिक, जेवढे क्षेत्रफळ अधिक तेवढे तिची प्रकाश गोळा करण्याची क्षमता अधिक, म्हणजेच तिच्यापासून तयार होणारी आभासी प्रतिमा तेवढी अधिक प्रखर आणि स्पष्ट. थोडक्यात अशा प्रकारच्या दुर्बीणीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पदार्थिक भिंगाचा व्यास वाढवावा लागतो. पण इथूनच अडचणींना सुरवात होते. मुळात प्रकाश भिंगातून आरपार जात असल्यामुळे भिंगासाठी वापरण्या येणारी काच अगदी नितळ असावी लागते. तिचा अपवर्तनांक (refractive index) अधिक असावा लागतो (काचेचा अपवर्तनांक म्हणजे काचेची प्रकाशाची दिशा बदलण्याच्या क्षमतेची मोजणी). अशी काच बरीच महाग असते. शिवाय काचेची प्रकाशाची दिशा बदलण्याची क्षमता हि प्रकाशाच्या रंगाप्रमाणे बदलत जाते. पांढरा प्रकाश हा मुळातच वेगवेगळ्या रंगाचा बनलेला असल्याकारणाने काचेचे भिंग त्यातून जाणार्या प्रकाशाचे त्यांच्या रंगानुसार किंचीत कमी अधीक प्रमाणात दिशापरिवर्तन करते आणि तयार झालेली आभासी प्रतिमा ही काहीशी वेगवेगळ्या रंगाची झालर असल्याप्रमाणे दिसते. याला तांत्रिक भाषेत अपस्करण (chromatic abaration) म्हणतात. काचेच्या प्रिझममधून प्रकाश जाताना निरनिराळे सप्तरंग दिसतात तसंच आहे हे.
आता यावरचा उपाय न्युटनकाकानेच सांगून ठेवलाय. बहिर्वक्र भिंगाप्रमाणे अंतर्वक्र आरसासुद्धा (concave mirror) आभासी प्रतिमा तयार करू शकतो.
कोणताही आरसा सगळ्या रंगाचे परावर्तन एकाच दिशेने करतो त्यामुळे बहिर्वक्र भिंग वापरल्यामुळे येणारी रंगाची अडचण आरसा वापरल्याने येत नाही.
या प्रकारच्या दुर्बीणीला परावर्ती दुर्बीण (reflecting telescope) असं म्हणतात. या प्रकारच्या दुर्बीणीचं तत्व हे असं.



या दुर्बीणी मध्ये दुरच्य वस्तूकडून येणारे प्रकाश किरण एका अंतर्वक्र आरशावरून परावर्तित होतात व आरश्या समोरच वस्तूची एक आभासी प्रतिमा तयार होते. आता ही प्रतिमा आरश्या समोरच तयार होत असल्यामुळे ती पाहताना बघणार्याचंच डोकं आरशासमोर येईल आणि त्यामुळे दुरच्या वस्तूकडून येणारे प्रकाश किरण अडवले जातील. यासाठी आरश्या समोरच अजून एक लहान सपाट आरसा ४५ अंशाचा कोनात लावला जातो. यामुळे तयार होणारी आभासी प्रतिमा आरश्यासमोर तयार होण्याऐवजी आरश्याच्या एका बाजूला तयार होते. आता प्रतिमा निरिक्षक एक लहान भिंगाद्वारे पाहू शकतो. बहिर्वक्र भिंगाप्रमाणेच आरशाचा आकार जेवढा जास्त तेवढी त्याच्यापासून निर्माण होणारी आभासी प्रतिमा अधिक स्पष्ट असते.

बरं आता पुन्हा छंदवर्गा कडे वळू.

छंदवर्गा मध्ये आम्हाला शिकवणार होते दुर्बीणी मध्ये वापरला जाणारा आरसा कसा बनवायचा ते!!!
च्यायला दिल एकदम खुश झाला! आंधळा मागतो येक डोळा नि देव देतो दोन डोळे!!

आता हे आरसा बनवायचं काय प्रकरण आहे हे पाहू.
हा अंतर्वक्र आरसा म्हणजे एक तुळतुळीत, प्रकाशाचं सहज परावर्तन करू शकेल असा अंतर्वक्र पॄष्टभाग. मुळात रिफ्लेक्टिव पॄष्ठभाग देऊ शकेल असा एक पदार्थ म्हणजे कोणताही चकचकीत पॄष्ठभाग असणारा धातू. ऊदा. चांदी, अॅषल्यूमिनिअम. अशा पदार्थाची पुरेशी जाड अशी एक गोलाकार चकती (डिश) घ्यायची. तिला दोन सपाट पृष्ठभाग असतात. यातील एक सपाट पृष्ठभाग घासून त्याला आतल्या बाजूस गोलाई द्यायची. हा गोलाकार भाग घासून घासून अगदी आरशाप्रमाणे चकचकीत करायचा कि झाला दुर्बीणीत वापरला जाणारा अंतर्वक्र आरसा!
गॅलेलिओने जी दुर्बीण बनवली त्यामधे आरश्या ऐवजी भिंगे वापरण्यात आली. भिंगामधे असणारा रंगाचा दोष लक्षात आल्यानंतर अंतर्वक्र आरसा वापरण्याची युक्ती न्युटनने सुचवली. पण त्याकाळी सगळे आरसे हे धातूचेच असत. त्यासाठी तांबे आणि जस्ताचा मिश्रधातू वापरण्यात येत असे. त्याला स्पेक्युलम म्हणत असत. विल्यम हर्षलने अशाच प्रकारचा आरसा त्याच्या दुर्बीणीत वापरला होता. नंतरच्या काळात काचेवर धातूचा मुलामा देण्याच्या विविध पद्धती विकसित झाल्या आणि स्पेक्युलम कालबाह्य झाले. धातू वापरण्याचा मुख्य फायदा हा कि धातू हा मूळातच प्रकशाचे परावर्तन करीत असल्यामुळे त्याच्या अंतर्वक्र पृष्ठभागावर वेगळा मुलामा द्यायची गरज नसते. काचेच्या पॄष्ठभागावर मात्र अॅयल्युमिनिअम किंवा चांदीचा मुलामा द्यावा लागतो.
तर अंतर्वक्र आरसा बनविण्यासाठी आवश्यकता असते ती काचेच्या दोन जाड गोल तबकडींची. एक काच टेबलावर घट्ट अशी बसवायची. तीवर काचेपेक्षा कठीण अशा एकाद्या पदार्थाची पावडर पसरवायची. थोडं पाणी शिंपडायचं आणि दुसरी तबकडी त्यावर ठेवायची. तबकडीवर जरा जोर द्यायचा किंवा एखादं वजन ठेवायचं आणि खालच्या तबकडीवरून सरकवत पुढे न्यायची. काही इंच पुढे नेल्यानंतर पुन्हा सरकवत मागे आणायची. वरच्या तबकडीचं हे सरकवणं पंधरा-वीस वेळा चालू ठेवायचं. त्यानंतर खालची तबकडी काही अंशानी घड्याळ्याच्या दिशेनी फिरवायची त्याच बरोबर वरची तबकडीसुद्धा काही अंशाने पण घड्याळ्याच्य विरुद्ध दिशेने फिरवायची. आणी पुन्हा पंधरा-वीस वेळा घासावी.
अशा प्रकारे पंधरा ते वीस वेळा घर्षण, खालच्या आणि वरच्या तबकडीचं काहीं अंशांनी पण विरुद्ध दिशेला फिरवणं हि सायकल सुरू ठेवावी. अशा बर्याच सायकल नंतर वरच्या तबकडीचा पृष्ठभाग अंतर्वक्र तर खालच्या तबकडीचा पॄष्ठभाग बहिर्वक्र असा घासला जातो. वरची तबकडी आपण अंतर्वक्र आरसा म्हणून वापरतो तर खालच्या तबकडीला टूल (tool) म्हणतात.
आता तुम्ही म्हणाल आपण तर सरळ रेषेत मागे पुढे घासत असताना पॄष्ठभागांना कशी काय वक्रता येते? याचं उत्तर मात्र मी वाचकांवर सोडतो. थोडी डोक्याला खुराक.
घर्षणासाठी सुरवातीला जाड खडे असणारी पावडर वापरावी अगदी रेतीप्रमाणे. त्यामुळे घर्षणाची क्रिया जलद होते. सुरवातीला आवश्यक अशी वक्रता आणण्यासाठी ही पावडर आवश्यक असते.
आता आवश्यक अशी खोली आरशाला आली की नाही हे कसे ओळखावे? तर घासलेल्या पॄष्ठभाग थोडा ओला करावा. त्यामूळे खडबडीत असलेला आरशाचा पॄष्ठभाग काही प्रमाणात प्रकाश परावर्तीत करू शकेल. अशा ओल्या आरश्यावर सुर्याची किरणे पडू द्यावीत. लेखाच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे अंतर्वक्र आरसा ही किरणे त्याच्या फोकल बिंदूवर एकत्रित करतो. लहानपणी आपण काचेचे भिंग उन्हात धरून कागद जाळत असू तोच हा प्रकार. भिंगा ऐवजी आपण आरसा वापरतो इतकाच. आरसा आणी हा फोकल बिंदू यांच्या अंतर आपल्याला पाहिजे तितके असेल तर आरश्याला योग्य वक्रता आली आहे असं समजावं. साधारण पणे आरश्याच्या व्यासाच्या आठ किंवा त्यापेक्षा जास्त पटीच्या अंतरावर फोकल बिंदू असला तर त्यापासून बनणारी दुर्बीण बनवायला सोपी असते. या अंतराला आरशाचे नाभिय अंतर (focal length) म्हणतात. नाभिय अंतर जेवढे कमी तेवढी आरशाची खोली जास्त आणी त्यामूळे जास्त भाग घासून काढावा लागणार. पण हे आरसा घासायचं काम वाटतं तेवढं सोप नाही बरं का? काच ही एक ठिसूळ असली तरी ती निसर्गातील कठीण पदार्थापैकी एक आहे. म्हणूनच तर काच कापण्यासाठी हिरकणी चा वापर केला जातो.

