Saturday, June 9, 2007

करदोरा-एक ग्रामीण कथा

करदोरा

कडाक्याची थंडी पडली होती. म्हातार्‍या माणसांना थंडी जास्तच वाजते, म्हणूनच पर्वती अन् कुंडलिका मुंबईत एका आलिशान बंगल्याच्या बाल्कनीत उन्हाला बसले होते. गळ्यात सोन्याचं डोरलं, हातात पाटल्या अंगावर चांगलं लुगडं नेसून खुर्चीत ती बसली होती. दोघं येणार्‍या-जाणार्‍या मोटार गाड्या पहात होते. सुनबाई सुद्धा मोठ्या गुणाची होती. ती प्रेमानं त्यांची सेवा करीत होती. यशवंता आला. तो आई-वडिलांच्या पाया पडला. 'आई येतो गंs' म्हणून तो कामासाठी बाहेर गेला. त्याच्या पाठमोर्‍या आकॄतीकडं बघत त्यांना आपली तीस वर्षापूर्वीची परिस्थिती आठवायला लागली.... खरंच त्यांची त्यावेळची परिस्थिती पाहिली तर ही प्रगती कुणाला न पटणारीच होती....
"आवं घरात दान्याचा कण नाही, शिजवावं तरी काय?" पारी आपल्या कारभार्‍याला सांगत होती. अंगावरलं कांबरून त्यानं बाजूला सारलं, चूळ भरली.
"आलो काय तरी जमतंय काय बघतो." म्हणून तो बाहेर पडला. मे महिन्याचे दिवस. कोल्हापूर पासून दहा कोसावरलं गाव. काम शोधून मिळत नव्हतं. अशी गावची स्थिती. गेलेला धनी दुपार झाली तरी परत आलेला नव्हता. सकाळपसून पोराच्या पोटात फक्त पाणीच होतं. पोटाला टॉवेल गूडाळून तो कोपर्‍यात बसला होता. त्याच्या पोटात कावळ्यांनी धुमाकूळ घातला होता. पोराची हालत पाहून तीचा जीव तळमळत होता. त्याला काय तरी करून घातलं पाहिजे म्हणून तिच्या जीवाची घालमेल होत होती. सूर्य तर आग ओकत होता. ती पोराजवळ जायची. त्याच्या डोक्यावरनं हात फिरवायची. तिची ती घालमेल यशवंत किलकिलं डोळं करून पाहत होता. गेली वर्षभर पार्वती घरात होती. तिला एका बाजूला लकवा मारलाता. चांगलं चार घास खाऊनपिऊन असलेलं घर हिच्या आजारपणात घाईला आलेलं. दाव्याची जनावरं कधीच विकलीती. आजारपणातून थोडी बरी झालती, पण तोपर्यंत संसाराचा कणाच मोडलाता. मोठ्या हिम्मतीनं तिनं संसार उभा केलता. पण आजारी पडल्यानं वर्षाच्या आतच मोडून पडलाता. डोळ्यातनं टिप गाळण्यापेक्षा ती काही करू शकत नव्हती. दुपारी तीनच्या सुमारास कुंडलिकराव घराकडे येताना दिसलं. कायतरी धनी घेऊन आलं असतील. आता पोराच्या पोटात दोन घास पडतील, या आशेने ती उठली. ते घरात आलतं. दोन कणसांशिवाय त्यांच्या हातात काही नव्हतं. ती कणसं तिनं घेतली. चुलीजवळ गेली. शेणपूट घालून चूल पेटवली. कुंडलिकरावांनी पोराला पाहिलं तसं त्याना रडूच कोसळलं. ते हूंदके देऊन रडाय लागले. पोराला जवळ घेतलं अन् हुंदके देतच,
"हे देवा परमेश्वरा काय हे दिस दाखावलंस? माझा पोटचा गोळा उपाशी ठेवलास. मी काय करू?"
एवढ्यात दारावर धाकलं पाटील आलंत.
"कुंडलूतात्या गार उपसायची हाय, आबांनी तुला बोलावलंया."
त्याला देवच आपल्या मदतीला धावून आलाय असं वाटलं. संध्याकाळच्या जेवणाची सोय झाली म्हणून त्यानं डोळं पुसलं.
"मी आलोच मालक. तुम्ही व्हा पुढं."