कोणतीही वस्तू घासली जाउ शकते ती फक्त त्यावस्तू पेक्षा कठीण असणार्या वस्तूनेच. काच ही स्वत:च फार कठीण असते हे पचायला काही जणांना कठीण जाईल. हे समजून घेण्यासाठी काही सोपे प्रयोग करू शकतो. एखाद्या लोखंडी खिळ्याने एख्याद्या काचेवर ओरखडा पडतो का पहा. पोलाद वापरून पहा, काळ्य़ा पत्थरच्या तुकडा वापरून पहा. किंवा रोजच्या वापरातल्या आपल्या दॄष्टीने कठीण असलेला कोणताही कठीण पदार्थ वापरून पहा. काचेला मुळीच ओरखडा पडत नाही पण काचेवर एखादा आघात झाला तर तयार होणारे भेगा मात्र कचेमधून सहज पसरल्या जातात. त्यामूळे काच सहज तडकते. मग आपण म्हणतो काच ठिसूळ असते!
काचच काय पण पोलाद, लोखंडासारखे धातू किंवा दगड घासण्यासाठी काही ठराविक पदार्थ वापरावे लागतात. काही पदार्थ नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत तर काही प्रयोग शाळेत बनवावे लागतात. खाणीत सापडणारे काही प्रकारचे खडक हे अशा कामी वापरता येऊ शकतात. प्रयोग शाळेत सिलिकॉन कार्बाईड, ऍल्युमिनिअम ऑक्साईड अशा प्रकारचे पदार्थ वापरले जातात. या पैकी सिलिकॉन कार्बाईड तुलनेने अतिशय कठीण त्यामुळे हिऱ्याखालोखाल हा पदार्थ वापरला जातो. त्यामानाने ऍल्यूमिनिअम ऑक्साईड कमी कठीण असल्याने हळूवार घर्षणासाठी वापरला जातो. आपण बऱ्याच जणांनी हे पदार्थ पाहिलेले असतील. उदा. धारवाले सुरीला धार काढण्यासाठी वापरतात ती गोल चकती, सुतार लोक त्यांच्या पटाशीला धार काढण्यासाठी वापरतात तो दगड हे सारे सिलिकॉन कार्बाईड पासून बनवलेले असते. इतकच काय लोखंडाचा गंज काढ्यण्यासाठी आपण जो पॉलिश पेपर (किंवा सँड पेपर) वापरतो यावर सिलिकॉन कार्बाईडची पावडरच चिकटवलेली असते.

बरं पण काच तरी काही कमी चिवट नसते. सिलिकॉन कर्बाईडने काच घासताना काचेबरोबरच सिलिकॉन कार्बाईडचा सुद्धा पार बुक्का पडतो.
वर सांगितल्या प्रमाणे काचेवर प्रक्रिया केली जाते ती तिन टप्प्यात. पहिला टप्पा काचेचा सपाट पॄष्ठभाग घासून अंतर्वक्र करणे, दुसरा ट्प्पा अंतर्वक्र पॄष्ठभाग अगदी गुळगुळीत करणे आणी शेवटचा टप्पा तिची तपासणी करून पॉलिश करणे. पहिल्या टप्प्यातील काच घासण्याचं काम जलद होण्यासाठी सर्वसाधारण पणे सिलिकॉन कर्बाईड्ची पूड वापरली जाते. ही पूड जाड असते, अगदी रेतीप्रमाणे. दुसर्या टप्प्यातील कामासाठी तुलनेने कमी कठीण अशी अॅरल्युमिनिअम ऑक्साईड किंवा खाणीतील विशिष्ट दगडाची पूड वापरली जाते. या प्रकियेला स्मुथिंग म्हणतात. स्मुथिंगसाठी पाच सात वेगवेगळ्या प्रकारची पूड वापरली जाते. सुरवातीला जाड कण असणारी, नंतर थोडे बारीक कण असणारी, त्यानंतर त्याहून बारीक कण असणारी आणि सगळ्यात शेवटी अगदी धूळ असल्यासारखी पावडर वापरतात. कणांच्या आकाराप्रमाणे काचेचा पॄष्ठभागही गुळगुळीत होत जातो.

छंदवर्गामध्ये लागणारी पावडर नेहरू विद्यान केंद्रानेच दिली होती. आम्ही मुलांनी या केंद्रात चार इंच व्यासाचा अंतर्वक्र आरसा बनविला होता. पण आरशाला पॉलिश मात्र केलं नव्हतं. हे पॉलिश काय प्रकरण आहे हे नंतर पाहू. दहा दिवस काच घासण्याचं काम सुरू होतं. त्यांनंतर पॉलिश केलं गेलं. आणि त्यानंतर छंदवर्ग संपला! फक्त अर्धवट असा अंतर्वक्र काच बनवून संपला. पुर्ण दुर्बीण तयार झालीच नाही, तर त्यातुन निरिक्षण करणं तर सोडाच. इकबाल नावाचे सर हे सारं शिकवित होते. त्यांना त्या पावडरी, काचेच्या तबकड्या कुठे मिळतील म्हणून चौकशी केली. सरांनी गिरगावच्या राजू पटेलांचा फोन नंबर दिला. राजू पटेल हे मुंबईतील एक दुर्बिणींची उत्पादक आणि विक्रेते. तसेच ते एक हौशी खगोल अभ्यासक ही आहेत. नेहरू विज्ञान केंद्राच्या गच्चीवरील सौर दुर्बीणीचा आराखडा यांनीच बनविला. यांना फोन करून आवश्यक वस्तुंच्या किमती विचारल्या तर ऐकून दरदरून घाम फुटला. सगळच साहित्य एवढं महाग होतं कि हा छंदच परवडणेबल नव्हता. पण आशा सोडली नाही.

शेवटी आम्ही फुकटे छंदिष्ट! छंद जोपासावा पण कमीत कमी पैसे खर्च करून! एक तत्व माहीत होतं जर एखाद्या पदार्थाने काचेला ओरखडा पडत असेल तर तो पदार्थ काच घासायला वापरता येऊ शकतो. असे कोणते पदार्थ आपल्या रोजच्या वापरात असू शकतील या दिशेने विचार सुरू केला. महाराष्ट्रात सापडणार्या काळ्या दगडामध्ये लोह विपूल प्रमाणात असतं हे शाळेत शिकलो होतोच. हाच दगड वापरला तर? कुठून तरी काळ्या दगडाचा एक तुकडा आणला आणि तो काचेच्या तुकड्यावर घासून पाहिला. पण चिवट काचेने दाद दिली नाही!

अशा बऱ्याच शोधानंतर शेवटी एकदाचा तो पदार्थ सापडला. एका सकाळी आमच्या विभागातील पिठाच्या गिरणीत एकजण गिरणीतील दगडी जातं बाहेर काढून त्यावर दाते पाडण्यासाठी ते ठोकत बसला होता. शेवटी घर्षणासाठीच वापरण्यात येणारा तो दगड. काय भरवसा तो काचेपेक्षा कठीण असेलही कदाचित. घरी तशाच दगडाचा एक तुकडा होता. घरी सुरीला धार काढण्यासाठी वडिल तो वापरत असत. एका काचेच्या तुकड्यावर तो दगड घासून पाहिला तर तो काचेवर एक सुरेख स्पष्ट दिसणारा ओरखडा पडलेला दिसला! चला एक काम झालं. आपल्याला आवश्यकता आहे ते याच दगडाच्या पावडरची. घरी एक खलबत्ता पडून होता. घरात मिक्सर आल्यापासून बिचारा रिटायर्ड झाला होता. मी त्याला परत कामाला लावले आणि घरातला धार काढायचा दगड कुटायला सुरवात केली. अपेक्षेप्रमाणे घरून शिव्या मिळाल्याच. पण एकदा दगडाचे तुकडे झाल्यावर परत थोडाच जोडता येणार आहे. त्यामुळे सगळेच मुकाट्याने शांत झाले. दगड कुटायचं काम सुरू झालं. ठोक् ठोक् चा आवाज काही दिवस सुरू राहिला. शेजारी पाजारी कावून घरी विचारायला आले. ते दुर्बीणीच सांगितल्यावर गोंधळले. कुठं दुर्बीण, कुठं दगड नि कुठं तो खलबत्ता! कशाचा कशाला संबध? हा त्रास काही दिवस तरी आपल्याला सोडणार नाही अशी खात्री पटाल्यावर मुकाट्यानं माघारी फिरले.
दगड तर कुटला, आता वेगवेगळ्या जाडीची पावडर कशी वेगळी करायची? पिठाच्या वेगवेगळ्या चाळण्या वापरून पहिल्या काही जाड कण असणारी पावडरी तर मिळाल्या. सुकी पावडर वस्त्रगाळ करूनही काही पावडर मिळाल्या पण सगळ्यात शेवटची धूळीप्रमाणे असणारी पावडर मात्र काही मिळत नव्हती. कारण कुटताना अशी धूळ हवेतच उडून जात होती! शेवटी अगदी बारीक जाडसर कापडातून वस्त्रगाळ करून पावडर मिळाली एकदाची. काही चमचे पावडर मिळवण्यासाठी काही तास वस्त्रगाळ करावं लागत होतं. पण इथं कुणा लेकाला काही उद्योग होते? अकरावीचं कॉलेज संपलं की आपण मोकळेच होतो. (त्यावेळी मी अकरावी आर्टस् ला होतो. माझे प्रगती पुस्तकावरचे माझे मार्कस् पाहून हा अकरावी आर्टस् च्या लायकीचा माणूस आहे म्हणून घरी घोषीत झाल्यामुळे मी एका टुकार कॉलेजात अकरावी शिकत होतो. त्यावर्षी मी सहा पैकी पाच विषयात नापास झालो. ज्या विषयात पास झालो त्याचा पेपर मला आधी च मिळाला होता आणि त्यातही मि फक्त एका मार्काने पास झालो होतो )
जे काय छंद वर्गात शिकलो होतो त्याचा पुन्हा एकदा सराव करायची वेळ आली होती. ५ मिमि जाडीचे एक काचेचे दोन तुकडे कुठून तरी पैदा केले. पक्कड घेऊन काचेचे लहान लहान तुकडे काढू लागलो आणि थोड्या वेळाने ५ सेमी व्यासाची एक सुरेख चकती तयार झाली. धार काढायच्या दगडाचा एक छोटा तुकडा मी शिल्लक ठेवला होता. त्याने चकतीच्या कडांना फिनिशिंग केलं. अशाच प्रकारे अजून एक चकती तयार केली. जमीनीवर काचेचे तुकडे पसरले. त्यामुळे पुष्कळ शिव्या खल्ल्या.
एक चकती आरसा म्हणून वापरली तर दुसरीचा टूल म्हणून वापर केला. वास्तविक ५ सेमी व्यासाचा आरसा बनविण्याची कल्पना मूर्खपणाची होती. आरसा हा कमीत कमी तीन इंच व्यासाचा असेल तर तो बनवणे फायदेशीर असते. पण मला तर फक्त काच घासण्याची पद्धत अभ्यासायची होती.
शेवटी एका मे महिन्यात ५ सेमी व्यासाची १ मिटर फोकल लेंग्थ असणारा एक आरसा तयार झाला. सहाजिकच त्यावर चांदी किंवा ऍल्यूमिनिअमचा थर नव्हता. तो बाहेरून करून घ्यावा लागतो. पण आरशावर पॉलिश मात्र केलं होत.
आता हे पॉलिशींग काय असतं आणी ते कसं करायचं हे थोडक्यात पाहू.
आरसा तयार करताना कितीही बारीक पावडर वापरली तरी काच कधीच नितळ पारदर्शक होत नाही. डोळ्यांन न दिसणार्या सुक्ष्म खड्ड्यांमुळे ती दुधी रंगाची दिसते. पॉलिश केल्यानंतर हे बारीक खड्डे सुद्ध घासून काढले जातात. वर सांगितल्याप्रमाणे काचेचं घर्षण करताना आपण टूल म्हणून दुसरी काचेची तबकडी टूल म्हणून वापरतो. घर्षण करताना हा टूल पावडरीच्या कणांना एक मजबूत असा बेस देतात. त्यामूळेच हे कण आघात करून आरश्यावर (आणि टूलवर सुद्धा) घर्षण करू शकतात. पॉलिश करताना मात्र आपण हा मजबूत बेस वापरत नाही. तर यासाठी आपण बेस म्हणून डांबर वापरतो. असा डांबराचा टूल तयार करताना, काचेच्या टूलवरच डांबर वितळवून ओतले जाते. साधारण गरम आणी मऊ असतानाच त्यावर आरशाचा पृष्ठभागाचा दाब देऊन बहिर्वक्र आकार दिला जातो. घर्षण योग्य रितीने व्हावं म्हणून त्यावर इंग्रजी व्ही आकाराचे चॅनल कापून एक चौकोनी तुकड्यांची ग्रिड बनवावी.

यावेळेस घर्षणासाठी कठीण अशा सिलिकॉन कार्बाईडची पावडर न वापरता पॉलिशिंग साठी योग्य अशी फेरिक ऑक्साईड किंवा सेरिअम ऑक्साईडची पावडर वापरावी. या पदार्थाचें कण बरेच लहान असतात शिवाय फार कठीण नसल्याने काचेवर ओरखडे देखील पडत नाहीत. अशा डांबराच्या टूलवर आरसा घासताना डांबर कणांना एक मऊ बेस देते त्यामुळे कण काचेवर अगदी हळूवार पणे घर्षण करतात व काचेला आवश्याक असा नितळ पणा येतो. ही बरीच वेळखाऊ प्रक्रिया असते.
माझ्या छोट्याश्या काचेला पॉलिश करताना मी फेरिक ऑक्साईड वापरले होते. माझा मावस भाऊ सदा पाटील काळबादेवीला कामाला होता. त्याने कुठेतरी केमिकल्सचं दुकान पाहिलं होतं. फेरिक ऑक्साईडचं का काय म्हणताते त्याचं नाव कागदावर लिहून द्यायला सांगितलं आणि घेऊन आला. वास्तविक हे प्रयोग शाळेत वापरलं जाणारं रसायन होतं त्याचा पॉलिशिंगसाठी किती उपयोग होईल शंका होती. पण त्याने काम झालं आणि माझा छोटासा आरसा नितळ झाला.
एका दुपारी आकाशात ढग असताना मी माझ्या अरशाने त्यांच्या स्वच्छ प्रतिमा एका कागदावर पाहिल्या आणि आरसा ढोबळमनाने का होईना पण काम करत असल्याची पावती मिळाली.
ऎल्युमिनिअमचा थर मात्र घरी देता येण्यासारखं नव्हतं. मोठमोठे दुर्बीण उत्पादाक सुद्धा हे काम बाहेरूनच करून घेणं पसंत करतात. पण एवढ्या छोट्याशा अरशावर रिफ्लेक्टीव कोटिंग करून घेणं शहाणपणाचं नव्हतं. पण या कामा मुळे ग्रांईडींग आणि पॉलिशिंगचे बरेच बारकावे ध्यानात आले होते.
मध्यंतरी पुन्हा एकदा बंडखोरी केली.अकरावी आर्टस् अगदी वाईट नापास होऊन सोडली! एक वर्ष वाया घालवलं. पुन्हा एका टुकार ज्युनिअर कॉलेजमध्ये गेलो. नाहीतर मला कुठल्या चांगल्या कॉलेजमध्ये मला उभं केलं असतं म्हणा! पण मी पुन्हा एकदा अकरावी पण विद्न्यान शाखेत प्रवेश घेतला. आणि आश्चर्य म्हणजे पहिल्याच परिक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून पास झालो! पण दुर्बीणीचा विषय मात्र मागे राहीला. पदवी आणि व्यावसाईक शिक्षण पूर्ण झाल्यावर एका फडतूस कंपनीत फडतूस पदावर कामाला राहिलो. पण हाती थोडा पैसा खेळू लागल्यावर पुन्हा एकदा माझी वळवळ वाढली. थेट सहा इंच व्यासाची दुर्बीण बनवायचं पक्कं केलं.
पण यावेळेस ढोबळ पणा करायचा नव्हता. अनमान धपक्याने कामं होतात पण त्यासाठी बरेच श्रम वाया जातात. कामा मध्ये पद्धतशीर पणा असेल तर फार कमी कष्टात काम होऊ शकतं हे पक्कं समजलं होतं. मधल्या काळात अल्बर्ट इंगल्स या संपादकाने संपादित केलेलं “एमॅच्युअर टेलेस्कोप मेकिंग” हे एक उत्कृष्ट पुस्तक आमच्या कॉलेजच्या म्हणजे डि. जी. रुपारेल कॉलेजच्या ग्रंथालयात उपलब्ध असल्याचं समजलं. तिथल्या ग्रंथपालांना कॉलेजचा माजी विद्यार्थी असल्याचं सांगुन पुस्तक मिळवलं. पुस्तकाची अगदी पारायणं केली. आरशाची अचूकता मोजण्यासाठी वापरण्यात येणारी फोकाल्ट टेस्टचाही अगदी बारीक अभ्यास केला. आणि पुन्हा एकदा दुर्बीण बनविण्याच्या कामाची सुरवात केली.
सहा इंच व्यासाच्या दोन तबकड्या बजारातून विकत आणल्या. एवढ्या मोठ्ठ्या काचेसाठी पुन्हा एकदा दगड कुटायची मात्र तयारी नव्हती! मग काचेच्या दुकानातूनच चौकशी करायला सुरवात केली. शेवटी एका दुकानातून माहीती मिळाली. मुंबईत सात रस्त्याला कारखान्यांसाठी घर्षणासाठी लागणारी पावडर मिळते असं कळलं. दुसऱ्याच दिवशी सातरस्ता गाठला आणि पावडर बद्दल विचारलं. एका नोकराने पावडरींचं प्रचंड मोठं गोडाऊन दाखवलं. वेगवेगळ्या जाडीच्या कणांच्या पावडरी तिथे पोती भरुन ठेवल्या होत्या. आणि आश्चर्य म्हणजे त्या पावडरी दुसरं तिसरं काही नसून मी फोडलेल्या दगडांच्याच होत्या! पॉलिशींग साठी लागणारं फेरिक ऑक्साईड आणि सेरिअम ऑक्साईडही उपलब्ध होतं. सेरिअम ऑक्साईड फेरिक ऑक्साइड पेक्षा फार मोठ्या वेगानं काम करतं. म्हणून तेही पन्नास ग्रॅम घेतलं.
घरी पुन्हा एकदा काच घासायचं काम सुरू झालं. घरच्यांनी विशेष करून शेजाऱ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला.
काच घासणे, त्यावर ओरखडा पडला म्हणून तो पुन्हा आगोदरच्या पावडरने घासणे, डांबराचा टूल तयार करणे, तो खराब झाला म्हणून पुन्हा दुसरा तयार करणे असं करता करता दहा महिने गेले.
पॉलिशिंग साठी विशेष काळजी घेतली. मला माझ्या आरशावर एकही ओरखडा किंवा खड्डा नको होता. त्यामुळे हिरे तपासायच्या भिंगातून ओरखडे ओळखून मी पॉलिशिंगची प्रकिया करत होतो. फोकाल्ट टेस्ट करून आवश्यक असणारी अचूकता आरशात आणली आणि समाधान झाल्यावर आरसा ऍल्युमिनिअमचा थर देण्यासाठी राजू पटेलांकडे गेलो. पेपरातून चकाकणारा आरसा उलगडून राजू पटेलांसमोर ठेवताच ते उत्साहने म्हणाले,
“एकदम परफेक्ट पॉलिश किया तुने छोकरे!”
मी एकदम खुश झालो. माझा पहिलाच आरसा आणि त्याचं राजू पटेलांसरख्या दिग्गजाने कौतूक करावं, साधं काम आहे का?
शेवटी पटेलही हौशी दुर्बीण बनविणारेच. त्यांना चैन पडेना. त्यांनी आपली टेस्टींग उपकरणं काढून आरसा त्यामधे जोडला आणि अचूकता मोजण्याचा प्रयत्न केला. राजू पटेल हे यामध्ये एवढे एक्सपर्ट आहेत की ऍल्युमिनिअमचा थर न लावताच आरसा दुर्बीणीच्या नळीत जोडून त्याची अचूकता मोजतात. त्यांनी बराच वेळ प्रयत्न केला पण काही बोलत नव्हते. मी काय समजायचं ते समजलो. आरशाचा पुरता बट्ट्याबोळ झाला होता. शेवटी आरसा बाहेर काढता काढता म्हणाले. तुला ऍल्युमिनिअम कोटिंग करुन देतो. मग टेस्ट करू. मी निराश झालो. विचार केला. नाही तरी आपली पहिलीच दुर्बीण आहे. बिघडली तर बिघडली. दुर्बीण पुर्ण केल्याचं समाधान तरी मिळेल.
राजू पटेल माझ्या एकट्यासाठी ऍल्युमिनिअम कोटिंग करणार नव्हते. दर तीन-एक महिन्यांनी लॉटनेच कोटिंग करावे लागते. त्यामुळे वाट पाहाणं आलंच.
मधल्या काळात मी दुर्बीणीची नळी, स्टॅंड यावर काम केलं. दुर्बीणीच्या नळी साठी महंमद अली रोडवर बराच फिरलो. मला अंदाजे सात इंच व्यासाची पि.व्हि.सी. पाईप हवा होता. अडचण ही होती कि एवढ्या मोठ्या नळीचा पाच फूट लांबीचा तुकडा कोणी द्यायला तयार नव्हता. शेवटी एका डीलर कडे एक तुकडा होता पण त्याच्या भायखाळ्याच्या गोडाऊन मध्ये. तसाच भायखाळ्याला येऊन नळी घेऊन घरी आलो. परेलला आल्यावर सगळेच कुतुहलाने नळीत कडे पाहत विचारत होते,
“हे कशासाठी आणलंस रे?”
“कौलांसाठी पोखर बनवायला”, मी थाप मारली. परेल मधल्या त्या गिरणगावात दुर्बीण बनवणे हा प्रकार आई शप्पथ कुणाच्या गळ्यात उतरला नसता/नव्हता!
काही महिन्यानंतर राजू पटेलांचा फोन आला तुझ्या आरशावर कोटिंग झालेलं आहे घेऊन जा. मी घाबरत घाबरतचं राजू पटेलांकडे गेलो. कोटिंग नंतर पटेलांनी आरसा तपासुन ठेवला असणार. राजू पटेल हा फार फटकळ माणूस. आरसा खराब निघाला तर चार शिव्या द्यायला ही कमी करायचा नाही. घराची बेल वाजवली. दरवाजा उघडताच पटेल उत्साहने म्हणाले,
“आओ आओ छोकरे. एकदम टॉप क्वालिटी मिरर बनाया तुमने, एकदम हाय मॅग्निफिकेशनपे भी मस्त चलेगा!”
मी चाट पडलो. मी शिव्या ऐकायच्या तयारीने आलो होतो तर हाती कौतूक आलं.
सुरवातीपासूनच मी अती काळजी घेतली होती. त्यामुळे एक उच्च दर्जाचा दुर्बीणीचा आरसा माझ्याकडून तयार झाला होता!
दुर्बीणीची नळकांडी घरी तयारच होती. छोटी मोठी जोडणी केली आणि दुर्बीण दुरच्या एका पिंपळाच्या झाडावर रोखली. एकच पान दुर्बीणीतून दिसत होतं. पानाला असलेलं एक छिद्र अगदी स्पष्ट दिसत होतं. तेवढ्यात कुठूनशी एक चिमणीच पाना समोरच्या फांदीवर येऊन बसली. तिच्या पिसातले बारकावे अगदी स्पष्ट पणे दिसत होते.
मी दगड फोडत होतो आणि शेजारी माझ्या नावाने खडे फोडत होते! म्हणून त्यांनाही दुर्बीणीतून दुरच्या वस्तू दाखवल्या. आग्रहाने न विसरता बोलवल्याने शेजारीही राग विसरून खूश झाले!
दुर्बीण बाहेर घेऊन जायचा तर इलाजच नव्हता. टपोरी, बेवडी पोरं मुंग्यांसारखी गोळा झाली असती, दात विचकून हसली असती. रात्री घराची काही कौलं काढली आणी दुर्बीण आकाशात रोखली आणी पहिल्यांदा शनी ग्रह आणि त्याची कडी पाहिली, काही दिवसांनी गुरू ग्रह आणि त्याचे चार चंद्र पाहिले. चंद्रावरची विवरं तर अगदी सहज दिसत होती. मृग नक्षत्रामधला ओरायन नेब्युला पाहिला.
काही दिवसांनी लाल डब्याचा यष्टीत टाकून दुर्बीण कोल्हापूरात गावाला नेली. घरामागच्या शेतात जाऊन पुष्कळ आकाश दर्शन केलं. गावाला खबरी फार लवकर पसरतात. एका रात्री गावतली सगळी म्हातारी कोतारी, लहान मुलं नि काही बाया सुद्धा आमचा घरी दुर्बीण बघण्यासाठी आल्या.
काही बायकांनी माझ्या आत्तीला विचारलं.
“काय आनलंय ग ते रमेसनं मुंबईतनं?”
“त्येला दुर्गुणी म्हनत्यात!”
माझ्या दुर्बीणीचं दुर्गुणी म्हणून नामकरण केलेलं पाहून हसू आलं.
त्या दिवशी आकाशात अष्टमी-नवमीचा चंद्र होता. सगळ्य़ांना दुर्बीणीतून चंद्र दाखवला. चंद्र प्रकाशामुळे गुरू ग्रह स्पष्ट दिसत नव्हता. आणि तो दिसला असता तरी त्याचं काही विशेष कुणाला नव्हतं. कुणी ऐकलंच नव्हतं त्याबद्दल तर त्याचं कौतूक कशाला? चंद्र मात्र सगळ्यांनी आवडीने पाहिला. अगदी नासालाही दिसल्या नसतील असा गोष्टी या मंडळींनी माझा दुर्बीणीतून पाहील्या. एका आजोबांना तर चंद्रावर काळ्या पाण्याचं तळंच दिसलं. असेल बुवा!
गावात बातमी झपाट्यानं पसरली. आमच्या जितकर भावकीतली एक ज्येष्ठ बाई, आम्ही तिला थोरली आई म्हणतो, तिला माझं दुर्बीणीचं प्रकरण समजलं. दुर्बीणीतून साध्या डोळ्यांना न दिसणाऱ्या कोणत्याही वस्तू दिसतात हे ही समजलं! तिचा एक जावई तिच्या नातवा सकट कुठे नाहीसा झाला होता. तिनं आपल्या लहान मुली कडून म्हणजे आमच्या माल्लाक्का कडून निरोप पाठवून दिला,
“माझं पोरगं तेवढं कुठं दिसतंय का बघ की रं तुझ्या दुर्गुणीतून!”
दुर्दैवाने मला दुर्बीणीतून थोरली आईचं पोरगं दिसलं नाही.
एका संध्याकाळी गावातील काही शिकलेल्या सवरलेल्या लोकांसाठी आकाशदर्शनाचा कार्यक्रम ठरवला होता. मावळण्या पुर्वीच दुर्बीण जोडून तयार ठेवली होती. तेवढ्यात पश्चिमेकडे लक्ष गेलं. योगायोगाने त्या दिवशी चंद्र आणि शुक्राची युती होती. चंद्राची बारीक कोर आणि त्याला चिकटुनच शुक्राची कोर असं सुरेख दृष्य दुर्बिणीतून दिसलं. दुर्बीणीचा पुरेपूर आनंद घेऊन मुंबईला माघारी आलो.
त्या दिवसापासून दुर्बीण त्या पोत्यात अशीच पडून आहे!