माणसं जमाय संध्याकाळ झाली. सहा वाजता गार उपसायला सुरवात झाली. प्रत्येक बुट्टी टाकताना त्याला त्रास होत होता. पोटात आग पडलीती. अंगात त्राण नव्हता, तरीसुद्धा पोराच्या पोटात चार घास पडतील म्हणून जीव ओतून तो गार उपसत होता. पहिली ट्रॉली एका तासात भरली. ट्रॉली शेतात ओतायला गेली. टिपूर चांदणं पडलं होतं. तरीबी ते चांदणं त्याला भकास वाटत होतं. पाटलीनं बाईनं चहा दिला. आज दिवसभरात पाण्याव्यतिरिक्त त्याच्या पोटात चहा चालला होता. त्याच्या पोटातलं कावळं जरा शांत झालं. पुन्हा ट्रॉली भराय सुरवात झाली. घड्याळाचा काटा पुढं सरकतं होता. तसतसं त्याला आपल्या उपाशी बायका पोराचं केविलवाणं चेहरे दिसत होते. कधी एकदा गार उपसून होतीया अन् तांदूळ घरला घेऊन जातोय असं झालंतं. नऊ वाजता गारीचा तळ लागला. त्याला आनंद झाला. हातपाय धुतलं तसं थोरलं मालक म्हणालं,
"कुंडलिका, हतासरशी येताना शेतातली लाकडं टाकून आणा जावा ट्रॉली येताना रिकामी येतीया."
"जी मालक" म्हणून तो ट्रॅक्टरच्या मागं चालू लागला. विचाराचं काहूर डोक्यात माजलंत. यायला वेळ झाला अन् दुकान बंद झालं तर? ट्रॉली मागून चालताना आपल्या डोक्यावरती कुणीतरी दहा मणाचं ओझं दिलंय असं वाटाय लागलं. पैसे मिळणार या आशेने तो वाड्यात शिरला, पण पाटलांना गाढ झोप लागली होती. जड अंतःकरणानं तो घराकडे चालला. त्याला वाटलं पाटलीन बाई कडून भाताचा हेंडा पोराला मागून घावा. पण धाकट्या वैनी साहेबांच्या पुढ्यात मागायचं कसं, त्याला लाज वाटाय लागली. त्याचं पाय पुढे सरकत नव्हतं. आता पोराच्या पोटात काय घालायचं याचा विचार त्याला सतावत होता. पोरगं वाट बघत दारातच बसलं होतं. बाला येताना बघून त्याला आनंद झाला. ते पळत त्याच्याकडं गेलं. पण हातात काहीच नव्हतं. पोराला उचलून घेतलं. त्याचं दोन मुकं घेतलं. त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवताना त्याच्या मनाची घालमेल सुरू झाली. डोळ्यातनं टिप गाळीतच तो आत आला. बायकोच्या गळ्याला जाऊन पडला.तो रडाय लागला. बायको समजावण्याच्या सुरात म्हणाली,
"धनी, नका काळजी करू आजच्या दिस पाणी पिऊनच रात्र काढू."
माठातलं पाणी तिघंबी प्याली अन् अंथरुणावर पडली. यशवंता या कुशीवरून त्या कुशीवर होत होता. त्याला भूक अनावर झालती. सकाळपासून फक्त मक्याचं दाणं पोटात गेलंतं. त्याला आता कोतमिरेनी रानात केलेली कलिंगडं दिसू लागली. ती कलिंगडं काढायला आल्यात हे त्यानं पाहिलं होतं. सकाळी यशवंता उठला आईला सांगितलं,
"आलो जरा इथनं."
तो गेला कलिंगडच्या रानात. कोतमिरे कलिंगड राखणदारीला असायचा. पण तो नव्हता. या संधीचा फायदा त्यानं घेतला. इकडं तिकडं बघितलं, तिथलं एक मोठं कलिंगड तोडलं. लांब झाडीत बसून त्यानं ते दगडानं फोडलं. जसजसं कलिंगड पोटात जाऊ लागलं तसतसं त्याला बरं वाटू लागलं. एवढयात पाठीमागून म्हादबानं त्याच्या पेकटात लाथ घातली. तसं ते 'आईs गं' करतच ओरडलं.
"चल तुला दावतो इंगा, चल चावडीत."
असं म्हणत त्यानं त्याला ओढाय सुरुवात केली. यशवंता हात जोडून म्हाणाला.
"एवढ्या डाव चूक माफ करा. परत अशी चूक आईच्यानं हुणार नाही."
"चूक करतंस नी माफी मागतंस. तुझ्या आईला तुझ्या", असं म्हणत त्यानं ओढायला सुरुवात केली.
शेतातनं गावात आल्यावर म्हादबाला चेव चढला. परत कोणी आपल्यात चोरी करताना दहा वेळ विचार करावा म्हणून त्यानं मारायला सुरुवात केली. यशवंता रडत होता. लोक विचाराय लागली.
"काय झालंरं म्हादबा?"
"कलिंगड चोरूज खाईतं नव गा. गावलंय सरपंचाकडं नेतो." सरपंचाला म्हादबानं वॄत्तांत सांगितला. त्यानी शिपाई पाठवला. तो गेला बोलावाया.
"कुंडलिका सरपंचानी बोलावलंय."
"कारं काय काम हाय?"
"तुझ्या पोरग्यानं प्रताप केलाय."
"काय केलं त्येनं?"
"कलिंगड चोरलं, म्हादबाच्या शेतातलं." हे ऐकताच कुंडलिका मटकन् खालीच बसला. शिपाई त्यातनं म्हणालाच, "असलं पोरगं जन्माला आलं तवाच नरडं का दाबलं नाहीस." कुंडलिकाला माहिती होतं पोरगं असं का वागलं. शिपायाच्या पाठीमागून चालताना तो नशिबाला दोष देऊ लागला. आणखी काय काय बघायला लावतोस देवा? झटकन् त्यानं म्हादबाचं पायच धरलं.
"एवढा डाव माफ करा मालक, बारकं प्वार हाय त्येला काय कळतंया. एवढ्या डाव चूक पोटात घाला मालक."
यात आपल्या पोराची काय चूक नाही हे माहीत असूनही त्यानं जड अंतःकरणानं त्याला मारलं. ते रडत म्हणाय लागलं.
"बाबा परत नाही असं करत, उपाशी पाणी पिऊन राहतो. पण मारू नगंस, बाबा लय लागतंया मारू नगंस."
त्यानं हातच जोडलं तसं कुंडलिकाला कालवल्यासारखं झालं. त्याला आपणच रडावं असं वाटाय लावलं. चाबकाच वाद आपणच मारून घ्यावं असा विचार त्याच्या मनात आला. हात सैल झाल्याचं पाहून यशवंता पळत सुटला. त्याचा गाव आता खूप लांब राहिलाता. पळत-पळत रेल्वे स्टेशनवर आला. भितभितच त्यानं रेल्वेच्या डब्यात प्रवेश केला. कोपर्‍यात जाऊन बसला. थोड्याच वेळात रेल्वे सुरू झाली.
सकाळी त्याला जाग आली तेव्हा रेल्वे थांबलेली होती. तो बाहेर आला. लोकांचा महापूर दिसत होता. सर्वजण गडबडीत होते. भितभितच चड्डी अन् अंगरखा घातलेला यशवंता मुंबईच्या गर्दीत घुसला.
सुरवातीचे दोन दिवस त्यानं भिकच मागितली. संध्याकाळी फुटपाथवर झोपायचा. तिथेच बुट पॉलिश करणारी मुलं झोपायची. ती फार पैसे खर्च करायची. नवीन नवीन पदार्थ खायची ते पाहून त्यालाही वाटू लागलं. आपण बूट पॉलिस करावं. पण साहित्य खरेदीसाठी त्याच्याजवळ पैसे नव्हते. आपण काय करावं अन् पैसे जमा कारावेत? भीक मागावी का? इतक्यात त्याचा हात कमरेला गेला. त्याच्या कमरेला एक चंदीचा करदोरा होता. त्याच्या आईन सोन्याचं डोरलं विकून पितळेचं डोरलं केलं. पण पोराच्या कमरेचा करदोरा विकला नव्हता. यशवंताला हे माहीत होतं. याचं पैसे येतील. त्यानं त्यातल्याच एका पोरग्याला विचारलं.
"मला चांदीचा करदोरा विकून बूट पॉलिस साहित्य घ्यायचं आहे. हा कूठं विकूया?"
ते म्हणालं,
"मीच घेतो. तुझ्याकडं पैसे झालं की परत माझं मला पैसे दे, अन तुझा करदोरा परत घे."
त्यानं करदोर्‍याच्या बदल्यात याला साहित्य घेऊन दिलं. बूट पॉलिशचा धंदा सुरू झाला. पहिल्याच दिवशी त्यानं चांगला तीस रुपयांचा धंदा केला. चौथीची परीक्षा पास झालता. त्या चौथीच्या पुस्तकातलं इतिहासाचं पुस्तक त्याचा जीव की प्राण होतं. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला की त्याला वीरश्री चढायची. म्हणूनच त्यानं पहिल्या कमाईचं इतिहासाचं पुस्तक खरेदी केलं. रोज सकाळी कामावर जाताना त्या पुस्तकातल्या महाराजांच्या फोटोच्या पाया पडायचा अन् जायचा. त्यामुळे त्याच्यात वेगळंच बळ यायचं.