हीच ती माझी लाडकी दुर्बीण



हे असं पहायचं.

माझा जुना पुराणा SLR कॅमेरा दुर्बीणीला जोडून दुरच्या शेतातील मक्याच्या तुर्‍याचा फोटो


.

गुलाबाचे फळ

गुलाबाचे फळ

गुलाब इतके सुंदर असतात कि ती फार वेळ झाडावर राहत नाहीत. लगेच तोडली जातात. पण यामुळेच गुलाबालाही फळं लागतात हे बर्‍याच जणांना ठाऊक नसते. ज्यांना ठाऊक असते त्यांनी ती पाहिलेली नसतात.
काही दिवसांपुर्वी मी गावाहून एक गावठी (नेटिव्ह) जातीच्या गुलाबाची काडी मागवून घेतली. या नेटिव्ह जातींना सहज फळे धरतात. असंच एक फूल मी न तोडता झाडावरच राखून ठेवलं. फूल मावळल्यावर त्याच्या बुडाशी एक फळ धरले. पण या फळांना पिकण्यासाठी बरेच महिने जावे लगतात. मला तर सहा महिन्यंपेक्षा जास्त काळ जावा लागला. गुलाबाच्या पक्व फळा मध्ये व्हिटॅमीन सी प्रचंड प्रमाणात असतं अगदी संत्र्यापेक्षाही! चवीला याचा गर तसा आंबट होता.
वाचकांसाठी या गुलाबाचे फोटो टाकत आहे.
अधिक माहीती
गुलाबाच्या नवीन जाती अशाच प्रकारे तयार केल्या जातात. त्यासाठी "आई" झाडावर गुलाबाचे फळ राखून ठेवायचे. ते पुर्ण उमलण्यापुर्वीच त्याच्या पाकळ्या काढून ते फूल एका प्लॅस्टीकच्या पिशवीने झाकून ठेवायचे जेणेकरून त्यावर नको असलेल्या "बाप" फुलाचे परागकण पडून नयेत.आई फूलाचे स्त्रीकेसर पुर्ण तयार झाल्यावर त्यावरची पिशवी सोडून ठरावीक अश्या जातिवंत "बाप" फुलाचे पराग कण टाकावेत. नशीब चांगले असल्यास "आई" फुलाला फळ धरेल. नशीब आणखी चांगले असल्यास ते फळ टिकेल नि पिकेल. नशीब आणखी आणखी चांगले असल्यास त्यापासून तयार झालेले बी उगवेल. आणि शेवटी नशीब अती उच्च असले तर एखादी नवीन जातिवंत फुलाची जात तुमच्या नावावर नोंद होईल.
व्यवसाईक गुलाब उत्पादक "आई" आणि "बाप" फुलांचा जिनॅटीकल अभ्यास करून नवीन तयार होणार्‍या गुलाबाचा अंदाज बांधून कष्ट कमी करतात. उदा. हायब्रीड टी गुलाब हा टी गुलाब आणि परपेच्युअल गुलाबाच्या संकरातून तयार केला गेला आहे. या हायब्रीड गुलाबामध्ये सुद्धा रंग आणि इतर वैशिष्ट्या नुसार बरेच उपप्रकार आहेत.
दुर्दैवाने भारतिय हायब्रीडायजर ची संख्या नगण्य आहे. कारण संशोधनासारखी फालतू कामं करणं आम्हा भारतियांच्या स्वभावात बसत नाही.
मी सुद्धा शेवटी भारतियच म्हणून आपलं नुसतच गुलाबाचं फळ वाढू दिलं. आता बघू माझं नशीब कसं आहे ते.
फळाच्या बुडाशी तयार झालेलं फळ
raw fruit