इकडे आईनं अंथरूण घरलं होतं. 'यशवंता यशवंता'चा जप करत होती. कुंडलिका हिचं दु:ख पाहायचा अन् परगावी राहणारी लोकं गावी आली की विचारायचा,
"आमचा यशवंता कुठं दिसला का?"
अशातच यशवंताला एक गाववाला भेटला. त्या गाववाल्यानं सगळी हकीकत यशवंताला सांगितली. त्याच्याकडून त्यानं घराकडे शंभर रूपये पाठवले. त्या शंभर रुपयापेक्षा आपलं पोरगं व्यवस्थित हाय हे ऐकून ती उठून बसली. सगळीकडं सांगत सुटली,
"माझ्या यशवंतानं पैकं पाठवलं पैकं." दोघंबी त्या नोटकडे बघत आनंदाश्रू गाळू लागली.
इकडे पावसाळा सुरू झाला होता. सर्वांनीच बुट पॉलिस बंद करून छत्री दुरुस्तीचा धंदा सुरू केला. वर्षात तसे त्याचे तीन धंदे व्हायचे. बुट पॉलिश, छत्री दुरुस्ती बरोबर तो स्टोव्ह रिपेअरी सुद्धा करायचा. पैसे मिळत होते. इतर मुलांच्या प्रमाणं हा चैनी करत नव्हता. ती पोरं याला सिगारेट ओढायला सांगायची, पण पैसे लागत्यात म्हणूनही तो तिकडे कानाडोळा करायाचा. मित्रांच्या ओळखीनं बँकेत खातं उघडलं. पैसे साठाय लागले. गावकडे पैसे पाठवायचा. त्यानं जीवनात एक ठरवलं व्यसन कुठलं लावून घ्यायचं नाही.अन् काय वाटेल ते झालं तर चालंल पण चोरी करायची नाही. फक्त कष्ट आणि कष्ट करायचं. एखादे संकट आलं की चौथीचं इतिहासाचं पुस्तक काढून शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायचा. पुन्हा त्याच्यात हिमंत यायची, त्याचं बळं वाढायचं.
दिवसामागून दिवस जात होते. आज त्याच्या जीवनातला महत्वाचा टप्पा होता. त्यानं रिक्षा घेतली होती. रिक्षाची चाकं फिरू लागली. पैसे जमाय लागलं. वर्षात तीन धंदा करणारा यशवंत गप्प बसंना. सहा महिन्यातच त्याच्या लक्षात आलं. जुन्या रिक्षा देणे-घेणेचा धंदा आहे. हा कमिशन बेसिसवर चालतो. मग काय त्यानं रिक्षा चालवत चालवत कमिशन बसिसवर रिक्षा देणे-घेणेचा व्यवसाय सुरू केला. ज्या स्टॉपवर रिक्षा थांबायची तिथे ओळखी करून घ्यायचा. कुणाची रिक्षा द्यायची आहे? कुणाला पाहिजे आहे काय? विचारायचा. अशानं ओळखी वाढल्या. विक्री वाढली. रिक्षा विकून त्यानं टॅक्सी घेतली. टॅक्सी देणे-घेणेचा सुद्धा व्यवसाय सुरू केला. कुणाला न फसवता धंदा करायचा. लोकांचा विश्वास वाढल. जो-तो म्हणायचा,
"टॅक्सी पाहिजे, आमचा दोस्ता हाय की यशवंता. जावा त्याच्याकडं."
प्रगतीची एक एक पायरी चढत होता. लग्न झालं मुलगा झाला. एकाच मुलग्यावर ऑपरेशन केलं. आज यशवंता चाळीस वर्षाचा झालता. दादर मध्ये एक घर घेतलं. स्वतःचा कार बाजार सुरू केलता. आजची परिस्थिती पाहून आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळत होते.
यशवंता ज्यावेळी मुंबईत आला, त्यावेळी त्याच्याजवळ फक्त होती चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा अन् करदोरा. तो करदोरा त्यानं जपून ठेवलाय. आजही ज्या ज्या वेळी त्याच्यावर संकट येतात त्यावेळी तो शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतो अन् संकटाला दोन हात करतो.

प्रमोद तौंदकर
कोल्हापूर



--------------------------------------------------------------------------------


कोल्हापुरात असताना 'प्रमोद तौंदकर' स्थानिक तरुण लेखकाशी ओळख झाली. गप्पांच्या ओघात त्याने लिहीलेल्या काही कथांचा विषय निघाला. लेखक स्वत: ग्रामीण भागात रहात असल्या कारणाने त्याच्या लेखात साहजिकच ग्रामीण बाज होता. त्याच्या कथा या 'समाज प्रबोधन' या हेतूने लिहिलेल्या असल्या तरी त्यातील ग्रामीण भाषा मला फार भावली. या कथा इतरांपर्यंत पोहोचव्यात असं मला वाटलं, म्हणून हा उद्योग. यातील पहिली कथा 'निवद-एक ग्रामीण कथा' या शिर्षकाखाली या अनुदिनीवर या आधीच प्रसिद्ध केलेली आहे.

ता.क.: ही कथा इथे प्रसिद्ध करण्यासाठी लेखकाची परवानगी घेतलेली आहे.

निवद-एक ग्रामीण कथा

रंगानं बोंब मारली तसा गाव जागा झाला. हा हा म्हणता बातमी गावभर पसरली. श्यामा म्हातारा गेला. सोना म्हातारी म्हणाली,
"चांगला होता बिचारा, काल माझ्यासंगं घटकाभर बोलला अन् असं अचानक काय झालं गा?"
"झोपेतच कवा मरुन पडलाय म्हणत्यात."
"पोराचं कसं व्हायचं गं तारा?"
"त्यास्नी काय हुतया? चांगली दोन हजार पेन्शन मिळलं म्हातारीला."
"व्हय बाई, पैसा काय थोडा साठविलाय तेनं. बिचार्‍यानं चैन कवा केलीया? धडूतं सुद्धा कवा चांगलं घातलं नाही."
पारी म्हातारी म्हणाली, "एकादशीचं मराण आलं, स्वर्गाची दारं उघडी असत्यात, नशीबवान हाय."
मनात मी म्हटलं,
"दार उघड असत्यात ते बघाय गेलतीस की काय? काय देवानं तुलाच नेमलीया ह्यो स्वर्गात ह्यो नरकात हे बघायला?"
तुळसा आपल्या धन्याजवळ गेली. "अवं ऊठा की. श्यामू मामा गेलंत."
तसा शिरपानाना म्हणाला,
"थंडी मरणाची पडलीया, त्यातच हे सकाळी सकाळी मेलं." अंगावरचं कांबरुन त्यानं बाजूला केलं. तसं त्याला जास्तच थंड वाजाय लागली. मनातल्या मनात शाम्या म्हातार्‍याला शिव्या देतच तो बाहेर पडला.
एवढ्यात श्यामाची पोरगी तिकडून बाबा गाss ये माझ्या बाबा, येsयेss रडत आली. मी मनात म्हटलं,
'तो खरचं आला तर ठो ठो बोंबलत पळशील गप रड.' रडारड जोरात वाढली होती.
शिरपानाना म्हणाला, "भावकी कुठं गेली, शेणकुटं, लाकडं, टायरं आणा जावा की. काय मढं इथंच ठेवता?"
एवढ्यात हिंदूराव म्हणाला,
"जन्मात कधी चांगलं धडूतं घातलं नाही, सदान् कदा फाटलेलं आन् मळकटलेलं. आज मेल्यावरच त्याला नवं कापड मिळालं."
सगळी तयारी झाली पण अजून एका पाव्हणीची लोक वाट पाहत होती, पण तिचा पत्ता नव्हता.
श्यामाच्या भावकीत परवा दिवशी एक लग्न होतं. ज्या पठ्ठ्याचं लग्न होतं त्याचं वय चाळीस झालतं. अनेक कारणांनी त्याचं लग्न मोडलंतं. त्याचं लग्न ठरल्यानं ते हारकलतं. ते सद्याला म्हणालं, "शामू तात्यानं चार दिस कड काढायचा नाही, आता लगीन पुढं ढकलाय पाहिजे, काय तरी विघ्न आलं तर?"
पाव्हणी आली. प्रेत स्मशानात आणलं. पोरग्यानं प्रेताला अग्नी दिला. शिरपानाना म्हटला,
"मार बोंब."
तशी त्यानं शेवटची बोंब मारली. लोकांनी हाराटीची पात गोळा केली. शिरपानाना म्हटला,