पक्व झालेल फळ
rippen fruit

rippen fruit

पक्व फळाचा छेद

फळाचा छेद

फळातील बिया

फळातील बिया

Saturday, November 27, 2010

कांडेपोहे

रविवारच्या सकाळी जांभई देत उठलो. कामाची सुट्टी, पेपर वाचन, रविवारची पुरवणी, फक्त खाणं आणि तंगड्या पसरून टि. व्ही. पहाणं. काय साला दिवस आहे! नाद करायचा नाय!
आंघोळ उरकून पेपर उघडला आणि आत आवाज दिला,
"चहा आंण गं आणि बरोबर कांदपोहे सुद्धा"
बाहेर फक्त चहाच आला.
"कांदेपोहे कुठे आहेत?"
"मिळणार नाहीत"
मिळणार नाहीत? म्हणजे काय? रविवारच्या सकाळी सकाळी तिरसट उत्तर?
धोका आहे राव. विचार करून पाहीला. काल भांडण वगैरे तर काही झालं नव्हतं. टि. व्ही. वरच्या बर्‍याच कार्यक्रमात दाखवतात, बायकोचा वाढदिवस पती विसरला कि मग बायको रागावते.
च्यामारी कसा काय विसरलो मी? जाऊ दे सरळ सरळ शुभेच्छा देऊन टाकू आणि दुपारी जेवायला बाहेर नेऊ. हाय काय नाय काय.
मी "हॅप्पी बर्थडे, डार्लिंग" असा फिल्मी डायलॉग ठोकून दिला.
"गप्प बसा, तो झाला कधीच" बायको आणखीणच डाफरून म्हणाली.
"अरे हो, आपण मागच्याच महिन्यात साजरा केला तुझा वाढदिवस नाही का? विसरलोच." मी सुद्धा माझी चूक मान्य केली.
"तो माझा नाही आपल्या लग्नाचा वाढदिवस होता. माझा वाढदिवस दोन महिन्यांपुर्वीच झाला आणि तुम्ही तो विसरला होतात. मीच आठवण करून दिली होती"
मी विचार करत राहिलो.
पण मग त्याचा आजच्या कांदेपोह्यांशी काय संबंध? काही नीट आठवत नाही पण कदाचित त्यादिवशी हिने माझ्याशी कचकचीत भांडण केलं असेल. म्हणजे नुकसान भरपाई झालेली आहे.
पण मग आज कांदेपोहे मिळणार नाहीत याला काय अर्थ आहे? विचारून खुलासा केला पाहिजे. पण आपला बाणा कायम ठेऊन. दोन महिन्यांपुर्वी मी तिचा वाढदिवस विसरलो होतो मान्य आहे. पण त्यासाठी आज चिडायचं काय कारण?
"ते जाऊ दे. कांदेपोहे का मिळणार नाहीत ते सांग" मी ही तेवढ्याच तिरसटपणे विचारलं.
"कांदे नाहीत", खुलासा झाला.
हात्तिच्या, एवढंच ना, मग त्यात एवढं फुगण्यासारखं काय आहे. पण मी चिडलो होतो.
"कांदे नाहीत? रविवार म्हणून फिरायला गेलेत का?" मी तिरसटपणा कायम ठेवला.
"गेले चार दिवस ओरडून ओरडून सांगतेय कांदे आणा म्हणून. पार्ट्या करायला वेळ आहे पण घरचं काम करायला नाही."
या बायका म्हणजे म्हणजे फार राजकारणी. जाता जाता टोमणा मारलाच. माझा मित्र कांडेकराची बायको माहेराला गेलीय त्यामुळे वेळ आणि मोकळे घर कालच सत्कारणी लावले.
"मग जा आणि घेऊन ये कांदे त्यात काय विशेष?" मी जरा प्रेमळ आवाजात सुचवलं.
"मी काय काय म्हणून करायचं? नाहीतर रोज ऑफिस मध्ये तंगड्या पसरून झोपाच काढता आणि सुट्टीच्या दिवशी पार्ट्या करता. ऑफिसमधून येता येता काही सामान आणलंत तर काही बिघडतं का?"
मला ऑफिसमध्ये काम कमी असतं हे मान्य आहे पण प्रवासाचा त्रास कमी असतो का? स्वत:ची गाडी असली म्हणून काय झालं?
"मग सांगायचं कांदे आणा म्हणून, आयत्या वेळी तक्रार करायची नाही"
"रोजच तर सांगतेय. तुमच्या मोबाईल वर रिमायंडर सुद्धा लावला होता. पाहीलात का?"
मी आठवून पाहीलं. काल संध्याकाळी साडेसातला "कांदे" असा काहीतरी रिमायन्डर वाजला असल्याचं आठवलं. पण इंग्लीशमध्ये असल्यामुळे मी "कांडे" असा वाचला होता. म्हणून तर मला कांडेकराच्या घरी पार्टीला जायचं लक्षात आलं.
इतर मित्र आपण कसे बायकोला फसवून, ऑफिसातली कामाची कारणं सांगून पार्टीला आलो असल्याचं सांगत होती. मी मात्र माझ्या बायकोने स्वतःच पार्टीला जाण्यासाठी रिमायंडर मोबाईल मध्ये कसा टाकला हे सांगून सगळ्यांना गार करून टाकले होते. किती हेवा वाटला होता त्यांना माझा! घरी आल्यावर बायकोचा एक खोल मुका घेऊन त्याची परतफेड करायचा मी विचार करत होतो आणि ही बया आता म्हणते तो रिमायंडर 'कांडे' असा नसून 'कांदे' असा होता. रिमायंडर सुध्दा काय लिहीला, नुसता 'कांदे'. त्यातून काय अंदाज लावणार? "कांदे आणा" म्हाणून तरी लिहायचा होता. तो काय मी "कांडे आणा" असा वाचून कांडेकराला चहापाण्याला घरी आणणार होतो? कि त्याला 'कांडेपोहे' खायला घालणार होतो? मीच मनातल्या मनात केलेल्या विनोदावर मला बायको समोर फिदी फिदी हसायला आलं आणि बायको आणखीनच चिडली.
दोन किलो कांद्यांसाठी तीन मजले खाली उतरून दुकानापर्यंत चालत जाणे आणि परत ते ओझं घेऊन तीन मजले चढणं! छ्या, जमणार नाही! शिवाय काल पार्टी करून घरी येताना मी एका पायात माझं लाल चप्पल आणी दुसर्‍या पायात कांडेकराचं काळं चप्पल घालून आलो होतो. त्यामुळे सदरा लेंगा आणि त्या खाली ऑफिसध्ये घालायचं बूट घालून किंवा ऑफिसमध्येच घालायचे कपडे घालून जावं लागलं असतं. ते सुद्धा उपाशी पोटी.
वास्तविक मी झोपेतून उठण्या आगोदर ती कांदे घेऊन येऊ शकली असती. तिसर्‍या मजल्यावर तर घर आहे आमचं. आणि फक्त दोन किलो कांदे. पाच दहा मिनिटांचं काम. शिवाय तिची दोन्ही चप्पलं एकाच रंगाची होती. पण आळसच दांडगा तिला. काय बोलणार आपण?
तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि कांडेकरच घरात आला.
"माझं चप्पल दे रे. काय लेका स्वतःचं चप्पल ओळखंना व्हय तुला?", कांडेकर, "येताना मंडईतूनच आलो कांदे बटाटे स्वस्त मिळतात म्हणून चार किलो कांदे आणलेत, उगाच एवढ्या तेवढ्या कामासाठी बायकोची फरपट कशाला?"
च्यायला या कांडेकराच्या मी! गप्प चप्पल घेऊन जायचं तर नको ते बोलून बसला.
आता ही संधी सोडली तर बायको कसली?
"भाऊजी, यांनी सुद्धा काल पोतं भरून कांदे आणलेत मंडईतून माझ्यासाठी. आता महिनाभर तरी काळजी नाही. कांदेपोहे आणू का? थोडे खाऊनच जा." आतून आवाज आला.
नको नको म्हणत तो हुशार कांडेकर सटकला.
त्या टोमण्याची भरपाई मी वरचढ, आणखी तिखट टोमणा मारून केली. पण त्यासाठी दोन दिवस गेले. आणि तोपर्यंत बायको सगळं विसरून गेली आणि मी टोमणा मारल्यानंतर बावळटासारखी काहीच प्रतिक्रिया न देता निघून गेली. असली ही विसरभोळी आणि ही म्हणे माझ्या विसरभोळेपणावर बोलणार.
पण आता हिचं तोंड बंद करायलाच पाहिजे होतं. नाहीतर दिवसभर टोमणे ऐकायला लागले असते.

एक असं उत्तर द्यावं कि बस्स रे बस्स!
"हे बघ मला अशा फुटकळ कामासाठी पाठवणं म्हणजे शिवरायांच्या भवानी तलवारीने कांदे सोलण्यासारखं आहे. शेळीसारख्या क्षुद्र प्राण्याची शिकार करायला सिंह जात नाही. ते काम सिंहीणींनी करावं. सिंह आपला पडून असतो. म्हैस, रेडा, रानगव्यासारख्या भारीभक्कम सावजाची शिकार करायची असेल तरच सिंह शिकारीत सहभाग घेतो".
एक ऐतिहासिक आणी एक जीवशास्त्रीय उदाहरण देऊन मी बायकोचा सपशेल पराभव केला होता. तिला तोंडघशी पाडलं होतं. आता मुकाट्याने कांदे आणायाला जाईल.

पण एका क्षणाचाही विलंब न लावता बायकोही तडक म्हणाली,
"पण जंगलातील सिंह आणि सर्कशीतला सिंह यामध्ये फरक असतो. जंगलातील सिंह जिंवत रेड्यासरख्या मोठ्या जनावराला सहज मारतो. पण सर्कशीतल्या मरतुकड्या सिंहाला मारून टाकलेली कोंबडीसुद्धा स्वतःहून खाता येत नाही. त्याला ती कापून, सोलून, तु़कडे करून दिली तरच तो बिचारा खाऊ शकतो. आणि शिवरायांचं म्हणाल तर त्यांनी सईबाईला 'जा गं दुकानातून दोन किलो गनिमांना घेउन ये मला त्यांना भवानी तलवारीने हरवून स्वराज्य स्थापन करायचं आहे' असं नाही म्हटलं"

मला ती काय बोलली काही कळलं नाही. सगळंच असंबध्द वाटलं. पण 'सर्कशीतला सिंह','मरतुकडा', 'बिचारा' असे दोनचारचं शब्द समजले. पण वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. आता या क्षणीच, तडकाफडकी खमंग उत्तर तिला द्यायला हवं. नाही तर ती उद्यापर्यंत सगळं विसरून जाईल आणि माझ्या विचार करून दिलेल्या टोमण्याकडे ती दुर्लक्ष करण्याची शक्यता होती.