"झाडा झाडा संसार सोडा, पाप पुन्याचा केला निवाडा. शामराव कडवे बसव्याची शेपूट धरून कैलासाला गेला." मघाशी स्वर्गात गेला, आता कैलासात गेला. आता श्याम्यालाच माहीत तो नेमका कुठ गेला? लोकांनी हाराळीची पाती अग्नीत टाकून परतीचा मार्ग धरला.
तिसर्‍या दिवशी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम. हळूहळू गाव जमलं पै-पाव्हणं जमलं. प्रत्येक पाव्हण्याच्या हातात निवदाच्या पिशव्या होत्याच. सकाळी दहा वाजता लो़क राखंच्या ठिकाणी आली. राख एकत्र केली. पिंड केला. त्याला पाणी पाजलं. पाणी पाजून झाल्यावर शिरपानाना म्हंटलाच,
"ज्यानं ज्यानं निवद आणल्यात त्यांनी ठेवावं." तसं पै-पाव्हणं पुढं सरकलं. एका परीस एक पदार्थ निवदावर होतं. शामरावाच्या बापजाद्यांनी सुद्धा असलं पदार्थ खाल्लं नसतील. एका पाव्हण्यानं तर कमालच केलती. त्यानं बाटलीतून दारू ठेवलीती. हे बघून एक म्हातारा पाव्हणा म्हणाला, "पिता व्हय गा ह्यो, आम्हाला कधी कळलंच नाही, नाहीतर..."
"ते कुठलं प्यालं असंल चाऊन चिकाट होतंनी. चोरुन पितं काय कुणास ठाऊक." अशा गप्पा चालल्या होत्या. उन्हामूळं लोकांची थंड जरा कमी व्हाय लागलीती पण कार्यक्रमाचा मुख्य पाव्हणा एक बी हजर नव्हता. प्रत्येकाच्या नजरा त्याला आंब्याच्या झाडावर शोधत होत्या. त्याचा काय बी पत्ता नव्हता. घटकाभर असाच गेला. ऊन लोकांना आता सोसवंना. ती सावली शोधाय निघाली. एवढ्यात गावचं पाटील म्हणाले,
"शामूदानं कुणाला हाक मारली तर लोक थांबत नव्हती, त्याचं काय मत हाय जाणून घेत नव्हती. म्हणूनच डाव काढलाय त्येनं." असा नवा शोध त्यांनी लावला. ताटकाळलेली माणसं खाली बसली. तानबा हळूच आपल्या दोस्ताला म्हणाला, "माझी आज शेताला पाणी पाजायची पाळी होती, आज जर पाणी नाही घेतलं तर पुढल्या आठवड्यातच मिळणार, मी काय गा म्हणून इकडं आलो अन् अडकून बसलो?" तशीच गत नोकर वर्गाची झालती. लोकांची चुळबूळ सुरु झाली. अचानक एक कावळा आंब्याच्या झाडावर आला. एखादा कार्यक्रमाचा मंत्री आल्यावर जेवढा आनंद होतो त्याच्याही पेक्षा जास्त आनंद लोकांना झाला. शिरपानाना म्हणाला,
"मागं व्हा, कावळा बुझंल."
लोक सारसार मागं सरकली. पण कावळा काय हालंना. घटकाभर असाच गेला. कोणीतरी म्हणालं,
"पोराला पाया पड म्हणावं."
पोरगा पाया पडला. जावई पाया पडला. कदाचित जावाई असं म्हणाला असंल,
"मामा, पोरगीला अजिबात त्रास देत नाही. निवद तेवढा शिवा. शिवला नाहीसा तर मात्र....."
भाऊ, भाचा, पुतणे पाया पडले. पण काही उपयोग होईना. शिरपानाना म्हणाला,
"मोटरपंप चालविता. त्येचा जीव त्यात अडकला असंल. तवा व्यवस्थित चालवताव म्हणारं पोरांनो."
पण काही उपयोग झाला नाही. गणा म्हणाला, "त्याचा नातवावर लई जीव हुता. त्येला आणा जावा."
तसं एक कॉलेज कुमार गाडीवरनं त्याला आणाय गेलं. ते पोरांच्या बरोबर गोट्यानं खेळंतं. त्याला गाडीवर घेतलं नि घेऊन आलं. ते त्याला असं घेऊन येत होतं की जणू हिमालयाचं शिखरच त्यानं पार केलंय. पण त्याचा बी काय उपयोग झाला नाही. गाईला आणाय पोरं निघाली, तवर दुसरा कावळा आला. सिनेमातली नटी आल्यावर जेवढा आनंद लोकांना झाला असता तितका आनंद लोकांना त्या कावळ्याला पाहून झाला. तो आला. त्यानं इकडं तिकडं मान फिरवली अन् बाटली असल्याला निवदावर चोच मारली. त्या पाव्हण्याला आनंद झाला. छाती पुढं काढून ते म्हणालं,
"मामानं माझा निवद शिवला."
'ह्यो अन् कुठला भाचा?' विचार कराय लोकांना वेळ नव्हता. त्यातनंबी पोलीस पाटील म्हणाले,
"त्याची प्यायची इच्छा मागं राहिली असलं, म्हणूनच त्यानं लांबच्या भाच्याचा निवद शिवला." लोक लगबगीनं घराच्या वाटंला लागली.
या रक्षाविसर्जनासाठी आलेला दिलीप घरात पोहोचला. आईनं विचारलं,
"एवढा वकूत का रं?"
"काय सांगतीस निवद शिवला नाही तात्यानं लवकर."
"लोक अशी वैतागलीती म्हणतीस काय सांगू."
"आंघोळीला पाणी काढलंय. आंघोळ करुन घे आगोदर."
"आंघोळ नगं, जेवाय वाढ आगोदर. भूक लागलीया."
"आंघोळ केल्या बिगार काय खायचं नसतंया."
"आगोदर आंघोळ कर मग वाढतो."
"आय, मी खाल्ली बर्फी. खिशात हुती, सकाळी घेतल्याली."
"कुठं खाल्लीस रं?"
"तिथच की राखं जवळ चोरुन."
"काय तुझ्या मानंवर भूत बसलतं, काय आग पडलीती. थोडावेळ कड काढता आली नाही व्हय?"
"काय होईल गं आय?"
"काय हुईल तुझा मेंदूच तपासून आणाय पाहिजे. असं राखंला गेल्यावर खात्यात व्हय? परमेसरा, आमच्या मागं काय इगनं लावतुयास?"
त्याच्या मनाला लागलं. कशीतरी आंघोळ करुन चार घास खाल्लं. शेजारच्या गणपानानाकडं गेलं. त्याला सगळा वॄत्तांत त्यानं सांगितला. ते बी हुत बेंडल. ते म्हणालं,
"दिल्या आता बस लेका, तुझ्या अंगावर श्याम्या बसणार!"
तसं तेचं काळीज धडकाय लागलं. काय करावं त्येला कळंना. 'आता माझं काय हुणार? त्यो माझ्या पाठी लागला तर?' करतच ते घरात गेलं. चिन-बिन कराय लागलं. श्याम्या, श्याम्या आला म्हणत वरडाय लागलं. दिलप्याला श्याम्यानं धरलं ही बातमी गावभर झाली. लो़क दिल्या कसा करतोय ते बघाय यायला लागली. देवाच्या बायकांची पर्वणीच. त्या अशावेळी न चुकता आल्या. त्यातल्या एकीनं चुलीतला अंगारा लावला नि म्हणाली, "तुझा काय असंल त्यो दानापानी टाकताव, खरं झाडाला सोड, त्याचं हाल करू नगंस."
जटवाली बाईनं सांगितलं,
"तीन शिरंचा लिंबू घे, उभा कापून त्याच्यावरनं उतरुन उगवत्या बाजूला टाक, तसंच दोन वाटी भात, रस्सा, मटण ते बी त्येच्यावरनं उतरून उगवत्या दिशेला वताडात ठेव. ठेवल्यावर मागं बघू नगसं." मी मनात म्हणालो, "मागं वळून कसं बघून चालंल? तू दिसणार ना खात्याली." उतारा उतरला पण दिल्याच्यात काही फरक पडला नाही, दुसर्‍या दिवशी सकाळी उठलं ते नदीकडच पळालं. नदीत उडीच मारली. पोरांनी बाहेर काढलं.
कॉलेजची पोरं जमा झाली. एका पोरानं उसाचा बुडका हातात घेऊन त्याला माईक केला नी सुरवात केली,
"आपण कब-तक या वाहिनीवरून सिधे प्रसारण पाहत आहात. सर्व प्रथम आम्हीच इथे पोहोचलो. हा जो समोर मनुष्य दिसतो आहे तो दिलीप आहे. त्याला म्हणे भूतानं झपाटलं आहे. अशी इथल्या भोळ्या भाबड्या ग्रामस्थांची समजूत आहे, जर तुम्हाला वाटत असेल दिलीपला खरच भूतानं झपाटलंय तर १२००५६७८०१ या क्रमांकावर डायल करा. तुम्ही एसएमएस सुद्धा करू शकता, ६६६६ होय साठी, नाही साठी ५५५५. पुन्हा आपण भेटणार आहोत थोड्याश्या विश्रांतीनंतर. दिलीप काय खातो, कसा राहतो, त्याच्या आवडी निवडी, त्याच्या आईला विचारणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका. सनसनी बातम्यासाठी पहात रहा कबतक.."