मी मोठ्या आवाजात म्हणालो,
"पण.......शिवाजीमहाराज......आणि....म्हणजे....कांदे........मरतुकडी कोंबडी.........शिवाय तु म्हणालीस ते गनिम........"
माझे शब्द अडखळत होते. काही म्हणा बायकोने तडक दिलेल्या उत्तरामुळे थोडासा गोंधळलो होतो हे मी मोठ्या मनाने मान्य करतो. पण थोडासाच बरं का. म्हणजे दोन किलो कांद्यांना जर कुणी 'पुर्ण गोंधळलेला' म्हणत असेल तर साधारण दोन लहान आकाराच्या कांद्यांएवढाच. म्हणजे शंभर ग्रॅम.
पण बायकोला विचार करायला वेळच न देता मी खेकसलो,
"ते काही असू दे,मला पुर्ण मरतुकडी कोंबडी पाहिजे म्हणजे पाहीजे". दोन लहान आकाराच्या कांद्यांएवढ्या गोंधळामुळे माझ्या तोंडून कांडेकराने आणलेल्या चार किलो कांद्यांएवढे चुकीचे शब्द निघाले होते. पण पुढ्यचाच क्षणी मला माझी चु़क लक्षात आली. पण पुढे काय बोलावं हे न कळल्यामुळे मी बायकोच्या तोंडाकडे टकामका पाहत राहिलो. बहूधा बायकोसुद्धा गोंधळली असावी. तिच्या तोंडून एक मोठ्ठा "काय???" निघाला आणि मग "कठीण आहे" असा काहीसा भाव तोंडावर आणून ती किचनमधे आपल्या कामाला निघून गेली. मी मग किचनच्या दारातूनच पाठमोर्‍या उभ्या असलेल्या बायकोवर ओरडलो,
"कांदेपोहे पाहिजे म्हणजे पाहिजे असं म्हणायचं होतं मला"
"कांदे आणा मग बनवून देईन"

"एक काम कर. ज्या ज्या गोष्टी हव्यात त्याची यादी कर आणि दे माझ्याकडे नतंर एकेक गोष्टी सांगायच्या नाहीत आधीच सांगून ठेवतो."
"मी वस्तू सांगते तुम्ही बनवा यादी."
अरे म्हणजे हा तर आळशीपणाचा कळस झाला! मी तीन मजले उतरून काही अंतर चालत जाऊन एवढं सगळं सामान आणायला चाललोय आणि हिला फक्त यादी बनवायचा कंटाळा? जाऊ दे कुणी वाद घालावा?
"बोलत रहा"
दोन किलो कांदे, दोन किलो बटाटे, पोहे अर्धा किलो, एक तेलाचा डबा .....
दरवाज्यात उभं राहून मी ओरडलो.
"पिशवी आण गं इकडे"
बायकोने पिशवी अक्षरशः कोंबली माझ्या हातात.
कोण बरं म्हणालं होतं तुला बायको फार गुणी लाभली आहे म्हणून? हां, माझी आत्या म्हणाली होती तसं. ती असायला हवी होती आता इथं मग कळलं असतं. नाहीतर एकदा मोबाईलवर हे सगळं रेकॉर्ड करून दाखवतो आत्याला. मग बघू काय म्हणते?
बरं जाऊ दे माझा मोबाईल कुठे आहे? विसरला वाटतं घरात. बरं झालं आताच आठवलं नाहीतर बायकोला अजून एक संधी मिळाली असती काहीतरी बोलायला.
परत मागे येऊन बेल वाजवली.
तिला कसं कळंलं कोण जाणे पण बायको दारातच माझा मोबाईल घेऊन उभी होती. पुन्हा तिने तो माझ्या हातात कोंबला.
"तुला काय वाटलं मी मोबाईल घ्यायचा विसरणार? " मी पुन्हा दरडावलो.
"बरोबर आहे", बायको हळू आवाजात म्हणाली. बहूधा तिने मघार घेतली असावी.
मी पुन्हा तोर्‍यात पाठ वळवून निघालो.
"अहो" म्हणून पुन्हा हाक ऐकू आली.
"जाताना हे तुमचं पैशाचं पाकीट तेवढं घेऊन जा. दुकानदार सामान देताना पैसे सुद्धा घेतो म्हणे".
"बरं बरं" असं पुन्हा ठसक्यात म्हणून मी पुन्हा पाठ फिरवली.
"अहो" म्हणून पुन्हा हाक आली.
"जाताना ती सामानाची यादी बनवलीत ती सुद्धा घेऊन जा."
मी परत फिरलो.
"अहो" पुन्हा हाक आली.
मी मागे न पाहताच तोर्‍यात पुढेच निघालो.
"जाताना शर्टाची बटणं वरखाली झालीत ती ठीक करा"
मी मागे न पाहताच शर्टाची बटणं व्यवस्थित केली.
"आणि शेवटी एका पायात तुमचं आणि दुसर्‍या पायात माझं चप्पल घातलंत ते ठिक करा"
दोन क्षण शांततेत गेले आणि नंतर ती फिदी फिदी हसायला लागली. मी सुद्धा मग तिच्या हसण्यात सामिल झालो. रविवारची सकाळ भांडण्यातून सुरू झाली आणि हसण्यात संपली.

Tuesday, March 24, 2009

गमतीशीर देवपुजा

मी हल्ली आठवड्यातून एक दिवस तरी घरातल्या देवाची पुजा करतो. रोज करायला अजून तरी जमलेलं नाही. देवपुजा झाल्यावर देवाबरोबर आईच्याही पायाला हात लावतो. वाटेतल्या सगळ्याच नाही पण बर्‍याच देवळासमोरून जाता जाता नमस्कार करतो. कधी कधी लांबच्या देवदर्शनाला सुद्धा जातो. पण आजही देवासमोर उभं असताना तो गमतीदार किस्सा आठवतो...

लहान पणी मी नास्तिक, विज्ञाननिष्ठ वगैरे काही तरी होतो. मी कधी देवळात जात नसे, घरातल्या देवाची पुजा करीत नसे. वडील सुद्धा देवभोळे होते असं नव्हे. पण देव, धर्म याचं कधी स्तोम माजवलं नाही. आई मात्र देवपुजा, इतर प्रथा आवर्जून पाळत असे. गिरणीकामगाराच्या घराला साजेसं असं देवालय आमच्या घरात होतं. एक लाकडी फळी भिंतीवर डोक्याच्या उंचीला आडवी मारलेली. त्यावर लाकडी चौकटीतील देव. टिटवाळ्याचा गणपती, महालक्ष्मी, दत्तगुरू आणि एक गोंडस बालकॄष्ण. बालकॄष्णाचा फोटो म्हणजे चक्क कोणतं तरी भेटकार्ड किंवा लग्नाची पत्रिका की असंच काहीतरी होतं. आईला तो बालकॄष्ण फार आवडला म्हणून तिच्या सांगण्यावरून त्याला फ्रेम बनवून देवाच्या फळीवर बसवलेला. अशा सगळ्याच देवाची रोज पुजा होत असे. ज्याला माझ्या लेखी काही अर्थ नव्हता. याविषयावरून माझे इतरांशी बरेच वादंग होत. माझा विज्ञानवाद, वैज्ञानिक दॄष्टिकोन सगळ्यांच्या डोक्यावरून जात होता. आणि त्यांचं उठसुठ प्रत्येक गोष्टीत घुसवलेला धर्म आणि देव माझ्या डोक्यावरून जात होता. माझं प्रत्येक गोष्टीचं वैज्ञानिक पातळीवरून केलेलं विश्लेषण इतरांना नेहमी अतिशहाणपणाचं वाटे, 'हा एवढाच शहाणा आणि जगातले इतर मुर्ख?' असे इतरांना वाटे. आणि इतरांचं 'चमत्कार होऊ शकतात' या विधानाचं पुरावा म्हणून रामायणातल्या रामाने सोडलेला ब्रम्हास्त्राचा दाखला ऐकून माझं टाळकं फिरत असे आणि या वादाचं पर्यवसान नेहमी भांडणात होत असे. पण हे चार पार वर्षापुर्वीचं सांगतोय. म्हणजे मी आता काही खुप पोक्त आणि अस्तिक झालोय असं नाही. पण काम धंद्याच्या निमित्ताने म्हणा किंवा इतर काही कारणास्तव म्हणा माझा वेगवेगळ्या प्रांतातील, धर्मातील लोकांशी संबध आला. आपलं बोलणं दुसर्‍याला घसा फोडून पटवून सांगण्यापेक्षा त्याचं पुरेसं ऐकून त्याच्या मनस्थितीचा अंदाज घेऊन हळूहळू सुचवून सांगण्यात शहाणपणा आहे हे कधीतरी उमगलं. असे बरेच अनुभव ऐकून घेतल्यानंतर देव, धर्म, अस्तिकपणा, नस्तिकपणा या सगळ्यांच्या माझ्या मनात असलेल्या संकल्पना धडाधड ढासळत गेल्या आणि पुर्णपणे विज्ञाननिष्ठ कसोट्यांवर आधारलेली जिवनशैली जगातला कोणताही समाज स्विकारू शकत नाही या निष्कर्शाप्रत मी कधीतरी आलो.

हा गमतीदार किस्सा माझ्या त्या स्थित्यंतराच्या काळातील आहे.