पोरं गंमत करत होती. इतक्यात तिथं राजू पोहचला. हा राजू अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करत होता. या राजूनं देवांच्या बायकांची अनेक प्रकरणं उपटून काढली होती. त्या बायांनी याला हैराण केलं होतं. घरात लिंबू कापून टाक, अंगार्‍याच्या पुढ्या टाक, त्याच्या नावावरनं देवाला नारळ वाढव असे प्रकार केले. पण राजू डगमगला नाही. या राजूनं ओळखलं हे प्रकरण आपल्यानं सुटणार नाही. त्यासाठी आपल्या कमिटीतल्या शिरसाठ सरांना बोलवाय पाहिजे. हे शिरसाठ सर म्हणजे सुद्धा भन्नाटच होते. गरज असेल त्यावेळी अंगात सुद्धा खोटं काढायचे. लोकांना वाटायचं खरंच सरांच्या अंगात आलय. पण शेवटी लोकांना अंगात येणं, भूत बसणं हे कसं खोटं आहे हे समजवायचे. त्यांनी पहिल्यांदा दिलीपला आपलसं केलं नि मग म्हणाले,
"दिलीपराव, भूतबित काय नसतंय, हा सगळा आपल्या मनाचा खेळ आहे, तुम्ही भिऊ नका."
देवाच्या बाया पाय आपटतच आलेल्यांना शिव्या देत बाहेर पडल्या, त्यांचं गिर्‍हाईक जाणार होतं. दिलीपला खूप समजावलं तो ऐकेना, पण झटकन बोलून गेला, "तुम्ही तिथं चला अन् बर्फी खावा चला."
शिरसाठ सर म्हणाले,
"बर्फीच काय आम्ही चापाती भाजी सुद्धा खातो."
दिलीपबरोबर पोरांचा घोळका निघाला. गल्लीतल्या म्हातार्‍या बायका दिलीपला बघून म्हणाल्या, "चार दिसांत पोराला पार पिळून काढलं, पाक बाद झालं पोरगं, कसं चांगलं हुतं."
काही लोक हसत होती, लांबनच म्हणत होती,
"तुम्हाला दिलीपराव म्हणायचं की शामराव?"
स्मशान शेड आले. कमिटीनं खिशातलं हात रुमाल काढले. ते अंथरले त्यावर बसून चपाती भाजीसोबत बर्फी खाल्ली. ते पाहून दिल्याला आनंद झाला. त्या आनंदातच तो म्हणाला,
"माझ्या अंगावरनं श्याम्या आता यांच्या अंगावर गेला." अन् त्यानं पोबारा केला.
दुसर्‍या दिवशी तो राजूला भेटला. त्या कमिटीत सहभागी झाला. गेली दोन वर्ष राजू अन् दिलीप गावात अंधश्रद्धेविरोधात काम करतात.
आज गावात माणसं आजारी पडूद्यात, नाहीतर जनावरं, लोक देवांच्या बायकांकडे न जाता डॉक्टरकडे जातात. रात्री अपरात्री बिनदिक्कत शेताकडं, नदीकडं जातात. कधी कधी लोक दिलीपराव आठवला कि काय शामराव म्हणतात.
हास्याची लकेर उमटते आणि लोक कामाला जातात.

प्रमोद तौंदकर

कोल्हापूर


--------------------------------------------------------------------------------

कोल्हापुरात असताना 'प्रमोद तौंदकर' स्थानिक तरुण लेखकाशी ओळख झाली. गप्पांच्या ओघात त्याने लिहीलेल्या काही कथांचा विषय निघाला. लेखक स्वत: ग्रामीण भागात रहात असल्या कारणाने त्याच्या लेखात साहजिकच ग्रामीण बाज होता. त्याच्या कथा या 'समाज प्रबोधन' या हेतूने लिहिलेल्या असल्या तरी त्यातील ग्रामीण भाषा मला फार भावली. या कथा इतरांपर्यंत पोहोचव्यात असं मला वाटलं, म्हणून हा उद्योग.

ता.क.: ही कथा इथे प्रसिद्ध करण्यासाठी लेखकाची परवानगी घेतलेली आहे.

नमस्कार

नमस्कार मंडळी