घराची पुनर्बांधणी झाली आणि त्या लाकडी फळकूटावरचे देव लक्ष्मी, दत्तगुरू, तो आईचा आवडता बालकॄष्ण सगळेच देव खाली उतरवण्यात आले. त्याऐवजी एकच छानसा छोटासा देव्हारा आणि त्या देवार्‍याला साजेशी अशी गणपतीची छोटीशी मुर्ती आणली. आईला नाहीच आवडला तो देव्हारा आणि ती देवाची मुर्ती. पण शेवटी तो देवच ना, असं म्हणून आईने मोठ्या मनाने त्याला स्विकारलं. वीत-दीड वीत उंचीचा देव्हारा आणी दोन तीन इंच उंचीचा गणपती! पहिल्या दिवशी गणरायाला देव्हार्‍यात बसवून आईच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित पुजा केली. सकाळी उठून बघतो तर गणराय उजवी कडे तोंड करून बसलेला. काय चमत्कार झाला काय असं म्हणून पुन्हा त्याला समोर तोंड करून बसवला. दुसर्‍या दिवशी पाहतो तर गणराय डावीकडे तोंड करून बसलेला! तिसर्‍या दिवशी तर गणराय पुर्णपणे पाठ दाखवत देव्हार्‍याच्या एका कोपर्‍यात रूसल्यासारखा बसलेला! नंतर लक्षात आलं शेवटी उंदीर म्हणजे गणरायाचं वाहन. तोच त्या लहान मुर्तीला जाता येता धक्के मारून वाहून नेत होता. बाकी त्या मुर्तीच्या आकाराचा गणपती सहज त्या खर्‍याखुर्‍या उंदरावर बसू शकला असता. शेवटी गणरायाच्या मुर्तिच्या तळाला गोंद लावून त्याला शांत एका जागेवर बसण्याची शिक्षा देण्यात आली!
पहिले काही दिवस व्यवस्थित पुजा झाली. पण परत गणरायाला वाईट दिवस आले. त्यावर धूळ बसू लागली. हार, फुलं सुकू लागली. एके दिवशी आई आमच्यावर चिडली. लगोलग साफसफाई करायला घेतली. देवारा भिंतीवरून उतरवला. देवारा आणि गणराय दोघानांही निरमा डिटर्जंटने चांगली घासून पुसून आंघोळ घातली, लख्ख केले, पंख्याखाली ठेवून वाळवले. देव्हारा पुन्हा भिंतीवर अडकवला. आई चिडलेली असल्याकारणाने ती लक्ष देत नव्हती. तुमचं तुम्ही काय करायचं ते करा म्हणून आई आपल्या कामात मग्न होती. इकडे मी ही मग गंभीरपणे आठवतील तेवढ्या पुजाविधी करत होतो. वर सांगितल्याप्रमाणे माझा स्थित्यंतराचा काळ असल्यामुळे माझं देवपुजेविषयीचं ज्ञान जेमतेमच होतं. आधी गंध लावायचा कि आधी हार घालायचा काही कळत नव्हतं. पणती ठेवायची की उदबत्ती लावायची? का दोन्ही लावायचं? बरं नक्की पणती म्हणायचं कि निरांजन म्हणायची हे अजूनही माहीत नाही. सगळा घोळ झाला होता. कशाचा कशाला पत्ता लागत नव्हता. मुळात काही सामान सापडत नव्हतं. आईला विचारण्याची सोय नव्हती. शेवटी गंध नाहीच सापडला. देव्हार्‍याला हार घातला. मुर्ती लहान असल्याने पुर्ण देव्हार्‍याला हार घालायची पद्धत आमच्या घरात रूढ झाली होती. फुलं देव्हार्‍यात ठेवली. पणती/निरांजन तेवढी आईने तयार करून दिली. ती देव्हार्‍याची ड्रॉव्हरसारखी फळी असते त्यावर ठेवली. सुगंधी अगरबत्ती पेटवून घंटीच्या किणकिणाटात देव्हार्‍यावरून एक-दोनदा फिरवली. हात जोडून नमस्कार केला. 'हे इश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे...' ही प्रार्थना मनातल्या मनात म्हटली. आणि झालं एकदाचं म्हणून टि. व्ही समोर बसलो.

मग माझे बंधूराज देवासमोर नतमस्तक झाले. मान वर करून विचित्र नजरेने देव्हार्‍या कडे पाहू लागले. एकदा माझ्याकडे त्याच विचित्र नजरेनं पाहीलं. मग पुन्हा देव्हार्‍यातील फुलं विस्कटली. खात्री झाल्यावर माझ्याकडे वळून मोठ्याने म्हणाले,
"देव कुठे आहे रे ए?"
मी ही मग फुलं विस्कटली. गणपती कुठं सापडतो का पाहीलं. गंध, घंटी सापडत नाही तो पर्यंत ठीक होतं. पण देवपुजा झाल्यावर देवच हरवणे हे काही झेपत नव्हतं. बंधूराज हसत होते आणि मी डोकं खाजवत कुठे बरं गणपती गेला असेल हा विचार करत होतो.
शेवटी गणपती पंख्यासमोर ठेवलेला सापडला. मघाशी गणपतीला आंघोळ घातल्यानंतर सुकण्यासाठी पंख्यासमोर ठेवला होता. हद्द म्हणजे मी तो तिथेच विसरलो आणि चक्क रिकाम्या देव्हार्‍याची पुजा केली होती !!!!!!!
आईने डोक्यावर हात मारला. बंधूराज खो खो हसू लागले. भलताच खजील झालो मी. पण मलाही मग हसू आवरलं नाही. पुन्हा गणरायाला देव्हार्‍यात बसवून पुजा केली.

मग काही दिवसांनी एक नवीन मोठ्ठा देव्हारा घेतला. त्यावर पुर्वीसारखे चौकटीतले देव बसवले, एक सोडून चांगले तीन देव आणले आणि ते देव्हार्‍या बाहेर निघणार नाही याची आवर्जून व्यवस्था केली. कितीही फुलांचा ढीग ठेवला तरी देव दिसतील याची व्यवस्था केली. देवाला गंध लावल्याशिवाय पुढे जायचं नाही असा अलिखित नियम केला.
आता मात्र माझ्याकडून अशा चुका होत नाहीत. प्रत्येक पुजा बरोबर होणार याची शंभर टक्के ग्यारंटीची खात्रीच.

Friday, January 23, 2009

क्रिकेटचा सामना आणि देवपूजा

गिरणगावातल्या माझ्या घराचा परिसर अगदीच विचित्र. चार पाच घरांची मांडणी एकमेकांकडे तोंडं करून, सर्व घरांना एक सामाईक अंगण, आणि इथं पोहोचण्यासाठी एक चिंचोळी गल्ली. सर्व घरांची दारं सताड उघडीच असत. सगळ्या घरातील चिली-पिली या सामाईक अंगणात खेळत. ज्यांना मोठ्या मैदानात इतर मोठी मुलं खेळायला घेत नाहीत अशा साधारण दोन ते सहा वयोगटातील लहान मुलांचं हे हक्काचं खेळण्याचं ठिकाण होतं. त्यांच्या आयासुद्धा मुलं नजरे पासून फार दूर नको म्हणून तिथेच खेळायची परवानगी देत. दुपारच्या वेळी यांच्या खेळांचा पार दंगा उडायचा. दुपारच्या वेळी तळलेली सुरमई आणि बांगड्याचा रसा खाऊन वामकु़क्षी घेणारे लोक या मुलांना फार डाफरायचे. पण त्यांच्या स्वत:चा कार्टा सुद्धा त्यांच्यात सामील असल्यामुळे फार काही करता यायचं नाही. मी मात्र जाता येता त्यांचे नवनवीन खेळ बघत असे.

या चिमुरड्यांचे खेळ तरी काय असणार? कुणीतरी त्यातल्या त्यात मोठा असणारा मास्तर व्हायचा आणि इतरांना शिकवायचा. या कंपूतली सगळ्यात मोठी व्यक्ती म्हणजे ७ बर्षाची सिद्धी. मास्तरीणबाईंची भूमिका बहूदा ती बजावायची. त्यातल्या काही अतिचिमुरड्यांना तर शाळा, गुरूजी, अभ्यास म्हणजे काय हेच माहीत नसायचं. मग काय तो आपल्या जाग्यावर शांत बसला तरी त्याने विद्यार्थ्याची जबाबदारी पार पाडली म्हणायचं! शिकवणीपेक्षा मास्तरांचं मारणं आणि म्हणून पोरांचं तारस्वरातलं केकाटणंच अधिक व्हायचं. कधी कधी क्रिकेट सुरू व्हायचं. 'क्रिकेट' बोलायला कठीण असल्या कारणानं त्याचे बॅट-बॉल असं उच्चारायला सोपं असं नामकरण व्हायचं. या चमूचं क्रिकेट संबधातलं ज्ञान अगाध होतं. फक्त त्यातल्या काही संज्ञा उच्चारायला भारीच कठीण असल्यामुळे त्याला प्रतिशब्द शोधावे लागायचे. म्हणजे "वाईड बॉल"ला "वाईट बॉल", "एल.बी.डब्ल्यू" ला "एबली डबलू" असं काहीतरी म्हणावं लागायचं. या संज्ञांचे अर्थही अगदी थोर होते. गोलंदाजाने चेंडू बरोबर टाकला नाही तर तो "वाईट बॉल" म्हाणून संबोधला जायचा. बॉल पायाला लागला की तो पाय ज्या माणसाचा आहे तो माणूस त्याच्या पायासकट एबली डबलू झाला असं म्हणायचं, भले तो माणूस एखादा फिल्डर्सपैकी का असेना. पण तो एबली डबलू झाला हे निश्चित. फिल्डरचे एबली डबलू झाल्यावर त्याला खेळातून बाद करायचे का नाही हे निश्चित ठाऊक नसल्याने तो चेंडू पकडणारा, त्याचा पाय आणि तो एबली डबलू सगळ्यांकडेच दुर्लक्ष करणे योग्य असा निष्कर्ष काढला जाई.

पहिलीतल्या आयुषच्या बहीणीची प्लॅस्टिकची बॅट आणि प्लॅस्टिकचा बॉल मिळाला की सामने रंगायचे. आयुष त्याला आणि त्याच्या नुकत्याच चालायला शिकलेल्या बहिणीला, अस्मिताला, खेळायला घ्यायच्या अटीवर आपली चेपलेली अमुल्य बॅट द्यायला तयार व्हायचा. एवढ्या लहान मुलीला बॅट-बॉल खेळता यायचं नाही असं इतर मुलं त्याला समजावुन सांगायची. पण आयुषचा हट्ट कायम असायचा. मग अस्मिताला खेळायला घेताना निर्माण होणाया अडचणींवर बराच खल व्हायचा. अस्मिता नुकतीच चालायला लागली असल्यामुळे बॉल टोलवल्यावर तीला 'रन' काढण्यासाठी पळता येणं शक्य नाही, यावर अस्मिताला फक्त बॅटिंग करायला सांगू, रन काढण्यासाठी मी पळतो असं आयुष सुचवत असे. पण मग अस्मिता आणि बॅट साधारण एकाच उंचीची असल्यारणाने तिला बॆंटींग करता येणं कठीण आहे अशी नवीनच समस्या निर्माण होई. यावर आपण तिला फिल्डींग करायला लावू असा उपाय ठरत असे. यावर कुणीतरी अस्मिताला पळता यायचं नाही या मूळ मुद्याची आठवण करून देई. यावर खात्रीचा उपाय म्हणून अस्मिताच्या खेळाची चाचणी करायचा प्रस्ताव कुणीतरी ठेवत असे. अस्मिता मात्र आपल्या इवल्याश्या हाताने बॅटला मिठीत घेऊन दुसया हाताने चॉकलेट खाण्यात मग्न असे. एवढ्या मोठ्या वादंगाचा विषय आपण आहोत याची सुतराम कल्पना तिला नसायची. चाचणी म्हणून आयुष अस्मिताकडे बॉल टाकत असे. सर्वजण "अस्मिता बॊल पकड", "लवकर पकड", "तो बघ तुझ्या पायाजवळ", "अग असं काय करतेस?" असा एकच गलका करीत. याचा परिणाम एवढाच व्हायचा की अस्मिता चॉकलेट खायचं सोडून आलटून पालटून सगळ्यांच्या तोंडाकडे पहायची. गलका थांबला कि परत चॉकलेट खाणं सुरू व्हायचं. असं दोनतिनदा झाल्यावर कोणीतरी आपल्याकडे बॉल नावाची वस्तू टाकणार आहे आणि आपण ती पकडायची आहे एवढं अस्मिताला समजत असे. अशावेळी चॉकलेट खाणं थांबवण्याऐवजी ते लवकरात लवकर खाऊन संपवणे जास्त सयुक्तिक आहे हे तिला बरोबर समजायचं. चॉकलेट खाऊन चिकट झालेली बोटं आयुषच्या शर्टाला पुसून ती बॉल पकडण्यासाठी दोन्ही हात कमरेवर ठेऊन उभी राहायची! चेंडू टाकण्याची जबाबदारी तीन वर्षाच्या कुणालवर असायची. याचा बराचसा वेळ इलॅस्टिक सैल झालेली चड्डी सावरण्यातच जायचा. चेंडू फेकण्यासाठी पाच-सात पावलं पळायचं असत असं तो कुठेतरी शिकला होता. पण त्यात एक मोठी अडचण होती. पळताना पावलागणिक त्याची चड्डी थोडीथोडी खाली येत असे आणि कधी कधी पाय अडखळून पडत असे. पण त्याची किंवा इतरांची याबाबत काही तक्रार नसे. पण तो अस्मिताकडे चेंडू एवढ्या जोराने फेकत असे की चेंडू फेकून झाला हे तिच्या ध्यानातच येत नसे. ती चेंडूची वाट बघत कुणालच्या तोंडाकडे पाहत राही. अस्मिताचे विरोधक मग घाईघाईने "अस्मिता बॅट-बॉल खेळू शकत नाही" असे जाहीर करून टाकत. आयुष मात्र हार मानायला तयार नसे. मघापासून अस्मिता लहान आहे हे मानायला तयार नसणार आयुष कुणालला दम देत असे,

"अरे ये कुण्या, बॉल हळू टाक. ती लहान आहे दिसत नाही काय? सरपटी बॊल टाक."

मग कुणाल पुढचा बॉल कमरेवर हात ठेवून उभ्या असणाया अस्मिताच्या दिशेने, तोसुद्धा अगदी हळू, सरपटत जाईल अशा बेताने टाकत असे. कमरेवरचा हात उचलून खाली वाकून चेंडू पकडण्याची क्रिया होईपर्यंत चेंडू अस्मिताच्या दोन पायांमधून पलिकडे गेलेला असे आणि अस्मिता कमरेतून वाकून स्वत:च्याच ढेंगेतून चेंडू आणी इतर उलट्या गोष्टी कशा दिसतात पाहण्यात मग्न होऊन जाई! आपल्याच ढेंगेतून खाली डोकं वर पाय असा दिसणारा आपला भाऊ आयुष, त्याच्यामागं रोजच्यापेक्षा वेगळाच दिसणारा आपल्या घराचा दरवाजा आणि रोज दाराखाली दिसणारी चप्पलं दारावरच्या छपरावर चिकटलेली, हे असं सारं अजब पाहून आपण चेंडू पकडायला खाली वाकलेलो आहोत याचा अस्मिता बाईंना विसर पडायचा!

अशा बर्‍याच परिक्षणांनंतर अस्मिता खेळू शकणार नाही हे आयुषच काय स्वत: चेंडू सुद्धा मान्य करत असे. परंतू बॅट अस्मिताची असल्याकारणाने मान म्हणून अंपायरचं स्थान अस्मितालाचा द्यायचं एक मुखाने मान्य होत असे! चेंडू टाकणारा टाकेल, बॅटींग करणारा करेल, फिल्डिंग करणारा करेल. अंपायरचा त्रास होण्याचं काहीच कारण नाही. फक्त फोर गेला की सिक्स गेला, कोण आऊट झाला, नो बॉल कि वाईट बॊल, कोण एबली डबलू हे एवढं समजलं म्हणजे झालं. बॅट अस्मिताची असल्यामूळे ती एवढीतरी हुशार नक्कीच असेल असं मान्य करण्यावाचून पर्याय नव्हता. "अस्मिताचे खेळातील स्थान" ह्या महत्वाच्या चर्चेचा असा निकाल लागला. शिवाय अंपायर कोण होणार हा सुद्धा प्रश्न त्याबरोबरच सुटला. या नंतरचे काम काही कठीण नसायचं.

टीम बनवायचं काम सगळ्यात मोठ्या व्यक्ती कडे म्हणजे कुणालची बहीण सिद्धीकडे असायचं. आपल्या टीम साठी सभासद निवडताना बरंच राजकारण व्हायचं. सगळ्याबाजूने विचार व्हायचा. बरेच मुद्दे विचारात घेतले जायचे. काही वेळापुर्वी कुणाचं कुणाशी भांडण झालं होतं, कुणी कुणाला खाऊ दिला नाही किंवा नाखूषीने दिला, कुणाची उंची किती आहे, दोन्ही बाजूच्या सभासदांची सरासरी उंची काय, पहिल्यांदा बॆंटिंग मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता कोणत्या टीमला आहे, आपला सगळ्यात आवडता मित्र कोणत्या टींममध्ये आहे, कुणाची आई घरात चेंडू गेल्यावर जास्तीत जास्त आरडाओरड करते, आधीच्या खेळात कुणी कुणाला हरवलं, कुणाच्या हातात कुठला खाऊ आहे, विनंती केल्यावर त्यातला थोडासा खाऊ आपल्याला मिळण्याची काय शक्यता आहे अशा अनेक शक्यता विचारात घेऊन टीम बनवल्या जायच्या.

कुणालला गोलंदाजीची भलतीच आवड होती. त्यामुळे सामना सुरू झाल्यानंतर जो पक्ष फलंदाजी घेईल त्याच्या विरुद्धबाजुच्या पक्षात तो खुशाल जात असे. त्याची भरपाई म्हणून त्या बाजूचा एक अत्युच्च फलंदाज पहिल्या पक्षाला जाऊन मिळत असे.

फलंदाजाने टोलवलेला चेंडू कोणत्या तरी घराच्या भिंतीला आपटला की फोर-फोर-फोर आणि चेंडू दोन फूट जरी उंच उडाला की सिक्स-सिक्स-सिक्स असे ओरडत सगळेच जण दोन्ही हात उंचावून नाचू लागत. अगदी चेंडू पकडणारे फिल्डर्स सुद्धा! अचानक असा गोंधळ झाल्यावर कुणाची तरी आई पडल्या पडल्याच "काय वरडायला लागला रे पोरांनो, गप खेळता की बॉल घेऊ तुमचा?" असा दम देई. तेवढ्या पुरते सर्वजण शांत होत. क्रिकेटमध्ये अधून मधून धावा काढाव्या लागतात म्हणून फलंदाज चेंडू टोलवून पळत असे. चेंडू पकडण्यासाठी सगळेच फिल्डर्स चेंडू मागे धावत आणि चेंडू कोण पहिला पकडतो अशी नवीनच स्पर्धा सुरू होई! अशी सगळी पळापळ पाहून खुद्द अंपायर सुद्धा उत्तेजित होऊन अलगद पावलं टाकत पळत असे! पण नक्की कुठे पळायचं हे ठाऊक नसल्यामुळे अंपायरचं पळणं दिशाहीन असे.

खेळताना कुणालातरी बॅट लागायची किंवा चेंडू नेमका डोक्यावर लागायचा त्यामुळे रडारड व्हायची. रडणार्‍याची आई रडण्यावर उपाय म्हणून अजून दोन धपाटे देऊन त्याला ओढत घरात घेऊन जायची. चॉकलेट खाऊन बराच वेळ झाल्यामूळे अंपायरला भूक लागत असे. कुणाला तरी शू-शू लागायची म्हणून तो निघत असे. असे करत करत सामन्यातून एकेक मेंबर गळायचा आणि मॅचचा काही निकाल न लागता संपायची. सर्व शांत झाल्यावर मी सुद्धा कंटाळून एक डुलकी काढण्याचा प्रयत्न करी.
अशा शांत दुपारच्या वेळीमाझा डोळा लगतो न लागतो तोच अचानक पुन्हा गलका होत असे, घंटीची किणकिण आणि ’सुखकर्ता दु:खहर्ता" च्या चालीवर बोबडे बोल ऐकायला येत असत...

सुककलता बुकलता वाल्ता विगनाची...
नुलवी पुलवी प्लेम...

असा उच्चारांचा उद्धार आणि अर्थाचा अनर्थ करीत आरती चाललेली ऐकून मी डोळे चोळत बघायला येत असे...
पाहतो तर बालगोपाळांचा देवपूजा-देवपूजा खेळ चाललेला असे. कुठल्याश्या वितभर लांबीच्या फाटक्या फोटोला भिंतीला नुसताच टेकवून ठेवलेला असे. कुणाच्यातरी देवघरातल्या देवाला घातलेला हार या फोटोला पडलेला असे. मारी बिस्किट साखरेबरोबर कुटून ती पावडर देवासमोर प्रसाद म्हणून ठेवलेली असे, बाजूला तिर्थ म्हणून पाण्याच्या ग्लासात अर्धवट विरघळलेली लेमलेट्ची गोळी असे. मघाच्या गोलंदाजाचा उघडाबंब भटजी झालेला असे. आणि अंपायरची नजर देवापूढे ठेवलेल्या प्रसादावर असे. इतर खेळाडू भक्तीभावे इतरांच्या तोंडाकडे बघत मोडक्या तोडक्या भाषेत आरती म्हणत उभी असत.

कुतुहल म्हणून मी कुठला देव एवढा प्रसन्न झाला आहे हे पाहत असे आणि काही वर्षापुर्वी टि.व्हि.वर सुरू असलेल्या महाभारत या मालिकेतील दुर्योधनाची पूजा गणरायाची आरती गाऊन होत असलेली पाहून धन्य होत असे...